Wednesday 24 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी

या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने (हेतुपुरस्सर) साध्य करता येत असल्याचा दावा देखील काही योग साधकांनी केलेला दिसतो. विशिष्ट पद्धतीच्या योगिक प्रक्रियांनी सिद्धी प्राप्त करता येतात असे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले दिसतात. योगशास्त्रविषयक ग्रंथसंपदेत महर्षी पतंजलिंच्या 'योगसूत्र' या ग्रंथाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योगसूंत्रांमधे अष्टसिद्धी प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरतील अशा योगिक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. भक्तांना दृष्टांत झाल्याची उस्फूर्त आणि अहेतुकपणे प्रचिती आली तर महर्षींनी ती अध्यात्मातल्या प्रगतीचा एक संकेत असल्याचे अपवादात्मक प्रसंगी मान्य केल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. अशा प्रसंगी दृष्टांत झालेल्या भक्ताला तो मानसिक पातळीवरचा क्षणभंगुर अनुभव आहे; तसेच असे अनुभव आत्मसाक्षात्काराच्या तुलनेत खालच्या प्रतलावरचे असल्याने दुर्लक्ष करण्याजोगे असल्याची जाणीव महर्षी न चुकता करून देत असत.
अवचितपणे सिद्धी प्राप्त झाली असता तिची भुरळ पडल्याने पथभ्रष्ट होण्याच्या संभाव्य धोक्याची रूपरेषा महर्षी समजावून सांगत असत. सिद्धी प्राप्त केल्याने अहंतेपासून मुक्ती न मिळता उलट अहंकार बळावण्याचीच शक्यता जास्त आहे असे महर्षी स्पष्टपणे बोलून दाखवत असत. सिद्धी प्राप्त करण्याची हाव आणि आत्मसाक्षात्कार या दोन गोष्टींमध्ये अंतर्विरोध असल्याने त्या एकत्र राहूच शकत नाहीत; त्या पैकी एका गोष्टीचीच निवड करावी लागते असे महर्षींचे ठाम मत होते.
आत्मस्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत निकट आहे. ते चिरंतन आहे. त्या उलट सिद्धी मात्र सर्वार्थाने अनात्मस्वरूप, बाह्य जगात मिरवण्याजोग्या आणि अशाश्वत असे फसवे मृगजळ आहे. सच्चिदानंद स्वरूप ही सहजस्थिती आहे. सिद्धी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. अतिंद्रिय किंवा अतिमानस शक्तीं मनाला हव्याहव्याश्या वाटतात. त्या वश करण्यासाठी मनाला सतत सतर्क ठेवावे लागते. त्या उलट मनोनाश झाल्यावर स्वरूप आपोआप प्रकट होते. स्वरूपाचे सजग भान टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज नसते. सिद्धी अहंकाराच्या आश्रयानेच प्रकट केल्या जातात. स्वरूपबोध हा अहंकाराच्या पल्याडचा प्रांत असल्याने अहंतेचा नाश केल्यावरच त्याचा साक्षात्कार होतो असा उपदेश महर्षी सातत्याने देत असत.
प्रश्नः महर्षी पतंजलिंनी उल्लेख केलेल्या सिद्धी खरोखर अस्तित्वात आहेत की ती निव्वळ त्यांच्या मनोविश्वातली स्वप्नसदृश गोष्ट आहे?
रमण महर्षी: महर्षि पतंजलिंनी स्वत:च स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सगळ्या सिद्धी मनोनिर्मित आहेत. त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडसर आहेत. ब्रह्मस्वरूप झालेल्या किंवा स्वरूप साक्षात्कार झालेल्या साधकाच्या लेखी त्या कवडीमोलाच्याही नसतात.
प्रश्नः तथाकथित बुवा आणि बापूंच्या (अतिंद्रिय) शक्तींविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: या शक्ती उच्च पातळीवरच्या असतील किंवा निकृष्ट पातळीवरच्या असतील, त्या मनोनिर्मित असतील अथवा अतिमानस स्थितीत अनुभवलेल्या असतील; ज्या व्यक्तीकडे अतिंद्रिय शक्ती आहे असे मानले जाते त्या व्यक्तीच्या संदर्भातच (पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ स्वरूपातच) त्यांचे अस्तित्व असते. (पारमार्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर) अशा व्यक्तीचे मूळ स्वरूप काय आहे याचा तिला शोध घ्यावाच लागेल.
प्रश्नः अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना मैलाचे दगड या स्वरूपात सिद्धी प्राप्त होत जातात, की सिद्धी आणि मुक्ती परस्परविरोधी गोष्टी आहेत?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार होणे ही सर्वोच्च सिद्धी आहे. तुम्हाला क्षणभर जरी सत्यस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तर तुमचे (सिद्धींच्या मोहात पाडून) अज्ञानाच्या खाईत लोटत असलेल्या मार्गांविषयीचे आकर्षंण कायमचे संपुष्टात येईल.
प्रश्नः मग सिद्धींचा उपयोग काय आहे?
रमण महर्षी: दोन प्रकारच्या सिद्धी असतात, त्या पैकी एक प्रकार आत्मसाक्षात्कारात विघ्न निर्माण करणारा आहे. मंत्रजप केल्याने, रहस्यमय गुणधर्म असलेल्या काही रसायनांचे सेवन केल्याने, कठोर तपश्चर्या केल्याने तसेच ठराविक प्रकारची समाधी लावणे साध्य केल्याने सिद्धी प्राप्त होतात अशी एक धारणा रूढ झालेली आहे. उपरोक्त पद्धतीने शक्ती प्राप्त करणे हे आत्मसाक्षात्कारासाठी उपयुक्त ठरणारे साधन नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने सिद्धी प्राप्त झाल्या तरी तुम्ही अज्ञानाच्या गर्तेतच अधिक खोलवर रूतत जाल!
प्रश्नः मग या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या (उपकारक) सिद्धी कशा असतात?
रमण महर्षी: तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला तर तुमच्या ठायी निसर्गत:च असलेले आंतरिक सामर्थ्य आणि प्रज्ञान यांचे सहजस्फूर्त प्राकट्य होत जाणे असे या सिद्धींचे स्वरूप असते. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे. आत्मसिद्धीच्या जोडीला विनासायास मिळत असलेल्या सिद्धी कुणालाही प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी स्थितीत असाल तेव्हाच अशा सिद्धींची साक्षात प्रचिती येते.
पुरवणी:
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायाच्या सुरूवातीला आत्मसिद्धी/ सोहंसिद्धीचे काव्यात्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. इथे समाविष्ट केलेल्या निवडक ओव्यांमधला 'योगसुखाचे सोहळे' ते 'समाधिबोधे निजविसी, बुझाऊनि' हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आई जगदंबेने बाळाला मांडीवर घेत त्याचे सोहंसिद्धीचे लळे पुरवावे, 'आधारशक्तीच्या' (कुंडलिनी) बळावर त्याचे संगोपन करावे, अनाहत नादाचा खुळखुळा वाजवावा, चिदाकाशाच्या पाळण्यात त्याला झुलवावे, सत्रावीचे स्तन्य द्यावे, प्रत्यकज्योतीने त्याला ओवाळावे, हातात मन पवनाची (प्राणशक्तीची) खेळणी द्यावी, आत्मसुखाची बाळलेणी लेववावी आणि समाधीचा बोध देत त्याला निजवावे अशा प्रकारचे हे एक नितांत सुंदर रूपक आहे. माऊलींनी त्या आधी गुरूंच्या कृपादृष्टीने वैषयिक वासना निर्विष होतात, त्यांची डंख करण्याची क्षमता संपते; तसेच प्रसादरसाचे कल्लोळ उठल्याने साधकाच्या जीवनातून शोकसंतप्त भावना कशी हद्दपार होते याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
*** सत्रावीचे स्तन्य - पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक आणि प्राण या सोळा कला आहेत. स्वरूपानंद किंवा अमृतकला ही सत्रावी कला मानली जाते.
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥

No comments:

Post a Comment