Saturday 8 December 2012

'शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी (भावानुवाद)

भगवान रमण महर्षी - संक्षिप्त परिचयः

"मी कोण आहे?" (तत्वार्थाने - माझे मूळ स्वरूप कसे आहे?) या सनातन प्रश्नाचे उत्तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अचानक मृत्युसमान अनुभव येउन ज्यांना सहज गवसले असे एक लोकविलक्षण, आत्मसाक्षात्कारी आणि ज्ञानी सत्पुरूष अशी श्री. रमण महर्षींची आज जगभर ख्याती आहे. आत्मचिंतनाच्या धारदार तलवारीने सारे लौकिक पाश कापून काढत, त्या दृष्टीने सर्वसंगपरित्याग करून साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या दक्षिण भारतातल्या परमपवित्र अरूणाचल पर्वताच्या आश्रयाला ते सोळा वर्षांचे असताना जे आले, ते शेवटच्या श्वासापर्यंत वास्तव्य करण्यासाठीच. अत्यंत साधे, शांत, सहज संयमी आणि अंतर्बाह्य निर्मळ जीवन या जीवन्मुक्त ज्ञान्याने तिथे व्यतित केले.

जगाच्या कानाकोपर्‍यातून साधक, उपासक, तत्वज्ञ वगैरे मंडळींचा एक अखंड प्रवाहच जणू भगवानांच्या हयातीत अरूणाचलाकडे वाहता झाला. बहुधा या अलौकिक सत्पुरूषाविषयीच्या आंतरिक ओढीमुळे, कुतुहलामुळे, प्रापंचिक प्रश्न सुटावेत यासाठी कृपायाचना करण्यासाठी तर क्वचित प्रसंगी त्यांची परीक्षा पाहणे ते त्यांना अपमानित करणे इतके वैविध्यपूर्ण हेतू मनात ठेउन लोक अरूणाचली पोचत असत. १९५० साली भगवानांनी महासमाधी घेतलेली असली, तरी आजतागायत हा जनप्रवाह आटलेला नाही. श्री. रमणाश्रमात परमपवित्र अरूणाचलाच्या कृपाछायेत चार क्षण घालवता यावेत यासाठी भेट देणार्‍या भक्तांची संख्या रोडावलेली नाही. अन्य सत्पुरूषांप्रमाणेच देहत्यागानंतरही श्री. भगवानांच्या तिथे असलेल्या चिरंतन, मौन आणि कृपापूर्ण वास्तव्याची प्रचिती आजही कित्येक भक्तांना प्रकर्षाने अनुभवता येते.

रमण महर्षींच्या जीवनात शब्दांचा भुलभुलैय्या, चमत्कारांचा झगमगाट, सोवळ्या-ओवळ्याचे अवडंबर, अतिरेकी व्रतवैकल्ये या काहीशी प्रचलित असलेल्या गोष्टी आणि अलीकडच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाच्या नावाखाली बोकाळलेल्या मुक्तीच्या वल्गना, तार्किक कोलांट्याउड्या, बेगडी विश्वात्मकतेचा दांभिक देखावा, सवडीशास्त्राकडे झुकलेले गोलमाल तत्वज्ञान यांना कधीच स्थान नव्हते. रमणाश्रमाच्या कार्यात हे स्पष्टपणे दिसते. शिस्तबद्धता जाचक ठरू नयी आणि मोकळीक स्वैर मोकाटपणाकडे झुकू नये असे तिथे सहज घडते. कुठलाही सामाजिक अथवा राजकीय 'अजेंडा' नाममात्रही नसला तरी आजही हे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे.

सफेद मोराची कथा:

सहज समाधीस्थ राहणारे भगवान रमण महर्षी आणि अरूणाचलाच्या परिसरातील पशुपक्षी यांचे एक अनोखे,मनोहारी आणि अत्यंत जिव्हा़ळ्याचे नाते होते. हा एक स्वतंत्र लेखाचाच काय तर लेखमालेचाही विषय होउ शकेल. याविषयी काही लिहीण्याचा मानस होता. अलीकडेच श्री.अ‍ॅलन जेकब्ज यांनी लिहीलेल्या'श्री रमण महर्षी - द सुप्रीम गुरू' या पुस्तकातल्या तिसर्या परिशिष्ठात दिलेली सफेद मोराची कथा वाचली. तिचाच हा स्वैर भावानुवादः

१९४७ साली एप्रिल महिन्यात एके दिवशी भगवानांना बडोद्याच्या राणीसाहेबांनी आदरपूर्वक भेट दिलेल्या सफेद मोराचे रमणाश्रमात आगमन झाले. सुरूवातीला या मोराला परत पाठवणेच श्रेयस्कर ठरेल असे महर्षींचे मत झाले. ते म्हणाले, "इथे जे दहाबारा रंगीत मोर आहेत, ते पुरे नाहीत का? हा त्यांच्यापेक्षा वेगळा दिसत असल्याने ते याच्याशी झगडा करण्याची शक्यता आहेच. याला त्याच्या मूळ गावी परत पाठवणेच बरे."

तरीही त्या सफेद मोराला घेउन आलेल्या व्यक्तीने का कुणास ठाउक, त्याला आश्रमातच सोडले, आणि परतीचा मार्ग धरला. त्याची काळजी वाहण्याची जबाबदारी कृष्णस्वामी या भक्ताने स्वीकारली. एकदा हा मोर कुठेतरी पळून गेला आणि कृष्णस्वामी मोठ्या सायासाने त्याला पकडून परत घेउन आले. तेव्हा मोराला पाहून रमण महर्षींनी आपला एक हात त्याच्या मानेवर ठेवला आणि दुसर्‍या हाताने त्याच्या काळजापर्यंतच्या भागात हळुवारपणे थोपटत त्याला सौम्यपणे ताकीद दिली, "खट्याळ पोरा, असा अचानक कुठे गायब होतोस रे तू? तू असा निघून जायला लागलास, तर तुझी देखभाल करण्याची व्यवस्था आम्ही लावयची तरी कशी? त्यापेक्षा इथेच कायमचा मुक्काम का करत नाहीस?"

त्या प्रसंगानंतर सफेद मोर आश्रमाच्या प्रांगणातच बागडायचा. क्वचितप्रसंगी आश्रमाच्या परिसरातल्या साधकांच्या झोपडीवजा घरातही तो जायचा. एके दिवशी दुपारी आश्रमवासियांनी त्याला एका झोपडीत रेडिओ ऐकत बसलेला पाहिला. ध्यानधारणेत मग्न झाल्यासारखी मुद्रा करत त्याने डोळे मिटून घेतलेले होते. कुणीतरी बोलूनही दाखवले की हा मोर पहा कसा नादब्रह्मात बुडून गेला आहे. महर्षी म्हणाले, "मोरांना उपजतच स्वरांचे आकर्षण असते. त्यातूनही ते स्वर जर बासरीतून उमटत असतील, तर मग विचारायची सोय नाही, इतके ते स्वरमुग्ध होतात!"

इतक्यात कुणीतरी म्हणाले की सफेद असल्याने हा मोर आगळावेगळा आणि उठून दिसत असला, तरी खरे सौंदर्य मात्र रंगीत मोरांमधेच अधिक प्रमाणात दिसते. यावर रमण महर्षी म्हणाले, "त्या मोरांचे रंग सुंदर आहेतच, पण या सफेद मोरात मात्र 'यासम हाच' असे एक वेगळेच सौंदर्य आहे. इतर रंगाचे मिश्रण मुळीच नसलेला याचा शुद्ध सफेद रंग आगळाच आहे. असे पहा, की जणू ते शुद्ध-सत्व आहे. हे विशुद्ध आत्मतत्व आहे ज्यात त्रिगुणांची किंवा उपाधींची सरमिसळ झालेली नाही. वेदांताच्या परिभाषेत या मोराचेही उदाहरण किती समर्पकपणे मांडता येते ते पहा! नुकताच जन्म झालेल्या इतर मोरांमध्येही इतके रंगसंगती नसते. ते एकाच रंगाचे असतात. जसजशी वाढ होते, तसे बाकी रंग प्रकट व्हायला लागतात. शेपटीची वाढ होते आणि शेपटीवर कित्येक 'डोळे' फुटतात. आणि शेवटी पहाल, तर केवढी ती रंगसंगती आणि किती ते डोळे! आपल्या मनाचेही तसेच आहे. जन्मत:च त्यात विकृतींचा लेशही नसतो. कालौघात मात्र कित्येक घडामोडी, संकल्पना आणि वासना त्यात मोराच्या पिसार्‍याप्रमाणेच भलेबुरे रंग भरतात."

भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्‍या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती. सफेद मोर जेव्हाजेव्हा आश्रमातल्या सभागृहात यायचा, तेव्हा न चुकता तिथल्या लाकडी कप्प्यांमधे व्यवस्थित मांडणी केलेया ग्रंथांच्या रचनेचे जणू परीक्षणच करायचा. हयात असताना हे काम माधव स्वामी पार पाडत असत. माधव स्वामींनी डागडुजी केलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या ग्रंथांना तो न चुकता चोचीने हळुवार स्पर्श करायचा, इतर पुस्तकांना मात्र तो शिवत नसे. हे काम संपले, की दरवाजाजवळच्या ज्या बाकावर बसून माधव स्वामी विश्रांती घेत, त्याच बाकावर त्याच जागी बसून मोरही विश्रांती घेत असे.

स्वत: रमण महर्षी क्वचितप्रसंगी या सफेद मोराला वात्सल्याने "माधवा" अशीच हाक मारायचे. जी. व्ही. सुब्बरामय्या यांनी त्यांच्या 'श्री. रमण स्मृती' या पुस्तकात नमूद केले आहे, "२० जून १९४७ या शुभदिनी मी सफेद मोरावर 'मयूर वृत्तात' तेलगू भाषेत आठ श्लोकांची काव्यरचना केली. 'ज्युबिली पेंडॉल' आहे त्या ठिकाणी भगवानांना ती रचना दाखवली. भगवान ते काव्य वाचून अत्यंत संतुष्ट झालेले दिसले, आणि श्रीमती ललिता वेंकटरामन यांच्याकडे ती सुपूर्त करत भगवानांनी सुचवले की आपल्या वीणावादनाच्या साथीने त्यांनी ती रचना गाण्याचा प्रयत्न अवश्य करावा. जेमेतेम अर्ध्या तासाच्या अवधीत श्रीमती वेंकटरामन यांनी आपली वीणा तिथे आणली आणि त्या गाण्यासाठी सज्जही झाल्या! सफेद मोर मात्र त्या क्षणी तिथे उपस्थित नव्हता. भगवान म्हणाले, "बाकी सारे तर यथायोग्य जुळून आलेले आहे, पण स्वतः कथानायकही आपली स्तुती गायली जात असताना इथे हजर असायला हवा. माधवा, तू आहेस तरी कुठे? लगेच इकडे ये"

अहो आश्चर्यम्! पुढच्याच क्षणी पेंडॉलच्या छपरावरून सफेद मोर डौलाने खाली झेपावला. ललिता वेंकटरामन यांच्या गायनाला आपला पिसारा पूर्णपणे फुलवून मोठ्या झोकात नृत्य करत त्याने दाद दिली. भगवान स्तब्धपणे बसून होते. मोरावर खिळलेल्या त्यांच्या तेजस्वी डोळ्यातून अविरतपणे झरणार्‍या कृपादृष्टीच्या झोतात मोराच्या 'शुद्ध-सत्व' सफेद रंगावरही त्यांच्या कृपेची एक प्रकारची विलक्षण झळाळी आलेली दिसत होती. गायन संपल्यावर मोर त्याच झोकात पदन्यास करत वीणेपर्यंत पोचला आणि तिला आपल्या चोचीने हळुवार स्पर्श करून तिथेच तिष्ठत राहिला.

हे पाहून भगवान श्रीमती वेंकटरामन यांना म्हणाले, "ही रचना आपण परत एकदा सादर करावी अशी माधवाची इच्छा दिसते आहे." श्रीमती वेंकटरामन यांनी आनंदाने ती रचना परत सादर केली. डौलदार पदन्यास करत मोरानेही त्यांना पुन्हा एकदा भरभरून दाद दिली. अत्यंत दुष्प्राप्य असे ते नितांतसुंदर दृष्य पाहणारे रमणभक्त इंद्रादिकांपेक्षाही भाग्यवान होत हे काय वेगळे सांगायला हवे?

 

अभिशाप जीवनाचा (भावानुवाद)

(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद)

आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला
जगणे उदासवाणे, माझे करून गेला

नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा
अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला

हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते
चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला

मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला

दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84

Saturday 3 March 2012

असा अविचार करू नको (स्वैर भावानुवाद)

[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक]
निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको
जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको

खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे
खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको

डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली
साहणे हे तुझेच प्राक्तन, भोगताना विव्हळू नको

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको

हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको

जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू
डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको

(टीप: 'मुक्या' - 'मूकवाचक' या  टोपणनावाने केलेले लिखाण )

झेन काव्य - 2 (भावानुवाद)

[झेन काव्याचा भावानुवाद]

(साथीच्या आजारात दगावलेल्या मुलांना श्रद्धांजली)

जेव्हा वसंताचे आगमन होईल
वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी
पुन्हा नव्याने फुले बहरतील,
पण ती कोवळी मुले
जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली
आता कधीच परतणार नाहीत.
---
वादळ शांतवले आहे, सारा बहर झडून गेला आहे;
पक्षी गात आहेत, पर्वतान्वरची काजळमाया गहिरी झाली आहे --
हेच तर खरे बुद्धत्वाचे अलौकिक सामर्थ्य आहे.
---
माझा वारसा --
काय बरे असेल तो?
वसंतातला फुलांचा बहर,
दग्ध उन्हाळ्यातले कोकिळेचे कूजन,
आणि पानगळीच्या काळातले उघडेबोडके लालजर्द मॅपल्स ...
---
मूळ काव्य -
When spring arrives
From every tree tip
Flowers will bloom,
But those children
Who fell with last autumn’s leaves
Will never return.
---
The wind has settled, the blossoms have fallen;
Birds sing, the mountains grow dark --
This is the wondrous power of Buddhism.
---
My legacy --
What will it be?
Flowers in spring,
The cuckoo in summer,
And the crimson maples
Of autumn...

Tuesday 3 January 2012

'योगवसिष्ठ' ग्रन्थातला एक अप्रतिम वेचा (भावानुवाद)

An excerpt from 'Yogvasishta' endorsed by Bhagavan Ramana Maharshi -

"Steady in the state of fullness, which shines when all desires are given up, and peaceful in the state of freedom in life, act playfully in the world, O Raghava!"

"Inwardly free from all desires, dispassionate and detached, but outwardly active in all directions, act playfully in the world, O Raghava!"

"Free from egoism, with mind detached as in sleep, pure like the sky, ever untainted, act playfully in the world, O Raghava!"

"Conducting yourself nobly with kindly tenderness, outwardly conforming to conventions, but inwardly renouncing all, act playfully in the world, O Raghava!"

"Quite unattached at heart but for all appearance acting as with attachment, inwardly cool but outwardly full of fervour, act playfully in the world, O Raghava!"

---------------------------

भावानुवाद

भगवान रमण महर्षींनी उद्धृत केलेला 'योगवसिष्ठ' ग्रन्थातला एक वेचा -

हे राघवा, सगळ्या कामनांचा त्याग केल्यावर स्वभावतः प्रकाशित होणार्या पूर्णत्वाच्या अवस्थेत स्थिर हो. शांतचित्ताने जीवनात लाभलेल्या त्या उन्मुक्त अवस्थेत हसत खेळत या जगात आपले विहित कर्म करत रहा.

हे राघवा, अंतर्यामी पूर्णपणे निरीच्छ, आवेगहीन आणि विरक्त हो. बाह्यतः मात्र जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर ओतप्रोत उत्साहाने कार्यरत राहून हसत खेळत या जगात आपले विहित कर्म करत रहा.

हे राघवा, अहंभावापासून मुक्त हो. मनाला निरभ्र आकाशासारखे, नित्य निर्मळ आणि जणू प्रगाढ निद्रेत असल्याप्रमाणे अलिप्त ठेवत हसत खेळत या जगात आपले विहित कर्म करत रहा.

हे राघवा, बाह्यतः सगळे विधीनिषेध पाळत, कारुण्यमय सौहार्दाचे सदाचरण करत, अन्तर्यामी मात्र मनोभावे सर्वसंगपरित्याग करत हसत खेळत या जगात आपले विहित कर्म करत रहा.

हे राघवा, अन्तःकरणातून सगळ्या जगाविषयी पूर्णपणे निर्मम होत, बाह्यान्गी मात्र लिप्तता आहे असे भासवत सगळे व्यवहार कर. अंतर्यामी शान्तचित्त मात्र बाह्यतः जोमाने सक्रिय राहून हसत खेळत या जगात आपले विहित कर्म करत रहा.