Monday 6 July 2020

सारांश ...

प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप
'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत.
प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणीअध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्‍या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्‍या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.
प्रकरण ३ - ज्ञानी
ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान! गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.
प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)
मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही. देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे.
प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)
या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्‍या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो. पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते. तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.

प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)

'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे. मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.
प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण
जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते. अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत.
प्रकरण ८ - गुरूतत्व
ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्गुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते. आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.
प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्यभारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहे. साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत.
प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता
जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी 'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते. नानाविध मानसिक विभ्रमांचे मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.
प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरणदीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.
प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवनआपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्‍यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही. अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम - संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.
प्रकरण १3 - योगिक प्रक्रियाहठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.
प्रकरण १४ - समाधीसहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.
प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धीहेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे.
प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या
शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, उत्कट भावभावनांचे मानसिक स्थिती सतत दोलायमान ठेवणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येत असल्याचे लक्षात येते. श्री रमण महर्षींचा कल मात्र उघडपणे 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच सुखद अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने/ साधिकेने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला/ तिला तितक्याच तत्परतेने मार्गदर्शन करत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.
प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व
अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो. अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. सृष्टी - दृष्टी वाद या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत. आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो.
प्रकरण १८ - पुनर्जन्मदेहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते. त्या पैकी काहींचा असा दावा आहे की जीवात्मा स्वर्ग किंवा नरकात जातो, तर काहींचा असा दावा आहे की जीवात्मा नवा देह धारण करून पुनर्जन्म घेतो. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म तर सोडाच, (आत्मस्वरूपाचा) जन्म आणि मृत्यु देखील संभवत नसल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.
प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप
ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).
प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकतादु:ख भोगणारा जीव, जगत आणि ईश्वर हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते. जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता.
प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य
श्री रमण महर्षींना कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.

Friday 3 July 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य

या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे भोगावीच लागतात - चांगल्या कृत्यांची चांगली फळे मिळतात, तर वाईट कृत्यांचे दु:खद परिणाम भोगावे लागतात. हाच सिद्धांत पुढे असे सांगतो की कर्मफलांचे सारे 'संचित' त्याच जन्मात भोगावे लागणे क्रमप्राप्त नसल्याने शिल्लक राहिलेला भाग पुढच्या जन्मात भोगावा लागतो. (जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्वसंचीत केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले - समर्थ रामदास स्वामी) त्यामुळे कर्माचे विविध प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. हिंदूंच्या विविध दर्शनांमधे ('schools of thought') उल्लेख असलेल्या पुढील वर्गीकरण पद्धतीचा संदर्भ श्री रमण महर्षी देत असतः
१. संचित कर्मः पूर्वजन्मांमधे साठलेले कर्मांचे ऋण
२. प्रारब्ध कर्मः संचित कर्माचा एक उपसंच, जो या जन्मी भोगणे भाग पडते. कर्माचा सिद्धांत मानवी जीवनातल्या सगळ्या घटना पूर्वनियोजीत असतात असे प्रतिपादन करत असल्याने प्रारब्ध या शब्दाचा अर्थ 'नियती' या स्वरूपात देखील घेतला जातो.
३. आगामी कर्मः या जन्मी केलेल्या कृत्यांमुळे आणि विचारांमुळे संचितात सतत पडत असलेली भर. या पैकी उर्वरित कर्मभोग पुढच्या जन्मात भोगावा लागतो.
श्री रमण महर्षींना उपरोक्त कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. क्वचित प्रसंगी महर्षी असे देखील सांगत असत की एखादी व्यक्ती तिच्या जीवनात करत असलेली प्रत्येक कृती तसेच तिला जीवनभर येत गेलेले सगळे अनुभव तिच्या जन्माच्या वेळीच निर्धारित केलेले असतात. त्यामुळे आपल्याला जर काही स्वातंत्र्य असेल तर ते इतकेच आहे की कर्ता किंवा अनुभोक्ता (सच्चिदानंद स्वरूपापेक्षा विभक्त स्वरूपात) अस्तित्वातच नाही हे जाणून घेणे! आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.
श्री रमण महर्षी कर्माच्या सिद्धांताला ईश्वरी संकल्पाचे प्रकट स्वरूप मानत असत. ते असा उपदेश देत असत की आत्मसाक्षात्कार होण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या प्रारब्धावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य-सदृश स्वरूपातला ईश्वर मानावाच लागतो. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कर्मांचे परिणाम भोगावेच लागतील असा दंडक या ईश्वरानेच घालून दिलेला आहे. प्रत्येक जीवाला संचित कर्मापैकी कुठला भाग कुठल्या जन्मी भोगावा लागेल याची निवड देखील ईश्वरच करतो. आत्मस्वरूपाचा बोध करून घेत कर्मबंधनाची लक्ष्मणरेषा लांघून पुढे जाणे हा एकमेव मार्ग मुक्तीच्या दिशेने जाणारा आहे. देहतादात्म्याने तसेच कर्ताभावाने वावरत असलेल्या व्यक्तीला ईश्वरी न्यायसत्तेच्या अधिकारक्षेत्राबाहेर अन्य कुठल्याही मार्गाने पळून जाता येत नाही.
प्रश्नः देहपात होईपर्यंत प्रारब्ध भोगावे लागते असे मानले जाते. देह अस्तित्वात असतानाच प्रारब्धावर मात करणे शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जड देह आणि सच्चिदानंद स्वरूप यांच्या मधे शिरकाव केलेल्या अहंकार या तिसर्‍या घटकावर कर्माची गती अवलंबून आहे. जिथे कर्माच्या सिद्धांताची सत्ता चालते तो अहंकारच जर त्याच्या उगमस्थानी (स्व-स्वरूपात) विलीन होत शून्यवत झाला, तर पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असलेली कर्माची गती आपोआप थांबते. जिथे 'अहं' नाही तिथे कर्माची गती आपोआप खुंटते.
प्रश्नः अशी कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे जी संचित कर्माचा एक छोटासा हिस्सा निवडते, आणि असे ठरवते की तो अमुक एका जन्मात प्रारब्धाच्या स्वरूपात भोगावा लागेल?
रमण महर्षी: प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळे भोगणे अनिवार्य असले, तरी त्याचे/ तिचे हित साधता येईल अशा दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न ईश्वरी सत्ता करते. ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असला तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदापि करत नाही. मानवाचे अचेतन मन चांगल्या आणि वाईट कर्मांचे भले मोठे गोदाम आहे. याच गोदामातून त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाला सहाय्यभूत ठरेल अशा गोष्टींची, मग त्या सुखद असोत किंवा दु:खद, नेमकी निवड ईश्वर करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट यदृच्छेने कधीच घडत नाही.
प्रश्नः आम्ही आज जे अनुभवतो आहोत ते प्राग्जन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. आम्ही पूर्वी केलेल्या चुका जर आम्हाला समजल्या, तरच आम्हाला त्या दुरूस्त करता येतील.
रमण महर्षी: तुम्ही एखादी चूक दुरूस्त केलीत असे गृहीत धरले, तरी तुम्हाला असंख्य जन्म घ्यावे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जन्मोजन्मी गोळा केलेले संचित कर्म शिल्लक उरते. त्यामुळे आपण विचारणा करत आहात ती पद्धत मुळातच चुकीची आहे. तुम्ही कर्माच्या वृक्षाची जितकी छाटणी कराल, तितक्याच जोमाने त्याची वाढ होते. तुम्हाला कर्म-वृक्षाचे मूळ शोधून काढून ते छाटून टाकावे लागेल.
प्रश्नः कुठलेही नियोजन न करता किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न न करताच एखादी भोग्य वस्तू मला विनासायास मिळाली, आणि मी तिचा उपभोग घेतला, तर (कर्माच्या दृष्टीने) तिचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत, नाही का?
रमण महर्षी: तसे होत नाही. प्रत्येक कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. प्रारब्धवशात एखादी गोष्ट तुमच्या नशिबी आली, तर तुम्हाला ती टाळता येत नाही हे खरे आहे. ती गोष्ट अधिक प्रमाणात मिळावी, किंवा त्या अनुभवाची पुनरूक्ती व्हावी अशी भावना न ठेवता, त्या गोष्टीबाबात फारशी आसक्ती न बाळगता तुम्ही तिचा स्वीकार केलात तर 'जन्म घेणे लागे वासनांचे संगे' या उक्तीप्रमाणे आगामी जन्मांना कारणीभूत ठरून ती तुमचे नुकसान करणार नाही. याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की त्या गोष्टीचा उपभोग घेताना तुमची आसक्ती वाढली आणि साहजिकच ती अधिक प्रमाणात मिळावी अशी तुमची वासना बळावली; तर अशा वासनांची परिणती अपरिहार्यपणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' अशा शृंखलेत होते.
प्रश्नः एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना (जन्मस्थान, जन्मत:च मिळणारे ठराविक देशाचे नागरिकत्व, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाची निवड किंवा व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख, लग्न, अपत्यप्राप्ती) पूर्णपणे कर्मप्रारब्धानुसार घडतात हे मी समजू शकतो, पण तिच्या संपूर्ण जीवनपटातला एकून एक तपशील संगतवार लक्षात घेतला तर अत्यंत गौण ठरतील अशा कार्यकलापांसकट तिने केलेली प्रत्येक कृती आधीच निश्चीत झाली असावी हे कसे शक्य आहे? (रमणाश्रमात त्या काळी विद्युत उपकरणे नव्हती) आता क्षणभर इकडे लक्ष द्या. माझ्या हातात असलेला पंखा मी नुकताच खाली ठेवला. मी अमुक एके दिवशी, अमुक वाजून अमुक मिनीटांनी आधीच ठरलेल्या कालावधीपुरता वापर करून झाला की तो पंखा आधीच ठरलेल्या ठिकाणी खाली ठेवला - हे सगळे पूर्वनिर्धारीत आहे का?
रमण महर्षी: खचितच. देह करत असलेली प्रत्येक कृती आणि त्याला ज्या ज्या अनुभवांमधून जावे लागते ते सारे अनुभव या दोन्ही गोष्टी देह अस्तित्वात येतो तेव्हाच ठरलेल्या असतात.
प्रश्नः मग मानवाला असलेल्या कर्म स्वातंत्र्याला किंवा आपण करत असलेल्या कृत्यांची त्याने/ तिने जबाबदारी घेण्याला काय अर्थ उरतो?
रमण महर्षी: देहतादात्म्यापासून मुक्त होण्याचे सामर्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानप्राप्तीचा निदीध्यास घ्यावा आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने स्वरूपज्ञान प्राप्त करावे या एकाच बाबतीत मानव स्वतंत्र आहे. मानवी देह अटळ असलेल्या प्रारब्धाप्रमाणे पूर्वनिर्धारीत कार्यकलापातून जाण्यासाठी बाध्य असतो. देहाशी तादात्म्य साधून कर्मफलात गुंतून पडायचे, की कर्मफलात आसक्ती न ठेवता प्रारब्धवशात होत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचे निव्वळ साक्षी बनून रहायचे ही एकच गोष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र मानवाकडे प्रत्येक क्षणी असते.
पुरवणी:
समसामयिक असलेले रमण महर्षी आणि आईनस्टाईन हे आपापल्या प्रांतातले दिग्गज प्रत्येक गोष्ट पूर्वनिर्धारीत असते (Everything is predetermined) असे मानत होते. त्या संदर्भात गॅरी वेबर यांनी केलेल्या विवेचनाचा दुवा देत लेखमालेचा समारोप करतो -

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

Wednesday 1 July 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता

या प्रकरणात मानवी जीवनातल्या दु:ख, व्यथा तसेच नैतिकतेविषयी भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

ईश्वरवादी सिद्धांतप्रणालींमधे स्पष्टपणे दिसत असलेल्या विसंगती आणि विरोधाभासांचा उलगडा करण्यात गेली कित्येक शतके पाश्चात्य जगतातले ब्रह्मवेत्ते आणि तत्वज्ञानी गुंतुन पडलेले आहेत. वानगीदाखल सांगायचे तर - ईश्वर आपली कामे (विश्वनिर्मिती) करताना चुकत नसेल, तर जगात इतके पाप, ताप, दैन्य तसेच अनिर्बंधपणे विघातक कृत्ये करत असलेल्या दुष्ट प्रवृत्ती का आहेत? सर्वशक्तीमान ईश्वराकडे पाप, ताप, दैन्याचा तत्क्षणी परिहार करण्याचे तसेच  दुष्ट प्रवृत्तींचे क्षणार्धात निर्दालन करण्याचे करण्याचे सामर्थ्य असूनही तो या गोष्टींकडे कानाडोळा का करतो?

जीव, जगत आणि ईश्वर ही तीन तत्वे निर्विवादपणे अस्तित्वात आहेत, तसेच ती स्वयंसिद्ध आहेत असे बहुतांशी सगळ्याच धर्मांनी गृहीत धरलेले आहे. महर्षी मात्र असे सांगत असत की एकाच महत्तत्वाचे तीन प्रकारे प्राकट्य होते, किंवा उपरोक्त तिन्ही तत्वांचे स्वायत्त अस्तित्व सतत अबाधित असते - हे दोन्ही सिद्धांत मांडणे अहंता (व्यक्तिगत 'मी' ची जाणीव) अस्तित्वात असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. दु:ख भोगणारा जीव, जगत आणि  ईश्वर  हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत.

महर्षी असे सांगत असत की दुष्कृत्यांमुळे दु:खाची तीव्रता वाढत असल्याने दुष्टबुद्धीने कुठलेही कृत्य करणे टाळलेच पाहिजे, मात्र दुष्कृत्ये हे दु:खनिर्मितीमागचे मूळ कारण नाही.  महर्षींच्या मते परस्परांशी तसेच जगातल्या इतर सजीव/ निर्जिव सृष्टीबरोबर क्रिया प्रतिक्रिया करण्यात गुंतलेली आपण स्वायत्त, स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत या मनोनिर्मीत संकल्पनेला सत्य मानून जगणेच दु:खाचे मूळ कारण आहे. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या  भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. महर्षींचे मूलगामी विवेचन लक्षात घेतले तर निरंतर विश्लेषण, चिकीत्सा आणि भेदभाव करण्यात गुंतलेले मानवी मनच दु:ख निर्माण करते; किंबहुना मनाला लागलेल्या या अनिष्ट वळणाचीच स्वाभाविक परिणती अपरिहार्यपणे दु:ख भोगावे लागण्यात होते असे म्हणावे लागेल. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते.

महर्षींच्या विवेचनाला आपल्या अनुभवांशी पडताळून पाहिल्यावर बहुतांशी प्रश्नकर्त्यांना व्यक्तिगत पातळीवर ते मान्य करण्यात अडचण नसली, तरी जगात सर्वत्र सातत्याने दिसणारे दु:ख फक्त द्रष्ट्याच्या मनातच अस्तित्वात आहे ही संकल्पना मात्र कित्येकांच्या पचनी पडत नसे. महर्षी मात्र या बाबतीत आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम होते, ते कितीही फिरवून फिरवून प्रश्न विचारले तरी आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळत नसत असे स्पष्टपणे दिसून येते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते.

रमण महर्षी इतरेजनांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करण्याचा उपदेश आपल्या अनुयायांना देत असत असा त्यांच्या भूमिकेचा अन्वयार्थ लावणे पूर्णपणे चुकीचे, अन्याय्य आणि दुर्दैवी ठरेल. या बाबतीत व्यवहारज्ञानाशी अधिक सुसंगत भूमिका घेत आत्मसाक्षात्कार होण्याआधी साधकांनी स्वत:प्रमाणेच इतरेजनांचेही दु:ख खरेच आहे असे मानून ते दूर करण्यासाठी यथाशक्ती यथामति पावले उचलली पाहिजेत (आत्मौपम्य बुद्धीने वावरले पाहिजे) असा उपदेश महर्षी देत असत.  त्या जोडीलाच 'माझ्या तुलनेत दुर्दैवी (आर्थिक, बौद्धिक, सामाजिक प्रतिष्ठा किंवा अन्य बाबतीत खालच्या पातळीवर) असलेल्या लोकांवर मी उपकार करतो आहे' तसेच 'मीच या  दुर्दैवी लोकांचा तारणहार आहे' अशा अहंतेला (निकृष्ट पातळीवरच्या मनोव्यापाराला) थारा न देता  इतरेजनांना मदत करता आली, तरच पारमार्थिक लाभ होतो अन्यथा नाही ही बाब महर्षी नेहेमी त्यांच्या अनुयायांच्या निदर्शनास आणून देत असत.

जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता.  धार्मिक किंवा अध्यात्मिक जगतात नैतिकतेचा बडिवार माजवण्याची प्रदीर्घ परंपरा असली, तरी महर्षींनी मात्र अगदीच नाईलाज असेल तरच नैतिकतेच्या संदर्भात काहीशा नाखुशीनेच एखाद दुसरे वक्तव्य केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.नैतिकतेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एखाद्या प्रश्नकर्त्याने महत्प्रयासाने महर्षींवर दबाव आणला, तर आत्मशोध घेणे हे एकमेव कृत्य माझ्या मते सदासर्वकाळ आणि निर्विवादपणे योग्य ठरणारे आहे, तेव्हा आपण तेच हाती घ्या असे सांगून महर्षी मूळ प्रश्नाला बगल देत असत.

प्रश्नः जग दु:खाच्या खाईत लोटले जात आहे. आपल्या मते त्या मागचे कारण काय आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही व्यक्तिगत तसेच सामूहिक पातळीवर काय करायला हवे?
रमण महर्षी: स्वत:चे खरे स्वरूप जाणून घ्या. तेवढी एकच गोष्ट साध्य करणे पुरेसे आहे.

प्रश्न: बंध किंवा मोक्ष हे वास्तविक पाहता अस्तित्वातच नसतील, तर आम्हाला सुख आणि दु:खाचा खराखुरा अनुभव येण्यामागे काय कारण आहे?
रमण महर्षी: एखादी व्यक्ती जेव्हा तिच्या मूळ (सच्चिदानंद) स्वरूपापासून ढळते, तेव्हा सुखदु:खे खरी वाटायला लागतात. ती खरे सांगायचे तर अस्तित्वातच नसतात.

प्रश्नः जर ईश्वरच 'सबकुछ' आहे, तर आपण केलेल्या कृत्याचे दु:खद परिणाम एखाद्या व्यक्तीला का भोगावे लागतात? जी कृत्ये केल्याने व्यक्तीला दु:ख भोगावे लागते, ती ईश्वरी संकेतानुसार होत नाहीत?
रमण महर्षी: 'मी कर्ता आहे' या भूमिकेतून जो वावरतो, त्यालाच सुख किंवा दु:ख भोगणे भाग पडते.

प्रश्नः पण सगळी कृत्ये तर ईश्वरी संकेतानुसार घडतात, व्यक्ती ही फक्त ईश्वरी सत्तेच्या हातातले एक साधन असते.
रमण महर्षी: हा तर्क तुम्ही फक्त दु:ख भोगावे लागले की वापरता, विनासायास सुख मिळाल्यावर नाही. 'मी ईश्वरी सत्तेच्या हातातले निव्वळ एक उपकरण आहे' अशी शरणागत भूमिका तुम्ही स्थळ, काळ आणि परिस्थितीची पर्वा न करता सुखदु:खाच्या सगळ्या प्रसंगात सातत्याने निभावली, तर दु:ख तुमच्या जीवनातून आपोआप  हद्दपार होईल.

प्रश्नः जगात कित्येक महान व्यक्ती आहेत, समाजसेवक आहेत, मात्र त्यांना कुठलाही प्रश्न पुरता सोडवता येत नाही. सर्वत्र पसरलेली अनागोंदी आणि दुरावस्था कमी करता येत नाही.
रमण महर्षी: अशा व्यक्ती बहुतांशी अहं-केंद्रित असतात, आणि तेच त्यांच्या असहायतेचे कारण आहे. हेच लोक स्वरूपात स्थित असते, तर त्यांची गती काही वेगळीच झाली असती.

प्रश्नः ज्ञानी किंवा महात्मे मदत का करत नाहीत?
रमण महर्षी: आपण हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढला की ते मदत करत नाहीत? जगभरची समाजहितासाठी चाललेली दांभिक प्रवचनबाजी, तथाकथित सामाजिक कार्यच नव्हे तर आवश्यक वस्तुंचा पुरवठा या स्वरूपात चाललेले ठोस स्वरूपाचे मदतकार्य या तिन्ही गोष्टी एका बाजूला आणि महात्म्यांचे मौन तेवढे दुसर्‍या बाजूला -  यात तुलना केली तर महात्म्यांच्या मौनाचे पारडेच नि:संशयपणे भारी पडेल! (न बोलताच) ज्ञानी इतरांच्या तुलनेत खूप काही साध्य करून जातो.

प्रश्नः कर्म करत असलेल्या व्यक्तीच्या मनात असलेल्या हेतूंचे काय? प्रत्येक कृत्यामागचा कर्त्याचा हेतू महत्वाचा नसतो?
रमण महर्षी: प्रामाणिकपणे, प्रेमपूर्वक, साधनशुचिता पाळून आणि शांत मनाने केलेले कुठलेही कृत्य हे सत्कृत्यच आहे. वासनांनी डागाळलेले, अहंतेचा दंश असलेले आणि मनाचा क्षोभ करणारे कुठलेही कृत्य दुष्कृत्यच ठरते. 'ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड' असा विचार करत कुठलेही सत्कृत्य गैरमार्गाने करू नका. गैरमार्गाने केलेले सत्कृत्य देखील शेवटी दुष्कृत्यातच परिणत होते. त्यामुळे कर्म करण्यामागच्या सद्भावनेइतकेच कर्म करण्यासाठी स्वीकारलेल्या पद्धतीच्या साधनशुचितेचे महत्व आहे.

प्रश्नः मुक्ती मिळवण्यासाठी सदाचरण करणे पुरेसे नाही का?
रमण महर्षी: कोणासाठी मुक्ती? मुक्तीची ईच्छा धरणारा कोण आहे? सदाचरण म्हणजे 'सत आचरण', आपल्याला या शब्दाने नेमके काय अभिप्रेत आहे? काय योग्य आहे आणि काय अयोग्य याचा निवाडा कोण करणार? तो कोणत्या निकषांवर करणार? आपापल्या पूर्वसंस्कारांच्या, धारणांच्या आणि पूर्वग्रहांच्या मोजपट्टीने प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा करत बसते. खरे सांगायचे झाले तर वास्तविकतेचा यथार्थ आणि परिपूर्ण बोध झाला तरच योग्य काय आणि अयोग्य काय हे आपोआप लक्षात येते. मुक्तीची आस ज्याच्या मनात आहे त्या 'मी' चे खरे स्वरूप जाणून घेणे हाच त्यासाठीचा राजमार्ग आहे. बंधनात वावरत असल्याच्या भ्रमात असलेल्या खोट्या 'मी' ला किंवा अहंतेला (अध्यात्मिक साधनेने) तिच्या उगमस्थानाप्रत मागे नेत मूळ (सच्चिदानंद) स्वरूपात विलीन करून टाकणे हेच प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे ठरेल असे खरे सदाचरण आहे. 

पुरवणी:

स्वरूपज्ञान झाल्याने दु:खाचे मूळ कारणच नाहीसे झाल्याचे वर्णन पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी असे केले आहे:

छाया तैसा देह, मानितो स्वभावे, नाही आम्हा ठावे, सुख-दु:ख
जन्म-मरणाचा, संपला संसार, झाला साक्षात्कार, स्वरूपाचा
कैचा देश-काळ, विश्व चि केवळ, माया-मृगजळ, कळो आले
स्वामी म्हणे आम्ही, अनादि अनंत, सुख-दु:खातीत, स्वयंसिद्ध

अंतर्यामी अवधूत स्थितीत असलेल्या ज्ञान्यासाठी विधी-निषेधांचे महात्म्य उरत नाही हे स्वामीजींनी असे सांगितले आहे:

नेणे विधी ना निषेध, नेणे पाप-पुण्य-बंध
नेणे लौकिक-संबंध, जगी वागतो स्वच्छंद
घर दार ना संसार, सदा राहे निराधार
स्वामी म्हणे संतजन, तया कैचे जगद्भान!

Tuesday 30 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप

वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो.
या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
प्रथमदर्शनी भगवान रमण महर्षींनी ईश्वराविषयी केलेली विधाने एकमेकांशी विसंगत असल्याने तसेच काही बाबतीत ती परस्पर विरोधी देखील असल्याने कोड्यात टाकणारी वाटतात. प्रसंगोप्पात त्या त्या संदर्भानुसार परमेश्वर कधीच काही करत नाही (तो सदैव अकर्ता असतो), तर कधी ईश्वरी संकल्पाविना झाडाचे पान देखील हलत नाही अशी विधाने ते करत असत. कधी ईश्वर ही एक मनोनिर्मीत संकल्पना आहे, तर कधी ईश्वर ही चराचराला व्यापून दशांगुळे उरणारी एकमेव वस्तुस्थिती किंवा सद्वस्तु (सत्य) असल्याचे ते सांगत असत. प्रश्नकर्त्यांच्या आकलनक्षमतेतला तसेच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीतला फरक लक्षात घेतला, तर महर्षींसमवेत त्यांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद होत असल्याचे जणू प्रतिबिंबच महर्षींनी दिलेल्या वरपांगी पाहता विसंवादी वाटत असलेल्या उपदेशांमधे स्पष्टपणे दिसून येते.
सगुण साकार स्वरूपात ईश्वराची भक्ती करत असलेल्या साधकांचा बुद्धिभेद न करता देव मनुष्य-सदृश स्वरूपात अस्तित्वात आहे या गृहीतकार आधारित असलेले विवेचन महर्षी करत असत. ईश्वरच सृष्टीचा निर्माता आहे, श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलावा तसे आपल्या दैवी शक्तीने तोच जगाचा भार वाहतो आहे, सगळ्या जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याची काळजी तोच घेतो आहे, तसेच ईश्वरी संकल्पाच्या विरोधात गेले असता काहीही साध्य करता येत नाही - साधारणत: अशा स्वरूपाचा उपदेश सगुण साकार उपासकांना महर्षी देत असत. साधकाचे/ साधिकेचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जोवर अस्तित्वात आहे, तोवर सगुण साकार ईश्वरभक्ती उपकारक आहे (किंवा तोच चित्तशुद्धीचा राजमार्ग आहे) हा महर्षींच्या शिकवणीचा गाभा होता. (हाच मार्ग पुढे अनन्य शरणागतीच्या/ समर्पणभावाच्या आणि ओघानेच आत्मज्ञानप्राप्तीच्या दिशेने जातो. 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे महर्षी नेहेमी सांगत असत).
त्या उलट सगुण साकाराविषयी आकर्षण नसलेल्या (निर्गुण निराकाराकडे ओढा असलेल्या) साधकांना ईश्वर आणि ईश्वरी सत्तेविषयीच्या उपरोक्त संकल्पना 'अथ ते इति' मनोनिर्मीत असून प्रत्येकाच्या अंतर्यामी जन्मजातच लाभलेल्या ईश्वरी प्रचितीचा/ सच्चिदानंद स्वरूपाचा (हृदयस्थो जनार्दनः) अनुभव घेण्यात त्या बाधक ठरतात असा उपदेश महर्षी देत असत. महर्षींच्या सर्वोच्च पातळीवरच्या उपदेशात 'ईश्वर' तसेच 'स्व-स्वरूप' या शब्दांचा प्रयोग आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्या स्वयंसिद्ध स्वसंवेद्य परतत्वाची (सर्वेश्वराची) प्रचिती येते, त्या अद्वैतानुभूतीचेच जणू ते समानार्थी शब्द असावेत अशा प्रकारे केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महर्षींच्या उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. ईश्वराची (द्वैतभावाने) प्रचिती घेणे असा ईश्वरी साक्षात्काराचा अर्थ होत नाही, उलट साधक आणि ईश्वर यांच्या संबंधातला द्वैतभाव नष्ट झाल्यावर साधकाचा आपल्या स्वायत्त अस्तित्वाचा भ्रम लयाला गेल्याने त्याला एकतत्वाचा बोध होतो असा अर्थ महर्षींना अभिप्रेत आहे या त्यांनी वेळोवेळी केलेल्या विवेचनातून स्पष्ट होते (उदाहरणः अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्य तत्त्वी ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज).
भगवान रमण महर्षींनी आत्मानुभवाच्या पातळीवरून केलेल्या ईश्वरविषयक विवेचनाचा गोषवारा असा घेता येईलः
१. ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे.
२. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही.
३. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).
सर्वेश्वराव्यतिरिक्त हिंदू पुराणांमधे नॉर्स किंवा ग्रीक पुराणांप्रमाणेच बहुविध देव/ देवतांचे वर्णन केलेले आहे. याच देव/ देवता सांप्रतच्या काळात हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ट्य झाल्याचे दिसून येते. या देव देवता त्यांची उपासना करत असलेल्या लोकांइतक्याच सत्य आहेत असे सांगून महर्षी कित्येकांना आश्चर्याचा धक्का देत असत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर ईश्वर (एकेश्वरवादी) असेल किंवा बहुविध देव/ देवता (इष्टदैवत या स्वरूपात) असतील; साधकांच्या दृष्टीने पाहता त्यांचे प्राक्तन एकसारखेच असते (देवतेचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, साधकच उपास्य देवतेत विलीन होऊन जातो) हे महर्षीं मान्य करत असत. साक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याआधी विश्वाचे संचलन करत असलेल्या सर्वोच्च ईश्वरी सत्तेने नेमेलेले विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे उच्चपदस्थ अधिकारी अशा स्वरूपात देव/ देवतांचे पूजन करणे किंवा त्यांची सकाम उपासना करण्याला देखील महर्षी मान्यता देत असत.
प्रश्नः ईश्वराचे वर्णन सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोन्ही पद्धतींनी केले जाते. सगुण साकार ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपातच अवघे जग समाविष्ट आहे असे मानले जाते. असे असेल तर या जगाचाच एक घटक असलेल्या आम्हाला परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाचा सहजतेने प्रत्यय यायला हवा.
रमण महर्षी: ईश्वराच्या तसेच जगाचा स्वरूपाविषयी किंवा सत्यासत्यतेविषयी निर्णय घेण्याआधी तुम्ही स्व-स्वरूपाची ओळख करून घेणे तुमच्या हिताचे आहे.
प्रश्नः स्व-स्वरूपाचा बोध झाल्यानेच ईश्वरी साक्षात्कार घडेल?
रमण महर्षी: खचितच, देव तुमच्या अंतर्यामी आहे.
प्रश्न: मग स्व-स्वरूपाला जाणून घेण्यात किंवा ईश्वरी साक्षात्कार होण्यात अडसर कशाचा आहे?
रमंण महर्षी: इतस्ततः भटकणारे मन आणि जगण्याची विपर्यस्त पद्धत.
प्रश्नः ईश्वर ही एक व्यक्ती आहे का?
रमण महर्षी: होय, ईश्वर नेहेमीच प्रथमपुरूषी एकवचनी ('मी' चे शुद्ध चैतन्यस्वरूप) असतो, तो नेहेमी दत्त म्हणून तुमच्या पुढ्यात उभा असतो. तुम्ही जागतिक घडामोडींना अवास्तव महत्व देत असल्याने तो दृष्टीआड होतो. तुम्ही अवांतर गोष्टींमधे स्वारस्य घेणे थांबवले आणि केवळ ईश्वरप्राप्तीचाच मनोमन ध्यास घेतला तर (अवांतर गोष्टी दृष्टीआड होत) सच्चिदानंद स्वरूपात फक्त त्याचेच प्राकट्य शिल्लक उरते.
प्रश्नः आपण असे सांगता की ईश्वरविषयक मांडलेली कुठलीही व्याख्या, मग ती कितीही उच्च उदात्त आणि महान असेल, तरी ती निव्वळ संकल्पनाच असते. याचा अर्थ असा घ्यावा का की ईश्वरच अस्तित्वात नाही?
रमण महर्षी: नाही, (ज्याच्याविषयी कुठलीही संकल्पना शब्दात मांडता येत नाही असे) ईश्वराचे अस्तित्व नित्यसिद्ध आहे.
प्रश्नः मी जेव्हा जेव्हा सगुण साकार रूपात ईश्वराचे पूजन करतो, दर वेळी आपण काही चूक तर केली नाही ना असा एक संदेह माझ्या मनात निर्माण होतो. अमर्याद असलेल्या ईश्वराला मर्यादेत बंदिस्त करणे, निराकाराला साकार स्वरूपात भजणे हा एक प्रकारचा प्रमादच नाही का? त्याच वेळी निर्गुण निराकार स्वरूपात ईश्वरी उपासना करताना सातत्य ठेवणे मला कठिण जाते.
रमण महर्षी: तुम्ही विशिष्ट नावाने पुकारले असता लगेच प्रतिसाद द्याल की नाही? तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे? आपल्या स्वरूपाचा बोध होत नाही तोवर ईश्वरी उपासना सुरू ठेवा, ती सगुण साकार किंवा निर्गुण निराकार स्वरूपात असल्याने काही फरक पडत नाही.
पुरवणी:
पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी केलेले मार्गदर्शन अध्यात्मिक साधकांच्या दृष्टीने मोलाचे आहे:
शब्दाचे पांडित्य, कल्पनेच्या गोष्टी, वाउगी चावटी, करू नये
तेणे पोटी उठे, दंभ अभिमान, आत्म-समाधान दूर राहे
गोडी कळावया, द्यावा गूळ खाया, देव ओळखाया, स्वानुभव
स्वामी म्हणे नाही, पांडित्याचे काम, स्वये आत्माराम, दाखवावा
(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत संजीवनी गाथा)
स्वामीजींची वर-प्रार्थना अशी आहे:
उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर ||१||
काम-क्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी | अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरी साजिरी ||२||
शरीरी हि घरी दारी स्त्रीपुत्रादि परिग्रही | अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही ||३||
नको धन नको मान नको लौकिक आगळा | सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा ||४||
नको भोग नको त्याग नको विद्या नको कला | अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला ||५||
नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी | राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ||६||
मी-माझे मावळो सर्व तू तुझे उगवो अता | मी-तूपण जगन्नाथा, होवो एक चि तत्वता ||७||
देव-भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता | दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला आता ||८||
(संदर्भः स्वामी स्वरुपानंद कृत भावार्थ ज्ञानेश्वरी)

Sunday 28 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती विषयक सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व

या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती. ती साध्य करायची असेल तर तर्कवितर्क करण्यात वेळ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती (साधना/ उपासना) करणेच अत्यंत महत्वाचे आहे असे आग्रही प्रतिपादन ते सातत्याने करत असत. निव्वळ सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चांना प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीने तर्ककुतर्क सुरु झाले की महर्षी एक तर मौन धारण करत असत, किंवा शक्य असेल तर प्रश्नकर्त्याला ' जो सगळ्या शंका कुशंका उपस्थित करतो आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे लक्ष केंद्रित केलेत तर तेच तुमच्या हिताचे ठरेल' असे सांगत संवादाची दिशाच बदलण्याचा ते प्रयत्न करत असत. क्वचित प्रसंगी साधकांच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरेल असे वाटले तरच तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर महर्षींनी सविस्तर भाष्य देखील केलेले दिसते. प्रश्नकर्त्याने तळमळीने विचारलेले प्रश्न संपल्यावर त्याने/ तिने निव्वळ आपलाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किंवा संवादाचा रोख वांझोट्या बौद्धिक कसरतींच्या ('स्टराईल इंटेलेक्चुअलिझम') दिशेने जातो आहे हे लक्षात आल्यावर मोठ्या खुबीने विषयांतर करून प्रश्नकर्त्याचे लक्ष त्याच्या/ तिच्या जिव्हाळ्याच्या तसेच व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त असलेल्या विषयांकडे वळवण्यात महर्षी कुशल होते.
जगाचे सत्यत्व किंवा विश्वाच्या उत्पत्तीबाबात सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') काढलेल्या निष्कर्षांपेक्षा रमण महर्षींचा दृष्टीकोन खूपच आगळावेगळा असल्याचे सर्वज्ञात असल्याने त्यांच्याबरोबर झालेल्या तात्विक चर्चेत हे दोन्ही विषय प्रामुख्याने चर्चिले जात असत. प्रश्नकर्त्याची भूमिका तसेच त्याच्या/ तिच्या वैचारिक परिपक्वतेशी सुसंगत ठरतील अशा पद्धतीने अन्य तात्विक विषयांप्रमाणेच महर्षी या दोन्ही विषयांवर दिलेली उत्तरे देखील शिंप्याने एखाद्याच्या मापाचे कपडे शिवावे तद्वतच 'बेतून' देत असत. असे असले तरी महर्षींच्या संकल्पना बहुसंख्य लोकांनी नि:शंकपणे स्वीकारलेल्या तसेच मनोभावे अंगिकारलेल्या भौतिक जगाच्या सत्यत्वाचे पूर्णपणे खंडन करण्याकडे झुकलेल्या होत्या हे सहज लक्षात येते.
भौतिक जगाविषयी बोलताना महर्षी तीन वेगवेगळ्या भूमिका घेत असत. तिन्ही भूमिकांचे महर्षींनी वेळोवेळी (ठराविक परिप्रेक्ष्यात) समर्थन केलेले दिसले, तरी त्यांनी वेळोवेळी केलेल्या टिकाटिप्पणींकडे साक्षेपाने पाहिले असता पहिले दोन सिद्धांतच सत्य आहेत किंवा साधकांसाठी उपयुक्त आहेत असे त्यांचे ठाम मत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
१. अजातवाद ('अगा जे घडलेची नाही', कार्यकारणभाव पूर्णपणे नाकारणारा सिद्धांत, अध्यात्मिक सत्य) -
जगाच्या उत्पत्तीसंबंधी विचार करू पाहता मुळात जगाची उत्पती कधीच झालेली नाही असे प्रतिपादन करणारी 'अजातवाद' ही एक प्राचीन हिंदू तत्वप्रणाली आहे. भौतिक जगातल्या कार्यकारणभावाला ही तत्वप्रणाली पूर्णपणे नाकारते. ज्ञानसिद्ध व्यक्तीची प्रचिती लक्षात घेतली तर आत्मतत्व ही एकमेव सद्वस्तु अपरिवर्तनीय वास्तविकतेच्या स्वरूपात निरंतर नांदत असते. त्यामुळे आत्मस्वरूपात कुठलीही गोष्ट अस्तित्वात येणे किंवा तिचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यताच नसते. जगाच्या उत्पत्तीविषयीचच्या बहुतांशी सगळ्याच सिद्धांतप्रणाली काळ, अवकाश आणि कार्यकारण भावावर आधारित असल्याने या तीन गोष्टी गृहीत न धरता त्या मांडताच येत नाहीत. अजातवाद ही एकमेव पूर्णपणे विपरीत भूमिका घेणारी सिध्दांतप्रणाली आहे. अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो.
अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. ज्ञानी व्यक्तीला जगाच्या सत्यत्वाचाच अनुभव येतो, मात्र परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया घडत असल्याने सतत परिवर्तनशील असलेल्या नानाविध प्रकारच्या जड वस्तु आणि उर्जा यांची गोळाबेरीज असे त्या जगाचे स्वरूप नसते. ज्ञानदृष्टीने पाहता आत्मस्वरूपात अकारण प्रकट झालेला एक देखावा इतकेच जगाचे सत्यस्वरूप आहे. हा मुद्दा उलगडून दाखवताना महर्षी असे सांगत असत की जगत रूपी देखाव्याचे खरे स्वरूप किंवा त्या देखाव्यामागे सुप्त स्वरूपात असलेले पायाभूत चैतन्य (substratum) आणि स्वसंवेज्ञतेचे कार्यकलाप संभवत नसलेले निखळ अस्तित्व (beingness of the Self) ही एकच गोष्ट असल्याने स्वसंवेज्ञतेतच अपरिहार्यपणे जगद्रूप असलेला देखावा समाविष्ट झालेला असतो. ज्ञानसिद्ध व्यक्तीसाठी जग प्रकट स्वरूपात दृष्टीगोचर असल्याने नव्हे, तर आत्मस्वरूपाचाच एक अविभाज्य घटक या स्वरूपात सत्य असते.
जगाचे उगमस्थान (स्वसंवेज्ञता) तसेच त्याच्या अनेकत्वामागे दडलेल्या एकत्वाविषयी अज्ञानी व्यक्ती मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असते. परिणामस्वरूप ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेल्या माहितीचा सातत्याने चुकीचा अन्वयार्थ लावत उर्जेच्या संयोगाने क्रिया प्रतिक्रियांमधे गुंतलेल्या स्वायत्त वस्तुंचा समूह अशा स्वरूपात अज्ञानी व्यक्ती तिच्या मनानेच सतत आभासी जगाची निर्मिती करत राहते. अज्ञाननिर्मित जग मूळ वस्तुस्थितीवर मनाने आरोपित केलेले असल्याने ज्ञानदृष्टीने पाहता त्याचे मूल्य स्वप्नाइतकेच आहे. या सगळ्या उहापोहाचे सार रमण महर्षी एका वाक्यात सांगत असत - आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला एक देखावा या स्वरूपात जग सत्य आहे, मात्र मनाने मूळ सत्यस्वरूपावर आरोपित केलेले जग मिथ्या आहे.
२. दृष्टी - सृष्टी वाद (मी आहे त्यामुळे जग आहे, मीच माझे जग निर्माण करतो, प्रातिभासिक सत्य) -
'अजातवाद' सिद्धांतप्रणाली प्रश्नकर्त्याच्या पचनी पडत नसेल तर महर्षी असे प्रतिपादन करत असत की 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अज्ञानी व्यक्ती अनुभवत असलेले जग हे मुळातच वस्तुस्थितीवर मनाने आरोपीत केलेले स्वप्न असल्याने मन निद्रिस्त झाले की त्या जगाचे अस्तित्व संपुष्टात येते. मन स्वतःला पूर्णपणे सत्य वाटेल असे आभासी जगत निर्माण करण्यासाठी सक्षम आहे हा सिद्धांत सिद्ध करण्यापुरतीच दृष्टी - सृष्टी वादाची धाव आहे. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता आभासी 'मी' ने मनाद्वारे निर्माण केलेले स्वप्नवत जगत असे जगाचे एकंदर स्वरूप असल्याने जगाची खरोखरच निर्मिती झालेली आहे असे अजिबात सिद्ध होत नाही. रमण महर्षी कधी कधी असे सांगत असत की 'दृष्टी - सृष्टी वाद' सिद्धांतप्रणालीत विश्वनिर्मीतीशी संबंधित अंतिम सत्याचा समावेश नसला, तरी एक कामचलाउ गृहीतकप्रमेय ('वर्किंग हायपोथेसिस') या स्वरूपात तिचा स्वीकार करणे साधनेच्या दृष्टीकोनातून पाहता उपयुक्त आहे. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून सांगताना जगाकडे सातत्याने 'मनाने निर्माण केलेला एक चकवा' या स्वरूपात पाहण्याची सवय लावून घेतली, तर बाह्य जगताविषयी वाटणारे आकर्षण साहजिकच कमी होते. त्या योगे चित्त विचलित होणे कमी झाल्याने सतत स्वरूपानुसंधान साधणे सुलभ आणि सुकर होते असे स्पष्टीकरण महर्षी देत असत.
३. सृष्टी - दृष्टी वाद (जगाचे स्वायत्त अस्तित्व, उत्क्रांती वाद, व्यावहारिक सत्य) -
जगाच्या उत्पत्तीबद्दल सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') आकलन होण्याजोगी ही एक सिद्धांतप्रणाली आहे. या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. पाश्चात्य जगतात प्रचलित असलेल्या बायबल मधील सृष्टीच्या उत्पत्तीची कथा ते 'बिग बँग थिअरी' पर्यंतच्या सगळ्या संकल्पनांचा समावेश सृष्टी - दृष्टी वादातच होतो. अजातवाद किंवा दृष्टी - सृष्टी वादाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी एखादा साधक पूर्णपणे अपात्र आहे किंवा त्या सिद्धांतप्रणालीं त्याला पूर्णपणे अमान्य आहेत असे लक्षात आल्यावरच महर्षी सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींचा उल्लेख करत असत. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत.
*** व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि अध्यात्मिक सत्य या वेदांतातल्या संकल्पना उपरोक्त विवेचनात स्पष्ट केलेल्या आहेत.
प्रश्नः सृष्टीची निर्मिती कशी झाली? काही लोक म्हणतात की ती पूर्वनियोजीत (ईश्वरी संकल्प) घटना आहे. काही लोक म्हणतात की ही सारी ईश्वराची लीला आहे. सत्य नेमके काय आहे?
रमण महर्षी: जगभरच्या धार्मिक साहित्यामधे विविध सिद्धांत दिलेले आहेत. पण (सृष्टीची) निर्मिती खरोखर झालेली आहे का? निर्मिती झालेली असेल तरच तदनुषंगिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. आपल्यापैकी किती जणांना विश्वनिर्मितीविषयीच्या सगळ्या सिद्धांतप्रणालींची साद्यंत माहिती असते? एक गोष्ट मात्र आपल्याला पक्की माहित आहे की मी अस्तित्वात आहे. साहजिकच मी असा सल्ला देतो आहे की 'मी' चे खरे स्वरूप आधी जाणून घ्या, विश्वनिर्मिती झाली अथवा नाही हे त्या नंतर ठरवायला काय हरकत आहे?
प्रश्नः विश्वनिर्मितीच्या मागचा हेतू काय आहे?
रमण महर्षी: (स्मितहास्य करत) हा प्रश्न उपस्थित व्हावा हा एकमेव हेतू आहे. या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू करा, आणि शेवटी अवघ्या अस्तित्वाच्या निर्मितीची गंगोत्री असलेल्या आत्मस्थितीत लीन होऊन जा किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार करून घ्या. विश्वनिर्मितीमागच्या हेतूचा शोध घेण्यासाठी केलेल्या मानवी प्रयत्नांची परिणती शेवटी स्वरूपाचा शोध घेण्यातच होते. अनात्मतत्वाला दूर सारत सच्चिदानंद स्वरूपाचा त्याच्या चैतन्यमय विशुद्ध अवस्थेत साक्षात्कार झाला तरच साधकाचे समाधान होते. परम विश्रांत असलेली आत्मस्थिती प्राप्त केल्यावर साधकाचे प्रयत्न आपोआप थांबतात.
विश्वनिर्मीतीबद्दल जगभर किती सिद्धांतप्रणाली असाव्यात याची तर गणतीच नाही! त्यांचा सारा शोध बहिर्गामी आहे (बाह्य जगाच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या आधारे चाललेला आहे). काळ आणि अवकाश अमर्याद असल्याने रोज नवनव्या सिद्धांतप्रणाली निर्माण होत राहतील. त्या मन आणि बुद्धीच्या चौकटीतच घुसमटत राहतील. त्या पेक्षा मनाच्या उगमस्थानाचा शोध आरंभला, तर काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून स्वरूपाची प्रचिती येते.
तुमच्या लक्षात येईल की जो तो आपले स्वत:चे समाधान करण्यासाठी विश्वाच्या उत्पत्तीचे वैज्ञानिक किंवा तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नात असतो. या बाबतीत निर्णायक स्वरूपाची तर्कनिष्पत्ती निघणे कालत्रयी तरी शक्य होणार आहे का? क्रमसृष्टीवर (क्रमशः विकसित होत गेलेले जग) आधारित असंख्य सिद्धांतप्रणाली आहेत. त्या उलट दृष्टी - सृष्टी वादाप्रमाणे 'युगपात सृष्टी'(simultaneous creation) हेच सृष्टीचे खरे स्वरूप आहे. द्रष्टा नसेल तर कुठलीही गोष्ट दृश्यमान होत नाही. द्रष्ट्याच्या स्वरूपाचा शोध घेतला तर अवघी सृष्टी द्रष्ट्यातच सामावलेली दिसते. दृष्टीला बहिर्मुख करून अंतहीन असलेल्या इंद्रियगोचर घडामोडींचा अन्वयार्थ लावत बसल्याने हाती काय येणार आहे?
प्रश्न: महर्षी नेहेमी असे सांगतात की माया आणि ब्रह्म एकच आहे. हे कसे शक्य आहे?
रमण महर्षी: आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो. आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला देखावा असा बोध झाला तर जग सत्यस्वरूप/ ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपापेक्षा पृथकत्वाने नांदणारे (नानाविध वस्तुंनी बनलेले, कार्यकारण भाव असलेले) जग असा बोध झाला तर तेच जग मिथ्या/ मायास्वरूप आहे. अर्थातच द्रष्ट्याच्या प्रचितीनुसार अन्वयार्थ बदलला तरी तत्वतः माया आणि ब्रह्म यात अभेदच आहे!
*** ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रहैव नापरः (निरालम्बोपनिषद – २८)

Thursday 25 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, भाव भावनांचे सतत दोलायमान करणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येतो. इथे उल्लेख केलेले अनुभव 'प्रचिती' या विभागातल्या मागील दोन प्रकरणांमधे उल्लेख केलेल्या अनुभवांइतके नाट्यमय स्वरूपाचे नसले, तरी साधकविश्वात या अनुभूतींबद्दल कमालीचे कुतुहल असल्याचे दिसून येते. एक तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे मैलाचे दगड किंवा त्या मार्गापासून पथभ्रष्ट करणारे चकवे असा त्यांचा अन्वयार्थ लावला जातो. त्या नुसार सकारात्मक अनुभव क्षणिक न  ठरता ते स्थिर व्हावेत किंवा अधिकाधिक कालावधी करता अनुभवता यावेत, तसेच नकारात्मक अनुभवांचा अडसर दूर करता यावा या हेतूने अध्यात्मिक साधक जिवाचे रान करताना दिसतात.

श्री रमण महर्षींचा कल 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. क्वचित प्रसंगी आपल्या उपदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मविचाराला तात्पुरती बगल देत एखाद्या साधकाला विशिष्ट अनुभूती येण्यामागच्या मूळ कारणाविषयी महर्षींनी सविस्तर उहापोह केल्याची मोजकीच का असेना उदाहरणे आहेत. त्या जोडीलाच क्वचित प्रसंगी महर्षींनी आत्मलाभ व्हावा या दृष्टीने साधकांना आलेल्या अनुभूतींचे उपकारक किंवा अपायकारक असे वर्गीकरण करत तदनुषंगिक मार्गदर्शन केल्याची देखील काही  उदाहरणे आहेत. साक्षेपाने धांडोळा घेतल्यावर मात्र अध्यात्मिक अनुभूतींमधे स्वारस्य घेण्यापासून महर्षी आपल्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत असेच दिसून येते.

अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला तत्परतेने मार्गदर्शन करत असत. साधकांनी मांडलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या व्यथा महर्षी अतिशय संयत वृत्तीने, सहानुभूतीपूर्वक तसेच अगदी जिवाचे कान करून समजावून घेत असत. त्यांच्या समस्यांचे समाधान होईल या दृष्टीने अत्यंत विधायक स्वरूपातली उत्तरे महर्षींकडून मिळत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक  वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.

प्रश्नः ध्यान करत असताना काही वेळा मला एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाची अनुभूती येते. अशा वेळी मी स्वता:ला "हा आनंद कोण अनुभवतो आहे" असा प्रश्न विचारायला हवा का?
रमण महर्षी: तुमचे मन स्वरूपात पूर्णपणे लीन झालेले असेल, तुम्ही अनुभवता तो आनंद जर खरोखरचा आत्मानुभूतीचा आनंद असेल, तर तुम्हाला अशी शंका येण्याची शक्यताच उरणार नाही. हा प्रश्नच स्पष्ट करतो की तुम्ही अजून आत्मस्थिती प्राप्त केलेली नाही. सगळ्या शंका उपस्थित करणार्‍याचे 'मी' चे मूळ स्वरूप किंवा त्याचे उगमस्थान गवसले तरच सगळ्या शंकाकुशंकांचा अंत होतो. एक एक शंका दूर करत बसणे फारसे हितावह नसते. एका शंकेचे निरसन केले तर तिच्या उत्तरातूनच दुसरी शंका निर्माण होते, आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणे ही मालिका अंतहीन होत जाते. मात्र शंकाकुल असलेल्या व्यक्तीने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध आरंभला तर शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेला 'मी' वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही हे तिच्या लक्षात येते. स्वरूपबोध झाला की सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होतो.

प्रश्नः ध्यानस्थ असताना कधीकधी आनंदाची उत्कट प्रचिती आल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याची जाणीव मला होते. इतर वेळी मात्र मला अशी अनुभूती येत नाही. या मागे काय कारण आहे?
रमण महर्षी: सच्चिदानंद स्वरूप ही एक निरंतर अस्तित्वात असलेली गोष्ट असल्याने स्वरूपानंदाची येरझार होणे संभवत नाही. ज्या गोष्टींची येरझार झाल्याचे अनुभवता येते त्या मनोनिर्मीत असल्याने तुम्ही तिकडे फारसे लक्ष न पुरवलेलेच बरे.

प्रश्नः  ध्यानातल्या आनंदाने देहात विलक्षण चैतन्याचा संचार होतो, मात्र ती अनुभूती ओसरल्यावर मला खिन्न, निरूत्साही आणि हताश झाल्यासारखे वाटते. असे का होते?
रमण महर्षी: आनंदाची अनुभूती येत असताना तसेच ती ओसरल्यानंतर परतून मूळ स्थितीत आल्यावर - या  दोन्ही स्थितीत त्या अनुभवण्यासाठी तुम्ही सदोदित उपस्थित असता हे तुम्हाला मान्य आहे तर. सगळ्या अनुभूती अनुभवताना तुम्ही  आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे एकीकडे सुरूच ठेवा. तुम्हाला स्वरूपाचा यथोचित बोध झाला, की मग या तथाकथित अनुभूती तुमच्या खिजगणतीतही नसतील अशी मला खात्री आहे.

प्रश्नः ध्यान करत असताना अवांतर विचार आणि वासनांकडे धाव घेण्याच्या मनाच्या ओढाळ प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मी काय करायला हवे? विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाचे नियमन कशा प्रकारे करता येईल?
रमण महर्षी: तुमचे मन जसजसे स्वरूपानुसंधानात स्थिर होत जाईल, तसतसे इतर विचार आपोआपच बाजूला पडत जातील. मन दुसरे तिसरे काहीही नसून नानाविध विचारांचे ते एक गाठोडे आहे. विचारांच्या या वटवृक्षाचे मूळ 'मी आहे' हा विचारच आहे. 'मी' च्या मूळ स्वरूपाकडे तुमची दृष्टी वळेल आणि त्याचे उगमस्थान तुम्हाला गवसेल तेव्हा सगळे विचार  स्वरूपात विलीन होऊन जातील.

नियमीपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच राखून ठेवलेल्या आहेत. आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम नियम, शिस्तबद्धता, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची मुळीच गरज नाही.   

Wednesday 24 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी

या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने (हेतुपुरस्सर) साध्य करता येत असल्याचा दावा देखील काही योग साधकांनी केलेला दिसतो. विशिष्ट पद्धतीच्या योगिक प्रक्रियांनी सिद्धी प्राप्त करता येतात असे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले दिसतात. योगशास्त्रविषयक ग्रंथसंपदेत महर्षी पतंजलिंच्या 'योगसूत्र' या ग्रंथाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योगसूंत्रांमधे अष्टसिद्धी प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरतील अशा योगिक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. भक्तांना दृष्टांत झाल्याची उस्फूर्त आणि अहेतुकपणे प्रचिती आली तर महर्षींनी ती अध्यात्मातल्या प्रगतीचा एक संकेत असल्याचे अपवादात्मक प्रसंगी मान्य केल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. अशा प्रसंगी दृष्टांत झालेल्या भक्ताला तो मानसिक पातळीवरचा क्षणभंगुर अनुभव आहे; तसेच असे अनुभव आत्मसाक्षात्काराच्या तुलनेत खालच्या प्रतलावरचे असल्याने दुर्लक्ष करण्याजोगे असल्याची जाणीव महर्षी न चुकता करून देत असत.
अवचितपणे सिद्धी प्राप्त झाली असता तिची भुरळ पडल्याने पथभ्रष्ट होण्याच्या संभाव्य धोक्याची रूपरेषा महर्षी समजावून सांगत असत. सिद्धी प्राप्त केल्याने अहंतेपासून मुक्ती न मिळता उलट अहंकार बळावण्याचीच शक्यता जास्त आहे असे महर्षी स्पष्टपणे बोलून दाखवत असत. सिद्धी प्राप्त करण्याची हाव आणि आत्मसाक्षात्कार या दोन गोष्टींमध्ये अंतर्विरोध असल्याने त्या एकत्र राहूच शकत नाहीत; त्या पैकी एका गोष्टीचीच निवड करावी लागते असे महर्षींचे ठाम मत होते.
आत्मस्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत निकट आहे. ते चिरंतन आहे. त्या उलट सिद्धी मात्र सर्वार्थाने अनात्मस्वरूप, बाह्य जगात मिरवण्याजोग्या आणि अशाश्वत असे फसवे मृगजळ आहे. सच्चिदानंद स्वरूप ही सहजस्थिती आहे. सिद्धी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. अतिंद्रिय किंवा अतिमानस शक्तीं मनाला हव्याहव्याश्या वाटतात. त्या वश करण्यासाठी मनाला सतत सतर्क ठेवावे लागते. त्या उलट मनोनाश झाल्यावर स्वरूप आपोआप प्रकट होते. स्वरूपाचे सजग भान टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज नसते. सिद्धी अहंकाराच्या आश्रयानेच प्रकट केल्या जातात. स्वरूपबोध हा अहंकाराच्या पल्याडचा प्रांत असल्याने अहंतेचा नाश केल्यावरच त्याचा साक्षात्कार होतो असा उपदेश महर्षी सातत्याने देत असत.
प्रश्नः महर्षी पतंजलिंनी उल्लेख केलेल्या सिद्धी खरोखर अस्तित्वात आहेत की ती निव्वळ त्यांच्या मनोविश्वातली स्वप्नसदृश गोष्ट आहे?
रमण महर्षी: महर्षि पतंजलिंनी स्वत:च स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सगळ्या सिद्धी मनोनिर्मित आहेत. त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडसर आहेत. ब्रह्मस्वरूप झालेल्या किंवा स्वरूप साक्षात्कार झालेल्या साधकाच्या लेखी त्या कवडीमोलाच्याही नसतात.
प्रश्नः तथाकथित बुवा आणि बापूंच्या (अतिंद्रिय) शक्तींविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: या शक्ती उच्च पातळीवरच्या असतील किंवा निकृष्ट पातळीवरच्या असतील, त्या मनोनिर्मित असतील अथवा अतिमानस स्थितीत अनुभवलेल्या असतील; ज्या व्यक्तीकडे अतिंद्रिय शक्ती आहे असे मानले जाते त्या व्यक्तीच्या संदर्भातच (पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ स्वरूपातच) त्यांचे अस्तित्व असते. (पारमार्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर) अशा व्यक्तीचे मूळ स्वरूप काय आहे याचा तिला शोध घ्यावाच लागेल.
प्रश्नः अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना मैलाचे दगड या स्वरूपात सिद्धी प्राप्त होत जातात, की सिद्धी आणि मुक्ती परस्परविरोधी गोष्टी आहेत?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार होणे ही सर्वोच्च सिद्धी आहे. तुम्हाला क्षणभर जरी सत्यस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तर तुमचे (सिद्धींच्या मोहात पाडून) अज्ञानाच्या खाईत लोटत असलेल्या मार्गांविषयीचे आकर्षंण कायमचे संपुष्टात येईल.
प्रश्नः मग सिद्धींचा उपयोग काय आहे?
रमण महर्षी: दोन प्रकारच्या सिद्धी असतात, त्या पैकी एक प्रकार आत्मसाक्षात्कारात विघ्न निर्माण करणारा आहे. मंत्रजप केल्याने, रहस्यमय गुणधर्म असलेल्या काही रसायनांचे सेवन केल्याने, कठोर तपश्चर्या केल्याने तसेच ठराविक प्रकारची समाधी लावणे साध्य केल्याने सिद्धी प्राप्त होतात अशी एक धारणा रूढ झालेली आहे. उपरोक्त पद्धतीने शक्ती प्राप्त करणे हे आत्मसाक्षात्कारासाठी उपयुक्त ठरणारे साधन नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने सिद्धी प्राप्त झाल्या तरी तुम्ही अज्ञानाच्या गर्तेतच अधिक खोलवर रूतत जाल!
प्रश्नः मग या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या (उपकारक) सिद्धी कशा असतात?
रमण महर्षी: तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला तर तुमच्या ठायी निसर्गत:च असलेले आंतरिक सामर्थ्य आणि प्रज्ञान यांचे सहजस्फूर्त प्राकट्य होत जाणे असे या सिद्धींचे स्वरूप असते. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे. आत्मसिद्धीच्या जोडीला विनासायास मिळत असलेल्या सिद्धी कुणालाही प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी स्थितीत असाल तेव्हाच अशा सिद्धींची साक्षात प्रचिती येते.
पुरवणी:
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायाच्या सुरूवातीला आत्मसिद्धी/ सोहंसिद्धीचे काव्यात्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. इथे समाविष्ट केलेल्या निवडक ओव्यांमधला 'योगसुखाचे सोहळे' ते 'समाधिबोधे निजविसी, बुझाऊनि' हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आई जगदंबेने बाळाला मांडीवर घेत त्याचे सोहंसिद्धीचे लळे पुरवावे, 'आधारशक्तीच्या' (कुंडलिनी) बळावर त्याचे संगोपन करावे, अनाहत नादाचा खुळखुळा वाजवावा, चिदाकाशाच्या पाळण्यात त्याला झुलवावे, सत्रावीचे स्तन्य द्यावे, प्रत्यकज्योतीने त्याला ओवाळावे, हातात मन पवनाची (प्राणशक्तीची) खेळणी द्यावी, आत्मसुखाची बाळलेणी लेववावी आणि समाधीचा बोध देत त्याला निजवावे अशा प्रकारचे हे एक नितांत सुंदर रूपक आहे. माऊलींनी त्या आधी गुरूंच्या कृपादृष्टीने वैषयिक वासना निर्विष होतात, त्यांची डंख करण्याची क्षमता संपते; तसेच प्रसादरसाचे कल्लोळ उठल्याने साधकाच्या जीवनातून शोकसंतप्त भावना कशी हद्दपार होते याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
*** सत्रावीचे स्तन्य - पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक आणि प्राण या सोळा कला आहेत. स्वरूपानंद किंवा अमृतकला ही सत्रावी कला मानली जाते.
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥