Friday 18 November 2011

धर्म - मुक्त चिंतन

धर्म हा एक व्यापक विचार आहे. धर्माची इमारत केवळ 'मी आणि माझी मुक्ती' इतक्या संकुचित पायावर उभारलेली नसते. मूळ तत्वे जरी बदलली नाहीत तरी बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार धर्माची पुनर्बांधणी होत राहते. 'धारयति इति धर्म:' आणि 'धर्मो रक्षति रक्षित:' या साध्या नैसर्गिक तत्वानुसार जग चालत असल्याने समाजाच्या निकोप धारणेसाठी धर्म अपरिहार्य ठरतो. तो सरसकट त्याज्य ठरवणारे विचारवंत मूर्खांच्या नंदनवनात जीव रमवणारे भाबडे स्वप्नाळूच ठरतात. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे हा निसर्गनियम जोवर खरा आहे तोवर धर्माची गरज राहणार आणि या न त्या स्वरूपात (यात धर्मनिरपेक्षता, साम्यवाद वगैरेही आले) धर्म जिवंत राहणार हे अटळ सत्य आहे.

***

'समाज' ही वस्तुस्थिती (धारणा नव्हे!) सोयीस्करपणे नाकारली की 'मी आणि माझी मुक्ती' याचे हवे तितके सरळ, सोपे, वरपांगी तर्कशुद्ध आणि आकर्षक सिद्धांत यथातथा बुद्धिमत्ता असली तरीही बसल्याजागी मांडता येतात. 'मी आणि माझी मुक्ती' हा सोस बाळगायला त्याच तोडीचे वैराग्य हवे. सामाजिक स्थैर्य, प्रापंचिक सौख्य, लोकशाही मतस्वातंत्र्य असे सगळे फायदे उचलत ज्या मूल्यांवर या गोष्टींची बांधणी झालेली आहे त्यांनाच आपल्याला सोयीस्कर असेल तिथे बाजूला टाकत, हास्यास्पद ठरवत सत्य शोधण्याचे चोचले पुरवण्याचे प्रस्थ वाढते आहे. हे विकृत आणि हास्यास्पद विचार आहेत. तेही विशाल मनाच्या आणि व्यापक दृष्टी असणाऱ्या समाजातच मांडता येतात. आजही भारतात असा समाज मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. मजेची गोष्ट अशी, की भलत्या जागी भलती बडबड करून चाहते गोळा करणाऱ्या तथाकथित विश्वयोग्यालाही सगळीकडून हाकलले गेल्यावर आपली बेताल मुक्ताफळे उधळायला आणि ध्यानाचे वेडेवाकडे प्रयोग करायलाही पुन्हा इथेच यावे लागले हा तसा अलीकडचाच इतिहास आहे.

***

धर्म ही अशी एक विशाल दृष्टी आहे जी व्यष्टी (आंतरिक शांती आणि बाह्य समृद्धी यातील ताळमेळ साधू शकेल अशी व्यक्ती) आणि समष्टी (समाज, राष्ट्र, विश्व अशा व्यक्तींच्या समूहाच्या उन्नत आणि विधायक असायला हव्यात अशा अवस्था) दोन्हीच्या हिताचा विचार करतो. मुळात या दोन्हीच्या हितात निसर्गतः विरोधच नसतो हाच भारतीय विचारप्रणालीचा गाभा आहे. भारतीय संतधर्म हेच शिकवतो. मला उमगले ते, माझ्या सवडीशास्त्रात बसते तेच 'सत्य' आणि इतरांच्या त्या 'धारणा' असे दावे ठोकणारे या संतधर्माशी नाळ जोडू शकत नाहीत आणि उगाचच जगावेगळे काहीतरी सांगतो आहे अशा अविर्भावात सामान्यांचा बुद्धिभेद करत राहतात.

***

व्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी करून, 'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:' या निसर्गनियमाची पायमल्ली करून धाकाने त्याला बैलासारखे घाण्याला जुंपून तथाकथित समाजहित साधणार्या काही विचारधारा आहेत. अशाने काही काळ वरपांगी त्या समूहाची प्रगती झाल्यासारखे वाटले, तरी या गळचेपीविरुद्ध जो विद्रोह होतो त्यात ही प्रगती झाकोळून जाते आणि समाजाचा फार मोठा अध:पात होतो. या उलट सामाजिक, नैतिक बंधने पूर्णपणे झुगारून देऊन व्यक्तीस्व्यातंत्र्याचा पाचकळ नखरा, सुधारणेच्या नटव्या कल्पना याना कवटाळणार्या काही विचारधारा आहेत. व्यक्तीच्या सृजनशीलतेला, जोखीम घेण्याच्या क्षमतेला अशाने पाठबळ मिळते असे पोकळ दावे ही मंडळी करतात. समाजाच्या निकोप धारणेलाच तडा देणारे हे विचारही खोल गर्तेत घेऊन जातात. हे दोन्ही विचार भारताचे नव्हेत!

***

धर्म आणि राजकारण यांचे म्हणाल तर धर्माचे अधिष्ठान असणारे राजकारण करणार्या जाणत्या राज्याचे लोककल्याणकारी राज्य, रामराज्य महाराष्ट्राने, भारताने अनुभवलेले आहे. दुर्दैवाने राजसत्तेच्या हातातील बटीक असणारी दुबळी, असहाय, लाचार, परजीवी तथाकथित धर्मसत्ता आज अनुभवास येते. धर्मसत्ता आणि राजसत्ता सरसकट खलनायक ठराव्यात असा काही नियम नाही. उलट भोगलालसेने अनैतिक वागणारा प्रत्येक तथाकथित सामान्य माणूसही कळत नकळत शोषण हे एकच मूल्य असणाऱ्या गुन्हेगारी व्यवस्थेचेच पालन पोषण करत असतो. जगात शांतता कशी नांदेल, उठसूठ ज्याला त्याला स्वरूप साक्षात्कार कसा होईल हे आपल्यासारख्या सामान्यांच्या तसे आवाक्याबाहेरच आहे. आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेउनही किमान आपली 'सत्कर्मी रती वाढावी' यासाठी आपण काही प्रयत्न करतो का याचे उत्तर ज्याने त्याने स्वत:शी प्रामाणिक राहून शोधले, तरी थेंबे थेंबे तळे साठून माउलींचे पसायदान वास्तवात उतरण्याची शक्यता तरी वाढेल असे वाटते. 

***

१. ईश्वरी शक्ती (अधिदैविक तत्व) असे काही प्रकट/ सुप्त (सगुण्/ निर्गुण/ दोन्ही वगैरे जे काही असेल ते) आहे काय?

२. जगभरचा मानव समाज पिढ्यानपिढ्या या न त्या रूपात अशा शक्तीचे अस्तित्व मान्य करून तिला का भजत आला आहे?

३. अपौरूषेय, अनिर्वचनिय, अव्याख्य अशा दैवी तत्वाची अनुभूती आल्याने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन आमूलाग्र बदलण्याची आणि तिचे उर्वरीत आयुष्य सामान्य माणसाच्या सापेक्षतेत चमत्कार वाटावे अशा रीतीने जाण्याची जगभर कित्येक उदाहरणे आहेत. या अनूभूती व्यक्तिगत (सब्जेक्टिव्ह) असल्याने त्याना सरसकट 'मनोविभ्रम' गणले जावे काय?

४. देव ही मानवी बुद्धीने निर्मिलेली कल्पना आहे हे गृहीतक विनातक्रार मान्य करणे ही एक प्रकारची अन्धश्रद्धाच नाही का?

५. भक्ती आणि आस्तिक्य  यान्ची प्रबळ अन्तःप्रेरणा चिन्ता, नैराश्य, भीती, असहायतेसारख्या 'नीगेटिव्ह' भावनान्चे समायोजन करण्याची काडीमात्र गरज नसलेल्या निरोगी, सर्वर्थाने सशक्त, विवेकी व्यक्तीतही असते हे सहज सिद्ध करता येते. तेव्हा मानवी ईच्छाशक्ती विरुद्ध अधिदैविकावरची श्रद्धा अशी काल्पनिक कुस्ती लढवून ईच्छाशक्तीच्या बाजूने 'जितम् मया' चे दावे ठोकणे तर्कदृष्ट्या कितपत सयुक्तिक/ यथार्थ/ परिपूर्ण आहे? 

या प्रश्नान्ची उत्तरे कुणी 'मी' केन्द्रित विचार (सामाजिक आणि जातीय पूर्वग्रह/ दम्भ आणि बुवाबाजीविरुद्धचा आकस/  सक्तीने कुणी आपली मान झुकवली, बन्धने लादली याविरुद्धचा आकस) बाजूला ठेऊन शोधली आहेत का याविषयी कुतुहल आहे.