Tuesday 24 March 2020

विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य

या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती. महर्षींचा 'मौन उपदेश' त्यांच्या देहातून सतत उत्सर्जित होत असलेल्या एका अत्यंत प्रभावशाली अध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपात दिला जात असे. या मौन दीक्षेचे सामर्थ्य इतके अलोट होते, की महर्षी तिला आपल्या उपदेशाचा सर्वोच्च प्रभावशाली आणि सगळ्यात थेट असा मार्ग मानत असत. मनःसंयम कसा साध्य करावा या विषयी शाब्दिक उपदेशाचा भडिमार न करता ते अगदी सहजगत्या अत्यंत निबीड मौनस्वरूपात असलेल्या एका शक्तीचे उत्सर्जन करत असत. या शक्तीच्या प्रभावामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कित्येक साधकांना, अगदी मुक्या प्राण्यांना देखील मनःशांतीची थेट अनुभूती मिळत असे. या शक्तीशी एकतानता साधायला शिकलेल्या कित्येक साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. काही उन्नत अवस्थेतल्या आणि परिपक्व साधकांमधे ही प्रचिती प्रगाढ आणि स्थिर होत गेल्याने त्यांना थेट 'पहावे आपणासी आपण' अशी अनुभूती येत आत्मलाभही घडत असे.
भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहेच. महर्षी नेहेमी दक्षिणामूर्तिंचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करत असत. दीक्षा या विषय निघाला की त्यांच्या संभाषणात दक्षिणामूर्तिंविषयी उल्लेख हमखास येत असत.
आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत. ते नि:संदिग्धपणे असे प्रतिपादन करत असत की आत्मानुभूतीचा थेट अनुभव घेण्यासाठीचा सत्संग हा एक अत्यंत सहज आणि सोपा असा जणू राजमार्गच आहे. पारंपारिक दृष्ट्या आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे असा सत्संगाचा अर्थ घेतला गेलेला असला तरी रमण महर्षी मात्र सत्संगाची व्याख्या खूपच विस्तृत अर्थाने घेत असत असे स्पष्टपणे दिसून येते. महर्षी सांगत असत की मन सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या ठायी जडून राहणे हा सत्संगाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, त्यामुळे महर्षी अशी खात्री देत असत की देहधारी सद्गुरूंच्या किंवा एखाद्या बाह्य प्रतिकाच्या सान्निध्यात असल्यानेच सत्संग घडतो असे नव्हे; तर स्थळ, काळ आणि वेळ यांची तमा न बाळगता मनोभावे कुठेही आणि कधीही सद्गुरूंचे स्मरण केलेत, तर तुम्ही सत्संगच साधत असता अशी खात्री बाळगा.
प्रश्नः (वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून अरूणाचल पर्वतावर वास्तव्य केलेल्या रमण महर्षींनी शेवटचा श्वास तिथेच घेतला. अत्यंत साधे आणि संयत जीवन जगत ते तिथेच राहिले.) भगवान देशोदेशींचा प्रवास करून प्रवचने देत व्यापक अर्थाने मानव समाजाला सत्याचा उपदेश का करत नाहीत?
रमण महर्षी: मी तसे करत नाही असे आपल्याला का बरे वाटते आहे? व्यासपीठावर उभे ठाकणे आणि उपस्थितांवर प्रवचनबाजीचा भडिमार करणे अशा पद्धतीने ही शिकवण देता येईला का? खरा उपदेश मौन राहूनच देता येतो, कारण त्यात ज्ञानाचे साधे सोपे असे मनोगत थेटपणे अंत:करणापर्यंत पोचवले जाते. एखाद्या व्यक्तीने चांगली तासभर प्रवचनबाजी ऐकली, आणि तिच्या जीवनाच्या प्रवाहाची दिशा बदलेल असा कुठलाही प्रभाव न पडताच ती तेथून निघून गेली, तर या प्रकाराला आपण काय म्हणाल? उलटपक्षी एखाद्या व्यक्तीने चार मोजकेच क्षण एखाद्या पवित्र सत्पुरूषाच्या उपस्थितीत सत्संगात घालवले, आणि तिच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल होऊन ती तिथून मार्गस्थ झाली ... या दोन्हीत तुलना केली असता अधिक श्रेयस्कर काय आहे? ज्याचा कुठलाच प्रभाव पडत नाही असा पांडित्यपूर्ण उपदेश जोरजोरात करावा की मौन बाळगत आंतरिक शक्तीच्या सामर्थ्याला योग्य दिशेने मार्गस्थ करत रहावे?
तुम्ही हे अवश्य लक्षात घ्या, की वाणीचा उगम कसा होतो? सुरूवात नेहेमी अमूर्त अशा ज्ञानापासून होते. त्यातून अहंभाव निर्माण होतो, अहंभाव स्थूल स्वरूपातल्या विचारांना जन्म देतो आणि हे विचारच शब्दरूपात वाचेद्वारे प्रकट होतात. त्यामुळे उच्चारला गेलेला शब्द हा नेहेमीच उगमस्थानी असलेल्या अमूर्त ज्ञानाचा पणतू असतो. शब्दांचा देखील काही प्रमाणात का असेना प्रभाव पडताना दिसतो. तेव्हा आता तुम्ही स्वतःच या गोष्टीचा विचार करा की मौनातून दिला गेलेला उपदेश हा शाब्दिक उपदेशाच्या तुलनेत किती पटींनी प्रभावशाली असेल!
प्रश्नः मौन इतके सामर्थ्यवान कसे असू शकेल?
रमण महर्षी: आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून अध्यात्मिक प्रभाव असलेल्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात, त्यामुळे सत्प्रवृत्त असलेले लोक अशा व्यक्तीकडे आपोआप आकृष्ट होतात. तरीही बाह्यतः मात्र अशी व्यक्ती एखाद्या गुफेत पूर्णपणे मौन अवस्थेत बसलेली दिसू शकते. 'अध्यात्मिक सत्य' या विषयीची प्रवचने आपण हवी तितकी ऐकू शकतो, पण ती ऐकूनही मूळ विषयाला गवसणी घालण्याचा दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. उलट आपल्या वैचारिक गोंधळात मात्र भर पडते आहे असे लक्षात आल्यावर आपण हात हलवत परत जातो. या उलट आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्याने अशा व्यक्तीने एखादा शब्द देखील उच्चारला नाही तरी मूळ विषयाचे आकलन कित्येक पटीने चांगले होते. आत्मज्ञानी व्यक्तीला कधीच बाहेर पडून लोकानुनय करावा लागत नाही. गरज असेल तेव्हा इतर सत्पात्र व्यक्तींच्या माध्यमातून तिला आवश्यक ते कार्य करवून घेता येते.
गुरू शिष्याला जी शांतता प्रदान करतात, तिच्या योगे आत्मज्ञानाच्या प्रकाशात सारे काही लख्ख उजळून निघते. माया समूळ बेचिराख होऊन शेवटी विशुद्ध ज्ञानच शिल्लक उरते. आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंची आणि सत्पात्र शिष्याची निव्वळ नजरानजर जरी झाली, तर मग तिथून पुढे बापुडवाण्या शब्दांचे काही कामच उरत नाही.
प्रश्न: भगवान दीक्षा प्रदान करतात का?
रमण महर्षी: मौन ही सर्वोत्तम आणि सगळ्यात सामर्थ्यवान दीक्षा आहे. तीच श्री दक्षिणामूर्ति देत असत. स्पर्श, दृष्टी इत्यादि प्रकारांनी दिलेली दीक्षा तुलनेने खालच्या पातळीवरची असते. मौन दीक्षेने साधकांच्या अंतःकरणात आमूलाग्र बदल घडून येतो.
शिष्यगण जेव्हा दीक्षेसाठी प्रार्थना करत, तेव्हा श्री दक्षिणामूर्ति मौन बाळगत असत. दीक्षा देण्याचा हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. त्यात इतर सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. इतर दीक्षा पद्धतींमधे दाता आणि याचक असे नाते असणे अनिवार्य असते. आधी दात्याने काही द्यावे लागते आणि मग त्याचा याचकाकडून स्वीकार केला जावा लागतो. देणारा आणि घेणारा असे दोघे अस्तित्वात असले तरच एकाने दुसर्‍याकडे कृपादृष्टी वळवणे, किंवा एकाने दुसर्‍याला स्पर्श करणे संभवते, नाही का? मौन दीक्षाच सर्वार्थाने परिपूर्ण असते; कृपादृष्टी, स्पर्श, उपदेश अशा सगळ्या गोष्टींचा तिच्यात समावेश होतोच. मौन दीक्षा साधकाला सर्वार्थाने निर्मळ करते आणि तो आपल्या (सच्चिदानंद) स्वरूपात स्थिर होतो.
प्रश्नः स्वामी विवेकानंद म्हणतात की अध्यात्मिक गुरू खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिकतेचे शिष्याकडे हस्तांतरण करू शकतात.
रमण महर्षी: अध्यात्म ही अशी एखादी वस्तू आहे का जी हस्तांतरित करता यावी? हस्तांतरणाचा खरा अन्वयार्थ असा असू शकतो की शिष्यातल्या अज्ञानाचा निरास करणे. त्याच्या मूळ स्वरूपावर असलेले आवरण दूर करणे. हे कार्य सद्गुरू करतात. मात्र या हस्तांतरणाचा अर्थ असा मात्र खचितच होत नाही की शिष्य ही एक वेगळीच व्यक्ती होती, आणि मग तिचे रूपांतरण होत ती कुणी वेगळीच अलौकिक व्यक्ती झाली.
प्रश्नः (आपण जिचा उल्लेख करता ती) नि:शब्द शक्ती आपले कार्य कसे करते?
रमण महर्षी: भाषा ही निव्वळ एका व्यक्तीचे विचार इतर व्यक्तींपर्यंत पोचवण्याचे संवादाचे माध्यम आहे. मनात विचार उद्भवतात तेव्हाच ती कामी येते. 'मी आहे' हा विचार सर्वात आधी प्रकटतो आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकीची विचारशृंखला जन्माला येते. त्यामुळे 'मी आहे' हा विचारच सगळ्या संवादांमागचे मूळ कारण असतो. बौद्धिक विचार न करता एखादी व्यक्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूपात स्थिर राहते तेव्हा तिचे इतरेजनांविषयीचे आकलन विश्वव्यापी शांततेच्या माध्यमातून व्हायला सुरूवात होते.
मौनाला सतत काही सांगायचे असते, काही अभिव्यक्त करायचे असते. निरंतर प्रवाही असलेल्या मौनाच्या संततधारेत बोलण्याने व्यत्यय येतो. मी या क्षणी उच्चारत असलेले शब्द देखील मौन संवादातला अडसर बनत आहेत. एक उदाहरण देतो - एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह खेळत असतो. या प्रवाहात अडथळा निर्माण केला, तर तो पंख्याचा स्वरूपात फिरायला लागतो किंवा दिव्याच्या स्वरूपात प्रकाशमान होतो. तारेत मात्र तो निरंतर विद्युत उर्जेच्या शुद्ध स्वरूपातच गतिमान असतो. तद्वतच मौन हा भाषेचा सतत वाहता असलेला प्रवाह असतो, तो शब्दांनी अवरूद्ध होतो.
कित्येक वर्षे सतत संवाद साधून आणि वितंडवाद घालूनही जे आकळत नाही, सतत हुलकावण्या देत राहते, तेच (अध्यात्मिक सत्य किंवा स्वरूप) मौन अवस्थेत किंवा अंतर्बाह्य मौन असलेल्या सत्पुरूषाच्या पुढ्यात उभे राहिल्यावर क्षणार्धात उमगून जाते. दक्षिणामूर्ति आणि चार सनत्कुमार हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मौन ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च सामर्थ्य असलेली भाषा आहे.
पुरवणी:
संजीवनी गाथेत प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी आंतरिक मौनाचे वर्णन असे केले आहे:
कैचा भक्त कैचा देव |
हरिरूप झाले सर्व ||
देव-भक्ता पडे मिठी |
अंतर्बाह्य जगजेठी ||
सर्वा ठायी सर्वा घटी|
हरि नांदे पाठी पोटी||
एक झाले मी-तू पण |
स्वामी म्हणे भले मौन ||
रमण महर्षींनी मुक्तकंठाने गौरवलेला सत्संग साधायचा असेल, तर साधकाची भावदशा कशी असावी याचे वर्णन स्वामीजी असे करतातः
चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती हि खिन्न होऊ नये
अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये
संसारी रहावे अलिप्त उदास, मोहे माया-पाश जोडू नये
स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये
-- प. पू. स्वामी स्वरूपानंद (संजीवनी गाथा)

Friday 6 March 2020

विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ८ - गुरुतत्व

या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). ते असा निर्वाळा देत असत की वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्वुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते.
आपल्याकडे गुरूपद नाही आणि आपले कुणीही शिष्य असा महर्षींचा दृष्टीकोन असला तरी शिष्यवर्गाच्या दृष्टीने मात्र ते करूणेचा आणि कृपेचा अथांग सागरच होते. एखादा शिष्य छोट्या आकाराचे भांडे घेऊन जाईल, तर एखाद्यात सगळ्या सागरालाच रिचवण्याची क्षमता असेल. हे लक्षात घेता ज्याची जितकी क्षमता आहे तितके कृपादान त्याच्या पदरी पडेल असेच म्हणावे लागेल. सागराने कृपणता दाखवली अशी तक्रार करणे हा खरे तर एक प्रकारचा नादानपणाच नाही का?
चित्ताचा क्षोभ तात्पुरता का होईना निवळण्यासाठी संतांच्या सहवासात राहणे हा एक हमखास परिणामकारक ठरणारा उपाय आहे. समाधी साधनात संत निष्णात झालेले असतात, नव्हे तीच त्यांची विनासायास आणि अखंड टिकून राहणारी सहजस्थिती झालेली असते. अशा सत्पुरूषांविषयी जिव्हाळा वाटणे आणि त्यांच्या सान्निध्यात राहणे ज्यांना आवडायला लागते, असे शिष्यदेखील शनै: शनै: त्यांच्या समाधीस्थ जगण्याची सवय अंगी बाणवायला लागतात.
महर्षी नेहेमी असे सांगत असत की गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.
रमण महर्षींच्या उपदेशातले एक मूलभूत तत्व असे आहे की आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. (रमण महर्षींसारख्या दुर्मिळ उदाहरणांमधे गुरू मनुष्य देहधारी नसतात. शिवस्वरूप मानला गेलेला अरूणाचल पर्वत महर्षींना गुरूस्थानी होता). रमण महर्षी नेहेमी असे निदर्शनास आणून देत असत की आत्मलाभ व्हावा अशी आत्यंतिक तळमळ ज्याच्या ठायी नाही अशा शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवण्याचे सामर्थ्य कुठल्याही सद्गुरूंपाशी नसते. एखाद्या साधकाने/ साधिकेने गांभिर्याने आणि आंतरिक तळमळीने आत्मशोध सुरू केला, की गुरुकृपेचा आणि गुरूंच्या सामर्थ्याचा ओघ आपोआप त्याच्या/ तिच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र साधकाने/ साधिकेने कुठलाही प्रयत्न केला नाही, तर सद्गुरू देखील असहाय्य ठरतात.
प्रश्नः गुरूकृपा कशी असते? गुरूकृपेने आत्मसाक्षात्कर कसा घडून येतो?
रमण महर्षी: गुरू आणि आत्मस्वरूप एकच असते. आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात समाधान न वाटल्याने एखाद्याचे मन उद्विग्न होते. अशी व्यक्ती आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची करूणा भाकायला लागते. मनोभावे केलेल्या प्रार्थनेत असलेल्या अंगभूत सामर्थ्यामुळे अशा व्यक्तीची हळूहळू चित्तशुद्धी व्हायला लागते. ओघानेच पुढच्या टप्प्यावर अशा साधकाची प्रार्थना ईश्वरी साक्षात्काराच्या तळमळीत परिणत होते. आपल्या ऐहिक वासनातृप्तीकरता न राहता अशा भक्ताची प्रार्थना अहेतुकपणे आणि फक्त ईश्वरी कृपा संपादन करण्यासाठी होत जाते. हे साध्य झाले की ईश्वरी कृपा हळूहळू प्रकट व्हायला लागते. ईश्वरच मानवी देहाच्या स्वरूपात अशा शिष्याच्या संपर्कात येतो. आपल्या सहवासात त्याची चित्तशुद्धी घडवून आणतो आणि अंती त्याला आपल्या सत्यस्वरूपापर्यंत घेऊन जातो. भक्ताचे मन सामर्थ्यवान होते आणि त्याची अंतर्मुख होण्याची क्षमता वाढायला लागते. अंतर्यामी असलेले गुरूतत्व अशा वेळी मनाला त्याच्या उगमाकडे खेचून घेते आणि मन शांतवावे या साठी मदत करते. हीच गुरूकृपेची महती आहे. खरे तर ईश्वर, गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद मुळातच नसतो.
प्रश्नः (साधकाने) सद्गुरूंचा शोध कसा घ्यावा?
रमण महर्षी: अनादि अनंत असलेला परमेश्वरच त्याच्यावर प्रीती जडलेल्या भक्ताविषयी करूणा वाटल्याने कृपावंत होत (गुरूस्वरूपात) भक्ताची प्रगल्भता लक्षात घेत त्यानुसार भक्तासमोर प्रकट होतो. आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत अशी भक्ताची धारणा असल्याने दोन देहधारी व्यक्तींमधल्या इतर नातेसंबंधांप्रमाणेच गुरू शिष्य या नात्याची त्याला अपेक्षा असते. पण मूर्तिमंत ईश्वर किंवा आत्मस्वरूपच असलेले सद्गुरू 'आतून' काम करायला लागतात. ते शिष्याला त्याने अवलंबलेल्या मार्गातल्या चुकांची जाणीव करून देतात. त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात, तसेच त्याला अंतर्यामी स्वरूप साक्षात्कार होईपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत.
प्रश्नः खरे सद्गुरू कोणत्या गुणांवरून ओळखता येतात?
रमण महर्षी: अविचल असणारी आत्मनिष्ठा, 'जीव हेच ब्रह्म' आहे या दृष्टीने सगळ्या भूतमात्रांकडे पाहणे (सर्वत्र समबुद्धयः) तसेच स्थळ, काळ आणि परिस्थिती कशीही असली तरी त्यामुळे न ढळणारे धैर्य आणि स्थितप्रज्ञता.
प्रश्नः नानाविध मार्गांचा उपदेश करणारे कित्येक अध्यात्मिक गुरू या जगात आहेत. एखाद्याने आपले सद्गुरू कोण हे कसे ठरवावे?
रमण महर्षी: तुमच्या जेव्हा लक्षात येते की अमुक एक सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना आपल्याला विनासायास मनःशांती मिळते तेव्हा त्या सद्गुरूंचा स्वीकार करा.
प्रश्नः ते काय उपदेश करतात हे देखील लक्षात घ्यायला नको का?
रमण महर्षी: (ज्याला आत्मज्ञानाव्यतिरिक्त काहीही नको आहे अशा) एखाद्या प्रबळ मुमुक्षा असलेल्या सच्च्या साधकाला तुम्ही अमुक करा आणि तमुक करा असे सांगतात ते खरे सद्गुरूच नव्हेत. असा साधक आधीच आपल्या क्रियाकलापांमुळे पिडीत आणि व्यथित झालेला असल्याने त्याला मन:शांती आणि विश्रांत अवस्थेची नितांत गरज असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर त्याला नैष्कर्म्य स्थितीची ओढ असते. तो आधीच करत असलेल्या ढीगभर कर्मकटकटींमधे भर घालत किंवा त्यात बदल करून त्या ऐवजी काही पर्यायी क्रियाकलाप करायला त्याने उद्युक्त व्हावे असे जर सद्गुरू सांगतील, तर अशाने त्या साधकाला काय फायदा होणार आहे?
(कर्ता भावाने केलेले) कर्म ही निर्मितीची प्रक्रिया असते. ती आपल्या अंतरी असलेल्या मूळच्या निर्भेळ आनंदाचा विनाश करणारीच ठरते. त्यामुळे क्रियाकलापांची वकिली करणारा मार्गदर्शक हा सद्गुरू नसून तो आत्मघाताला प्रवृत्त करणारा गुन्हेगारच ठरतो. अशा परिस्थितीत उत्पत्तीचे कारण असलेले ब्रह्मदेव किंवा साक्षात यमराजच वेषांतर करून सद्गुरूंच्या रूपात तुम्हाला चकवा देत आहेत असेच म्हणावे लागेल. असे तथाकथित सद्वुरू साधकाला मुक्त तर करूच शकणार नाहीत, उलट (त्यांच्या उपदेशाचे पालन केल्याने) साधकाच्या गळ्याभोवतीचा कर्मबंधाचा फास आणखी आवळला जाईल.
प्रश्नः मी माझे सद्गुरू कसे शोधू?
रमण महर्षी: उत्कटपणे ध्यान साधना करा (सद्गुरूकृपेची घटना आपोआप घडेल, सद्गुरूंची ओळख आतून पटेल).
प्रश्नः सद्गुरूकृपा झाल्याची चिन्हे किंव लक्षणे काय असतात?
रमण महर्षी: गुरूकृपेबद्दल तर्क किंवा बौद्धिक विचार करता यावा किंवा शब्दात व्यक्त करता यावी अशी ती बाबच नाही. ती विचारांच्या आणि शब्दांच्या पल्याडची गोष्ट आहे.
प्रश्नः तसे असेल, तर गुरूकृपेने शिष्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख होते किंवा आत्मलाभ घडून येतो असे का म्हणतात?
रमण महर्षी: एखाद्या मदोन्मत्त गजराजाच्या स्वप्नात सिंह यावा आणि त्याने दचकून जागे व्हावे असा तो प्रकार आहे. स्वप्नात का होईना आपल्या नजरेसमोर सिंह उभा ठाकल्यावर हत्ती एकदम सावध होतो आणि त्याला जाग येते, तसेच सद्गुरूंचा अत्यंत सामर्थ्यशाली कृपाकटाक्ष पडल्यावर अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या आणि गाढ झोपी गेलेल्या शिष्याला जाग येते आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन घडल्याने त्याला खरे ज्ञान प्राप्त होते.
प्रश्नः जे. कृष्णमूर्ति असे म्हणतात की कुठल्याही गुरूंची आवश्यकता नसते.
रमण महर्षी: हा निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारावर काढला? आत्मसाक्षात्कारानंतर जर कुणी असे म्हणत असेल तर ते कदाचित योग्य ठरेल, पण त्या आधी खचितच नाही.
प्रश्नः योगी अरविंद आणि इतर काही जण असे म्हणतात की तुम्हाला कधीच कुणी गुरू नव्हते.
रमण महर्षी: तुम्ही गुरू कुणाला म्हणता या गोष्टीवर तुम्ही काढलेले निष्कर्ष अवलंबून असतात. गुरू देहधारीच असावेत याची गरज नसते. सद्गुरू दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते, ज्यात पृथ्वी, जल इ. पंचमहाभूतांचाही समावेश होता. या न्यायाने या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांना गुरूस्थानी होती.
गुरू असण्याची नितांत आवश्यकता असते. उपनिषदे म्हणतात, की इंद्रियगोचर भवसागरातून आणि बौद्धिक विचारांच्या जंगलातून एखाद्याला फक्त गुरूच बाहेर काढू शकतात. त्या मुळे गुरू तर आवश्यकच आहेत.
प्रश्नः मला असे म्हणायचे आहे की महर्षींना देहधारी गुरू कधीच नव्हते.
रमण महर्षी: अन्य वेळी माझे देहधारी गुरू असतीलही. (या जन्मीचे म्हणाल तर) मी अरूणाचलाच्या स्तुतीपर कवने रचलेली नाहीत का? गुरू, ईश्वर आणि आत्मा एकच तर आहेत. प्रत्येक साधकची गरज लक्षात घेत ईश्वर मनुष्य स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात प्रकट होत मनोभावे प्रार्थना करणार्‍या भक्ताला आत्मलाभ होण्यासाठी मदत करतच असतो.
प्रश्नः एका सद्गुरूंशी एकनिष्ठ असताना तुम्ही अन्य गुरूंचा आदर करू शकता का?
रमण महर्षी: गुरू एकच आहेत. ते निव्वळ देहधारी नसून चैतन्यस्वरूप आहेत. तुमच्यातले दोष दूर होत नाहीत तोवर त्यांच्या सामर्थ्याच्या आधाराची आवश्यकता असतेच असते.
प्रश्नः काही थोर विभूतींना गुरू नसूनही ज्ञानप्राप्ती कशी झाली?
रमण महर्षी: काही अत्यंत विरळ्याच आणि अतिशय परिपक्व अशा साधकांच्या समोर ईश्वर निराकार असलेल्या ज्ञानप्रकाशाच्या स्वरूपात लकाकतो आणि तत्क्षणी ते त्यांच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान करून घेतात.
प्रश्नः मी आपल्या चरणी कायमचा लीन झालेलो आहे. आम्ही ज्याचे अनुकरण करावे असा काही उपदेश भगवान आम्हाला देतील काय? अन्यथा इथून ६०० मैलांवर वास्तव्य करावे लागत असताना आपली मदत आम्हाला कशी मिळू शकेल?
रमण महर्षी: खरे सद्गुरू अंतर्यामी आहेत (ज्यांचे तुमच्या अस्तिस्त्वाशी तादात्म्य आहे).
प्रश्नः हे समजण्यासाठी देखील मला सद्गुरूंची गरज आहे.
रमण महर्षी: ते अंतर्यामी उपस्थित आहेतच.
प्रश्नः मला समोर दिसतील असे गुरू हवे आहेत.
रमण महर्षी: समोर दिसणारे गुरूच तुम्हाला हे सांगत आहेत की गुरू अंतर्यामी देखील उपस्थित आहेत.
प्रश्नः एखाद्या शिष्याला कालांतराने लक्षात आले की आपले गुरू पुरेसे पात्र किंवा सक्षम नाहीत, तर त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवलेल्या शिष्याची पुढची गती कशी असेल?
रमण महर्षी: ती प्रत्येक शिष्याच्या गुणवत्तेप्रमाणे वेगवेगळी असते.
प्रश्नः एखाद्याला एकापेक्षा अधिक अध्यात्मिक गुरू असावेत का?
रमण महर्षी: गुरू कोण आहेत? शेवटी ते तुमचे आत्मस्वरूपच तर आहेत. साधकाच्या मनाचा अध्यात्मिक विकास होत असताना मधे ज्या अवस्था येतात त्या प्रमाणे बाह्य गुरू या स्वरूपात आत्माच तर प्रकट होत असतो. असे म्हणतात की सगळ्या साधकांना वंदनीय आणि अत्यंत प्रिय असलेल्या प्राचीन काळातल्या दत्तगुरूंना तर चोवीसपेक्षाही अधिक गुरू होते. आपण एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकतो तेव्हा तो आपल्याला गुरूस्थानीच असतो. दत्तगुरूंचेच उदाहरण घेतले तर सहज लक्षात येईल की गुरूतत्व निर्जीव वस्तुंमधेदेखील असू शकते, कारण गुरू आणि आत्मतत्व यात एकात्मताच असते.
प्रश्नः एखाद्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर तेच पुरेसे ठरून तो जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटेल अशा जीवनमुक्त अवस्थेप्रत पोचू शकतो, की आत्मसाक्षात्कार घडावा या साठी ईश्वरी कृपेचीच गरज असते?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वरी कृपा देखील आवश्यक असते, नव्हे ईश्वरी कृपाच आत्मसाक्षात्कार घडवू शकते. पण अशी कृपा सच्चे भक्त किंवा श्रेष्ठ योगीजनांनाच प्राप्त होते. मुक्तीकडे घेऊन जात असलेल्या मार्गावर चालत असताना ज्याने अथकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, केवळ अशा उच्च कोटीच्या साधकांनाच ईश्वरी कृपा प्राप्त होते.
पुरवणी:
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेत श्री दत्त संप्रदाय आणि श्री नाथ संप्रदायाचे मोलाचे योगदान आहे. सद्गुरूंचे तसेच गुरूदीक्षेचे अनन्यसाधारण महत्व असल्याने या संप्रदायांना गुरू संप्रदाय असे देखील संबोधले जाते. निवृत्तीनाथांसारख्या थोर सद्गुरूंविषयीचे आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या
'अमृताते ही पैजा जिंके' असा सार्थ गौरव प्राप्त केलेल्या शब्दवैभवाचा ओघ असा काही दुथडी भरून वाहतो, की त्याला तोडच नाही! गुरूकृपेची महती वर्णन करताना प्रतिपाद्य विषय बाजूला पडतो, पण गुरूकृपा हा विषयच असा आहे की भरभरून बोलल्याविना राहवत नाही असे कबूल करत आपल्या हातून वारंवार बोलल्या जात असलेल्या 'अवांतराबद्दल' माऊलींनी सद्गुरूंची आणि श्रोत्यांची माफी देखील मागितलेली आहे! माऊलींनी लिहीलेले 'अवांतर' हा मराठी साहित्यातले एक अनमोल लेणे ठरला आहे.
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या गुरूपरंपरेचे महात्म्य सांगत असताना सद्गुरू चरणांची उपासना केल्याने आपले जीवन कृतार्थ झाले आहे असा नि:संदिग्ध शब्दात निर्वाळा दिलेला आहे. त्यानेच या लेखाची सांगता करतो:
आदिनाथ सिद्ध । आदिगुरु थोर । त्यासी नमस्कार । भक्तिभावे ।।
तयाचे पासून । शिवशक्ति बीज । लाधले सहज । मत्स्येंद्राते ।।
मत्स्येंद्राने दिले । गोरक्षालागोन । गोरक्षे गहिनी । धन्य केला ।।
गहिनीनाथे बोध । केला निवृत्तीसी । निवृत्ती उपदेशी । ज्ञानदेवा ।।
ज्ञानदेव शिष्य । देव चुडामणि । पुढे झाले मुनी । गुंडाख्यादि ।।
रामचंद्र महा । देव रामचंद्र । प्रसिद्ध मुनींद्र । विश्वनाथ ।।
योगसार ऐसे । परंपरा प्राप्त । सद्गुरु गणनाथ । देई मज ।।
स्वामी म्हणे झाले । कृतार्थ जीवन । सद्गुरु चरण । उपासिता ।।