Friday 10 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण

या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. शिष्याने सातत्याने त्या मंत्राचा जप करण्याकडे लक्ष दिले, तर सद्गुरूंची शक्ती अशा प्रकारे कार्यरत होते; जेणेकरून शिष्याला आत्मसाक्षात्काराचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रगती करताना ती सातत्याने मदत करत राहते. रमण महर्षींना या मार्गाची वैधता मान्य असली तरी त्यांनी स्वत: औपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. महर्षींनी दीक्षा देताना मंत्रोपदेश केल्याचेही दिसून येत नाही. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल की नामस्मरणाचा उल्लेख मात्र महर्षी अत्यंत आदरपूर्वक करत असत. भक्ती आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारलेल्या साधकांसाठी नामस्मरण हे अत्यंत उपकारक असे साधन आहे असे आग्रही प्रतिपादन महर्षी करत असत.

समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो असे प्रतिपादन महर्षी करत असत. व्यक्तिगत 'मी' चे तसेच इंद्रियगोचर बाह्य जगताविषयीचे भान हरपून त्या ऐवजी ईश्वरी शक्तीचे अनुसंधान घडत रहावे या दृष्टीने जप आणि नामस्मरणाचे महत्व अनन्यसाधारणच आहे.

सुरूवातीच्या काळात नामस्मरणाचे स्वरूप ध्यानस्थ होण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक चालवलेला अभ्यास असे असते. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. महर्षींचे असे मत होते की परिणामकारक पद्धतीने नामस्मरण करायचे असेल तर आपल्या दैवताला मनोभावे आणि आंतरिक तळमळीने साद घालणे तसेच अनन्य भावाने त्या दैवताच्या पायी शरणागत होणे अनिवार्य आहे. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.

नामस्मरणाच्या प्रगत अवस्थांबद्दल बोलत असताना महर्षींनी वर्णन केलेल्या संकल्पनांमधे गूढरम्यतेचे वलय स्पष्टपणे दिसून येत असे. ईश्वराचे नाम आणि साधकाचे आत्मस्वरूप एकच गोष्ट आहेत असे महर्षी सांगत असत; तसेच त्या पुढे जात आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर साधकाच्या हृदयात (अंतर्यामी) साधकाचे इष्टदैवतच स्वत:चा जप करत राहते आणि साधकाला कुठलेही सायास पडत नाहीत असेही महर्षी सांगत असत (उदा. राम हमारा जप करे, हम बैठे आराम - संत कबीर दासजी). जपाचे साधन 'स्व' विषयीच्या जागृतीत (स्वसंवेद्यता) विलीन होईल तेव्हाच ही स्थिती प्रात होते असा निर्वाळा महर्षी देत असत. नामस्मरण ते स्वसंवेज्ञता असे अवस्थांतर घडणे किती आवश्यक आहे हे सांगताना चौदाव्या शतकातला कार्यकाल असलेल्या महाराष्ट्रातल्या संत नामदेवांच्या एका वचनाचा ते आदराने उल्लेख करत असत. त्या वचनाचा असा अर्थ होतो - "'मी' च्या सत्य स्वरूपाची ओळख पटली तरच नामाच्या सर्वव्यापकतेचा बोध होणे संभवते. जोवर 'मी' विषयीचा यथार्थ बोध होत नाही, तोवर नामाच्या सर्वव्यापी सत्तेची अनुभूती यावी हे संभवतच नाही". संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल.

प्रश्नः लोक (निर्गुण निराकार) देवाला नानाविध नावे देतात आणि असे सांगतात की अमुक एक नाम अत्यंत पवित्र आहे. ते असे म्हणतात की नामाची पुनरूक्ती केल्याने साधकाला दैवी वरदान मिळून त्याची अध्यात्मिक प्रगती होते. हे खरे कसे असू शकेल?
रमण महर्षी: यात शंका घेण्याजोगे काय आहे? तुमचेही एक नाव आहे, ज्याला तुम्ही प्रतिसाद देता. मात्र हे अवश्य लक्षात घ्या की जन्माला येताना हे नाव तुमच्या देहावर लिहीलेले नव्हते. तुमच्या देहाने आजवर कुणालाही असे सांगितलेले नाही की अमुक तमुक हे माझे नाव आहे. तरीही तुमचे नामकरण झालेले आहे. त्या नावाशी तुमची ओळख जोडली गेलेली असल्याने तुम्ही त्याला प्रतिसाद देखील देता आहात. याचाच अर्थ असा होतो की त्या नावाचे असे काही ना काही महत्व खचितच आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुमचे नाव हा निव्वळ कल्पनाविलास आहे असे म्हणता येणार नाही. तद्वतच देवाच्या नावात सामर्थ्य आहे आणि नामस्मरणही परिणामकारक आहे. नामाची पुनरूक्ती केल्याने नाम ज्या गोष्टीचे (इष्टदैवत) महात्म्य दर्शवते तिचे स्मरण साधले जाते. त्यामुळे अध्यात्मिक लाभ होतो हे वेगळे सांगायला नको.

प्रश्नः (अल्पशिक्षीत असल्याने) मला अध्यात्मशास्त्राची फारशी माहिती नाही. आत्मविचाराची साधनपद्धती मला खूप कठिण वाटते. स्त्री असल्याने आणि त्यातून सात मुलांची आई असल्याने माझ्यावर घरकामाचे मोठे ओझे आहे. प्रपंचातच सगळा वेळ जात असल्याने मला ध्यानधारणेसाठी उसंत मिळत नाही. माझी भगवानांना विनंती आहे की त्यांनी मला साधी सुलभ अशी एखादी साधना सुचवावी.
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार घडावा या साठी कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे किंवा शास्त्रवचनांचे ज्ञान असण्याची गरज नाही. आपले रूप न्याहाळण्यासाठी आपल्याला फक्त एक आरसा पुरेसा असतो, तसेच आत्मसाक्षात्काराचे देखील आहे. विद्वानांना देखील शेवटी जन्मभर गोळा केलेल्या सगळ्या पुस्तकी ज्ञानाचे गाठोडे ते 'अनात्मस्वरूप' आहे हा बोध झाल्यावर अडगळीत टाकून द्यावे लागते. प्रापंचिक कामे करण्याने किंवा मुलाबाळांची काळजी वाहण्याने अध्यात्मिक प्रगतीत विघ्नच यावे असा कुठलाही नियम नाही. "मी कोण आहे" ही साधना शिकवत असताना मी सल्ला देतो त्याप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही साधना न करता फक्त (जाणीवेच्या उगमस्थानाकडे जमेल तेव्हा जमेल तितके अवधान देत) 'मी आहे' 'मी आहे' असे सतत पुटपुटत राहिलात तरी ते पुरेसे आहे. तेलाची अखंड धार पडावी तसे सातत्याने हे स्मरण करत राहिलात तर तुम्ही आपोआप साक्षात्कारी स्थितीपर्यंत पोचाल. प्रपंचातले कुठलेही काम हातावेगळे करत असताना, अगदी उठता बसता प्रत्येक क्षणी हे स्मरण सतत होत राहिले पाहिजे. 'मी आहे' ही जाणीव (अहंस्फुरणा किंवा शुद्ध चैतन्य) हेच देवाचे खरे नाव आहे. सगळ्या मंत्रांपैकी हा प्रथम क्रमांकाचा आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. प्रणवाची महती देखील या मंत्रापुढे दुय्यम स्वरूपाची आहे.

प्रश्नः वाचेने स्पष्ट उच्चार करत (प्रणवाचा किंवा एखाद्या मंत्राचा) जप केल्याने काहीच लाभ मिळत नाही का?
रमण महर्षी: स्पष्ट उच्चार करत केलेल्या जपाने काहीच लाभ होणार नाही असे कोण म्हणेल? असा जप खात्रीपूर्वक चित्तशुद्धी करण्याच्या कामी येईल. सातत्याने जप साधना करत राहिल्यास तो प्रयत्न एका प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोचतो आणि कमी अधिक काळाने का होईना साधकाला योग्य मार्गावर आणून सोडतो. अशी पक्की खात्री बाळगा की भले असो की बुरे, तुम्ही जे काही करता ते वाया कधीच जात नाही. मात्र प्रत्येक साधकाचा पिंड तसेच तो परिपक्वतेच्या कुठल्या अवस्थेत आहे हे लक्षात घेत त्याला कर्म, अकर्म इत्यादिंचे भेद तसेच तो करत असलेल्या साधनपद्धतीमधले गुण आणि दोष सद्गुरूंना त्याला स्पष्ट शब्दात सांगावे लागतात.

प्रश्नः कुठल्याही व्यक्तीने सहजच जाता येता एखादा पवित्र मंत्र निवडला आणि त्याचा जप सुरू केला तर त्याचा काही फायदा होतो का?
रमण महर्षी: नाही. एक तर त्या व्यक्तीची तशी पात्रता असायला हवी आणि तिला सुपात्र सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा मिळायला हवी.

राजा आणि प्रधानाच्या एका गोष्टीमधून हा मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एक राजा अचानक आधी न कळवता त्याच्या प्रधानाच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेला. तिथे गेल्यावर त्याला असे सांगण्यात आले की प्रधान जप करण्यात व्यग्र असल्याने राजाला थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. थोड्या वेळाने प्रधानाची भेट झाल्यावर राजाने कुतुहलाने प्रधानाला विचारले की तो नेमक्या कुठल्या मंत्राचा जप करत होता. प्रधानाने उत्तर दिले, की तो सगळ्यात पवित्र अशा गायत्री मंत्राचा जप करत होता. ते ऐकून गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी अशी राजाने प्रधानाला गळ घातली. प्रधानाने मात्र विनम्रपणे नकार देत असे सुचवले की मंत्र दीक्षा देण्याची पात्रता प्रधानाच्या अंगी नव्हती. राजाने ते मान्य केले. तो विचार मनात सतत घोळत राहिल्याने राजाने एका विद्वान व्यक्तीकडून गायत्री मंत्राचे उच्चारण शिकून घेतले. प्रधानासोबतच्या पुढच्या भेटीतच राजाने गायत्री मंत्राचे पठण करून दाखवत प्रधानाला विचारले की एखादी चूक होत असेल तर प्रधानाने ती नि:संकोचपणे दाखवून द्यावी. प्रधानाने उत्तर दिले की मंत्रोच्चारण तर अगदी बिनचूक आहे, मात्र राजाने आपल्या मनाने मंत्र जप आरंभणे उचित नाही. राजाला ते पटले नाही. त्याने खोदून खोदून विचारले तरीही प्रधानाने उत्तर देताना टाळाटाळ केली.

उतावीळ झालेल्या राजाने उत्तर मिळायलाच हवे असा दबाव टाकल्यावर प्रधानाने एक युक्ती केली. त्याने जवळ उभ्या असलेल्या शिपायाला आज्ञा दिली, की शिपायाने राजाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपाई जागचा हलला नाही. शिपायाचे ते वर्तन पाहून प्रधान पुनःपुन्हा अधिकाधिक जोराने तीच आज्ञा देत राहिला, मात्र शिपायाने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा प्रकार असह्य झाल्याने राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या भरात राजाने शिपायाला आज्ञा दिली की प्रधानाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपायाने तत्क्षणी प्रधानाला जेरबंद केले.

प्रधान जोरजोरात हसायला लागला. त्याने राजाला विचारले की तुम्हाला हवे ते स्पष्टीकरण मिळाले का? राजा बुचकळ्यात पडला. त्याने विचारले की प्रधांनजींना नेमके काय सांगायचे आहे. प्रधानाने उत्तर दिले, "आज्ञा तंतोतंत तीच होती आणि आज्ञेचे पालन करणारी व्यक्तीदेखील तीच होती. मात्र आज्ञा देत असलेल्या व्यक्तीच्या अधिकारात फरक होता. हे राजन, मी आज्ञा दिली, तेव्हा ती पूर्णपणे निष्फळ ठरली. मात्र तीच आज्ञा आपण दिलीत, तेव्हा तत्क्षणी तिचे पालन केले गेले. मंत्रदीक्षेच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो."

पुरवणी:
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींविषयीचे विवेचन आहे. भगवद्गीता १०.२५ या श्लोकात 'यज्ञानां जपयज्ञोSस्मि' - सर्व प्रकारच्या यज्ञांमधे जपयज्ञ ही माझी विभूती आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

नाथपंथी ध्यानयोग (लेखक:- प. पू. श्री. दादा आंबेकर - नाशिकचे नाथपंथी गुरूदेव श्री गजानन महाराज यांचे शिष्य, प्रकाशकः सोहम प्रकाशन, सातारा) या पुस्तकात सोहम साधनेतील मंत्रजप तसेच नामस्मरणाची महती सांगणारी तसेच सविस्तर माहिती देणारी पाच प्रकरणे आहेत. जिज्ञासूंसाठी हा सगळा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. विस्तारभयास्तव पुस्तकातला नाममहात्म्याविषयीचा संतजनांनी मोजक्याच शब्दात दिलेला अभिप्राय नमूद करून लेखाची सांगता करतो.

सद्गुरूंना साक्षात्कार झाल्यावर ते ब्रह्मरूप होतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या नामात अगाध शक्ती असते. त्यांना संकल्पशक्तीने शिष्याला जे सामर्थ्य द्यायचे असते ते देता येण्यासाठी आधार किंवा वाहक या स्वरूपात ते नामाचा उपयोग करतात. अशा नामाला 'सबीज' नाम असे म्हणतात (उदा. जपे हरिनाम बीज। तोचि वर्णामाजी द्विज॥ तुका म्हणे वर्णधर्म। अवघे आहे सम ब्रह्म ॥ - संत तुकाराम)

नामेचि सिद्धि, नामेची सिद्धी|
व्यभिचार बुद्धि, न पावता ||
- संत तुकाराम

अठरा पुराणांच्या पोटी |
नामावीण नाही गोष्टी ||
- संत नामदेव

सार सार सार, विठोबा, नाम तुझे सार|
म्हणोनि शूळपाणि जपताहे निरंतर ||
- संत ज्ञानदेव

No comments:

Post a Comment