Saturday 3 August 2013

तबला (3) - नृत्याची साथ

तबल्याविषयक लेखमालेच्या या भागापासून तबल्याचा साथीचे वाद्य या दृष्टीने विचार करायचा आहे. भारतात हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत हे दोन मुख्य प्रवाह आहेत. या पैकी ही लेखमाला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या प्रवाहाशी प्रामुख्याने निगडीत आहे. हिंदुस्तानी संगीतात लोकमान्यतेच्या दृष्टीने (प्रचार आणि प्रसार हे मापदंड लावता) मुख्य प्रवाह असलेल्या ध्रुपद गायकीची जागा ख्याल ने घेतली ( तशीच पखवाजाची जागा तबल्याने घेतली). हे स्थित्यंतर काळाच्या ओघात झाले, तसेच परकीय आक्रमक इथे स्थिरावल्यावर झालेली सांगितीक देवाणघेवाणही बर्याच प्रमाणात कारणीभूत ठरली. हे बदल दूरगामी परिणाम करणारे ठरले. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा, चिंतनाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. असो. आज हिंदुस्तानी संगीताच्या नृत्य, गायन आणि वादन या तिन्ही प्रकाराना तसेच उपशास्त्रीय संगीताला तबल्याची साथ असावी हा नियमच झालेला आहे.



आता कथ्थक नृत्याची साथ करणार्या तबलजीची काय खासियत असावी हे थोडक्यात पाहू. नृत्याची साथ करणार्या तबलजीची तयारी विलक्षणच असावी लागते. कथ्थक शिकलेल्या नर्तकांचा तबल्याचा व्यासंग अफाट असतो. त्याना बरोबरीने, सहीसही साथ करायची तर त्या तोडीचाच व्यासंग असणे क्रमप्राप्त असते. हे नर्तक लय आणि तालाच्या बाबतीत भलतेच जहांबाज असतात. उपज अंगाने (ऐनवेळी सुचेल तसे) अवघड 'हिसाब' असणारे 'गिनती' चे बोल रचून ते तत्क्षणी सादर करत असताना त्याना प्रत्युत्तर द्यायचे तर निव्वळ पाठांतर असून चालत नाही, त्या जोडीला प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा पण असावा लागतो. आणि यात तबलजी कुठल्याही बाजूने कमी पडला, तर ते जाणकारांच्या लगेच लक्षात येऊन तो चक्क उघडा पडतो. बिरजू महाराजांची साथ करायची, तर तबलजीचा कस तर लागतोच नव्हे ती त्याची सत्त्वपरीक्षाच असते असे म्हणावे तर अतिशयोक्ती ठरू नये. या फितीवरून त्यांचा व्यासंग आणि तालावरचे प्रभुत्व यांचा सहज अंदाज येईल.

चक्रदार म्हणजे एक ठराविक बोलमाला तीन वेळा वाजवून समेवर येणे असे सोपे करून सांगता येइल. यात मध्ये विराम नसेल, ती बोलमाला सलग तीन वेळा वाजत असेल तर त्या प्रकाराला 'बेदम' असे म्हणतात. फिरकीची डायल असणार्या जुन्या फोनचा डायल करताना जो 'टरटर' आवाज येतो, तो तसा 'बेहिसाब' असतो. या बेहिसाब प्रकारावर बिरजू महाराजानी रचलेला असाच एक चक्रदार पद्धतीचा बोल, आणि त्याला तत्क्षणी उ. झाकिर हुसेन यानी दिलेले अत्यंत समर्पक प्रत्युत्तर हा अक्षरशः अंगावर काटा आणणारा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंतपणे उभा राहतो. या फितीत महाराजजी गिनती चे चक्रदार सादर करत आहेत.



पंडित आनिंदो चटर्जी यानी कथ्थक ची साथ करतानाची आमद (सुरूवातीला केलेले एकल वादन) आणि रेला दोन्ही अफलातून आहेत.



नृत्य, गायन आणि वादन तिन्हीचा बेजोड मिलाफ असणारी एक ध्वनिचित्रफीत देउन या भागाची सांगता करतो. यात पंडित राजन - साजन मिश्रा जी 'पढंत' करतात त्यातून तबल्याची जी भाषा आहे, ती निव्वळ हिसाब - किताबाची चोपडी नसून या भाषेतही काव्य आहे, ती अर्थवाही आहे. शिवाय संताप, कंटाळा, शृंगार इत्यादी भावछटा व्यक्त करायलाही ती समर्थ आहे याचा अंदाज येईल. शेवट एका अप्रतिम तराण्याने केलेला आहे. (पुढील भागात वादनाच्या साथीचा विचार करू)


 

No comments:

Post a Comment