Showing posts with label Ramana Maharshi. Show all posts
Showing posts with label Ramana Maharshi. Show all posts

Sunday, 17 May 2020

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोक सांगीतला होता:

जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०)

पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोक त्याच क्रमाने घेतले, तर महर्षींनी सुचवलेले गीता-सार असे होईलः

(1)
संजय सांगे धृतराष्ट्राते पार्थ तसा उद्वेगे
मान खालती घालुनी रथी बसला होता मागे
भरूनी आले नयन त्यातुनी घळघळ वाहे नीर
कारूण्ये अति दीन जाहला म्हणुनी सुटला धीर
(भावार्थ गीता २.१)

(2)
वदे श्री-पति, "क्षेत्र बोलती पार्था या देहाते
ह्याते जाणे तया बोलती 'क्षेत्रज्ञ' असे ज्ञाते"
(भावार्थ गीता १३.१)

(3)
सर्व क्षेत्री मी चि किरीटी, क्षेत्रज्ञ वसे जाण
क्षेत्र-क्षेत्रज्ञासी जाणणे ते चि मानितो ज्ञान
(भावार्थ गीता १३.२)

(4)
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(भावार्थ गीता १०.२०)

(5)
दिवस उगवला जसा मावळे अस्तापाठी उदय
रिते चि भरते भरले सरते हा सृष्टीचा न्याय!
उपजे ते ते विनाश पावे नाश पावले निपजे
अटळ गोष्ट ही म्हणुनि अर्जुना, तुज हा शोक न साजे
(भावार्थ गीता २.२७)

(6)
होउनि गेला होणार पुढे असा न ह्याते जाण
जन्म न पावे न निमे अज हा शाश्वत नित्य पुराण
जाण विनाशी देह जाय परि भंग नसे आत्म्याते
शस्त्रे छाया तोडिली तरी काय रूते अंगाते?
(भावार्थ गीता २.२०)

(7)
न तुटे न जळे न भिजे न सुके असे सर्व-गत नित्य
तेवि स्थिर हा अचल सनातन हा अव्यक्त अचिंत्य
(भावार्थ गीता २.२४)

(8)
ते अविनाशी जाण जे असे अखिल जगा व्यापोनी
विनाश अव्यय तत्वाचा त्या करू शकेना कोणी
(भावार्थ गीता २.१७)

(9)
जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा?
तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोहींचा साचा
जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी
तद्वत विश्वी गुप्त सार ते शोधी तत्वज्ञानी
सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून
उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून
की पाखडुनी भूस टाकुनी केवळ दाणा घेती
तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्मपदी स्थिर होती
(भावार्थ गीता २.१६)

(10)
सूक्ष्म म्हणूनि ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन
भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण
(भावार्थ गीता १३.३२)

(11)
पद अविनाशी स्वयंप्रकाशी तेजोमय ते पूर्ण
प्रकाशित तया करू न शकती सूर्य चंद्र वा अग्न
पावता जिथे पुन्हा न परते स्वर्ग-नरक-संसारी
जीव समरसे ते चि मम असे परं-धाम अवधारी
(भावार्थ गीता १५.६)

(12)
विश्वी भरले विश्व जाहले जरी ते चि संपूर्ण
तरी लोपता विश्व तत्वता ते न लोपते जाण!
त्या अव्यक्ताक्षर तत्वाते 'परम गति' असे म्हणती
पावता चि मत्परंधाम ते जन्म-मरण ना पुढति
(भावार्थ गीता ८.२१)

(13)
सांडुनि जाती घन वर्षांती जसे स्वभावे गगन
तेवि जयाते सोडुनि गेले मोह आणि अभिमान
पदार्थमात्री अनासक्त जे अध्यात्मी तल्लीन
नितांत निर्मळ बुद्धि जयांची नसे वासनाधीन
सुख दु:खादि द्वंद्व-बंध ते आकळिती न जयांते
सहजे ज्ञाते पावती चि ते अव्यय परम-पदाते
(भावार्थ गीता १५.५)

(14)
विषय-विलासामाजी चि पिसा होउनि जो साचार
शास्त्र-विधीते त्यजुनी येथे करितो स्वैराचार
न च कल्पांती ती परम गती तया लाभते जाण
सुख हि न च मिळे मग ते कुठले तया ब्रह्म-निर्वाण!
(भावार्थ गीता १६.२३)

(15)
तरी अर्जुना, एक चि नाना नाशिवंत भूतांत
सम अविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत
(भावार्थ गीता १३.२७)

(16)
मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगती
तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावे अंती
मिळता अनली इंधन जैसे अग्निरूप ते होते
साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नाते
मजसी मिळता नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत
म्हणुनि राहे मी चि होऊनी मज माजी चि निवांत!
अनन्य-भक्ति करी भारता, तो चि तत्वता माते
असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथे
(भावार्थ गीता ११.५४)

(17)
स्वभाव ज्याचा जसा तयाची श्रद्धा हि तशी मानी
श्रद्धा धरितो तसा चि होतो श्रद्धा-मय हा प्राणी
(भावार्थ गीता १७.३)

(18)
ब्रह्म-निष्ठ तो ज्ञान पावतो तत्पर संयम-शील
परम शांति मग ती मिळवाया तया न लागे वेळ
(भावार्थ गीता ४.३९)

(19)
सदा रंगले नित्य जे भले प्रेमे माझ्या ठायी
ज्ञान-भक्ति-सुख देवोनि तया निज-धामाते नेई
(भावार्थ गीता १०.१०)

(20)
जाण अर्जुना, करूनी करूणा स्वये प्रकटुनी हृदयी
तया दावितो तेजस्वी तो ज्ञान-दीप लवलाही
प्रकाश होता नुरे तत्वता भ्रांति-रूप अंधार
मद्भक्ताला तदा संपला जन्म-मरण-संसार
(भावार्थ गीता १०.११)

(21)
आत्म-ज्ञाने असे जयांचे हरपले अज्ञान
तया प्रकटवी पर-तत्वाते रवि-सम ते चि ज्ञान
जशी उजळता पूर्व दिशा ती दिशा उजळती दाही
आत्मानुभवे तया स्वभावे विश्वी न दुजे काही
जिथे पहावे तिथे दिसावे आत्म-रूप जगतात
आत्मरूपता अशी प्रकटता रंगुनि जाती त्यात
(भावार्थ गीता ५.१६)

(22)
थोर इंद्रिये त्याहुनी मन ते थोर त्याहुनी बुद्धी
त्या बुद्धीहुनी परमात्म जो तो चि थोर निरूपाधि
(भावार्थ गीता ३.४२)

(23)
त्या आत्म्याते जाणुनि राहे आत्म-बळे स्थिर तेथे
आणि संहरी अजिंक्य ऐशा काम-रूप शत्रुते
(भावार्थ गीता ३.४३)

(24)
प्रदीप्त अग्नि जसा जाळुनी टाकी काष्ठे पूर्ण
ज्ञानाग्नि तसा भस्मसात करी सर्व हि कर्मे जाण
(भावार्थ गीता ४.३७)

(25)
नसे अपेक्षा फली जयाची सकल हि कर्मे करिता
'मी कर्ता, हे करीन' न शिवे संकल्प असा चित्ता
ज्ञानाग्निने अशी जयाची कर्मे जळुनी जाती
सुजाण नर ते त्या पुरूषाते 'पंडित' ऐसे म्हणती
(भावार्थ गीता ४.१९)

(26)
आत्म-ज्ञानी निष्काम यती स्वाधीन अंतःकरण
क्रोध-रहित जे सर्वत्र तया असे ब्रह्म-निर्वाण
योगी-जन तो कस पावतो ह्या देही चि ब्रह्म
ऐक भारता, तुज सांगतसे संक्षेपे ते वर्म
(भावार्थ गीता ५.२६)

(27)
मग ह़ळूहळू उपरत व्हावे धैर्य-युक्त बुद्धीने
आत्म-स्थित मन करूनी काही नच चिंतावे त्याने
(भावार्थ गीता ६.२५)

(28)
ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते
तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते
जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे
आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे
सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल
आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल
(भावार्थ गीता ६.२६)

(29)
जये साधिला मनोलय असा पवनद्वारा गगनी
मोक्ष लक्षुनि तृष्णा-भीति-क्रोधरहित होवोनी
मन-बुद्धीसह इंद्रिय-वृत्ती रिगता चि महा-शून्यी
तो चि पावतो संयमी मुनी जीवन्मुक्ती निदानी!
(भावार्थ गीता ५.२८)

(30)
आत्म्याठायी भूतमात्र ते सकळा भूती आत्मा
सर्वत्र चि हे समत्व पाहे असे योग-युक्तात्मा
(भावार्थ गीता ६.२९)

(31)
नित्य अंतरी चिंतन करूनी उपासिती जे भक्त
अनन्य-भावे अखंड माते होउनिया संयुक्त
निज-सायुज्या नेउनी तया अथवा भक्ति-प्रेम
देउनी असा मी चि तयांचा वाहे योग-क्षेम!
(भावार्थ गीता ९.२२)

(32)
नित्य जोडला एकनिष्ठ तो असे श्रेष्ठ सर्वात
मी अत्यंत प्रिय त्यासि तसा तो प्रिय मज अत्यंत!
अनन्य सहजे निरंतर भजे मी चि होउनी माते
असुनी देही आत्म-रूप तो त्यजी देह-भावाते
(भावार्थ गीता ७.१७)

(33)
योगी ज्ञानी भक्त भला तो बहु जन्मांती शरण
मज सर्वस्वी येउनि चुकवी जन्म आणखी मरण!
पाहे अथवा निवांत राहे तरी तयाते मीच
सबाह्य-अभ्यंतरी दिसतसे नसे दुजे काहीच
आत्मानुभवे जग चि आघवे वासुदेव-मय झाले
बहु दुर्लभ तो महंत विश्वी विश्व होउनी खे़ळे!
(भावार्थ गीता ७.१९)

(34)
सोडुनि नाना मन:कामना आत्म-तुष्ट जो राहे
आत्म-द्वारा, तया बोलती स्थित-प्रज्ञ तू पाहे
(भावार्थ गीता २.५५)

(35)
निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधि
निरहंकारी निर्मम नर तो परम शांति संपादी
(भावार्थ गीता २.७१)

(36)
सर्वा भूती भगवंत असा भाव बाणला म्हणुनी
कवणाते तो नुबगे ज्याते तेवि नुबगती कोणी
विषय निमाला विश्वी झाला विश्व-रूप जो पाही
म्हणुनि जयाला चित्ती नुरला हर्ष-विषाद मुळी हि
जगती न दुजे ह्यास्तव सहजे निर्भय जो अक्रोधी
प्राणाहुनि तो प्रिय मज होतो पार्था सम्यग्बोधी!
(भावार्थ गीता १२.१५)

(37)
समान मानापमान मानी समान शत्रू-मित्र
निश्चल राहे विश्वी पाहे आत्म-रूप सर्वत्र
होता ब्रह्मावबोध कर्मारंभ खुंटला ज्याचा
जाण अर्जुना, तो चि त्रिगुणातीत बोलिला साचा
(भावार्थ गीता १४.२५)

(38)
परी रंगला आत्म-सुखी जो जया आत्म-संतृप्ती
आत्म्यात चि तो संतुष्ट तया कार्य उरे ना जगती
असुनि देही तया न राहे देह-धर्म-संबंध
म्हणुनि तयाचा कर्तव्याचा सुटला सहजे बंध
(भावार्थ गीता ३.१७)

(39)
कर्म तयाने केले अथवा न च केले ह्या जगती
तरि धनंजया, अ-संगा तया काय तयाची महती!
नसे तयाचा मोह गुंतला इथे भूत-मात्रात
देह विसरला अखंड रमला जो आत्मानंदात
परी अर्जुना, जोवरी मना भेटे ना हे ज्ञान
कर्म-साधना तोवरी जना उचित सर्वथा जाण
(भावार्थ गीता ३.१८)

(40)
आणि मिळे ते गोड मानितो जो निर्मत्सर झाला
सुख दु:खादि द्वन्द्वे ती ना स्पर्शू शकती ज्याला
मिळो यश तसे न मिळो तेथे असे सदा सम-भावे
जरी आचरे कर्म सकल तो कर्म-बंध न च पावे
(भावार्थ गीता ४.२२)

(41)
पार्था, पाहे ईश्वर राहे सर्व-भूत-हृदयात
निज-मायेने तो चि खेळवी जगत्सुत्र निभ्रांत
घालुनी यंत्री माया-सूत्री तो परमेश नियंत्री
भूते सगळी जशी बाहुली सूत्र-धार कळसूत्री
(भावार्थ गीता १८.६१)

(42)
त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना, भावे
जसे जान्हवी-जळ सर्वस्वी सागराकडे धावे
कृपा तयाची होता साची स्वानंदैकनिधान
पावशील तू परम शांतिचे दिव्य अव्यय स्थान
(भावार्थ गीता १८.६२)

भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक तामिळ भाषेत रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः

ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू, तू आमचे रक्षण कर.

||श्रीकृष्णार्पणमस्तु||

Friday, 1 May 2020

श्री शेषाद्री स्वामी आणि भगवान श्री रमण महर्षी

श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते.

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले. तेथे निर्मनुष्य असलेल्या तळघरासारख्या जागेत असलेल्या 'पाताळलिंगम' या ठिकाणी महर्षींना याची देही याचि डोळा आपलाच मृत्यु होत असल्याचा अनुभव आला, तसाच पुढे निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान हरपलेल्या अवस्थेत त्या गुफेत महर्षी किती दिवस ध्यानस्थ होते हे सांगता येणे अवघड आहे. शेषाद्री स्वामींना दृष्टांत होत असत. एके दिवशी कोवळ्या वयातल्या एका सुकुमार योग्याचा अस्थिपंजर झालेला देह स्वामींना स्वप्नात दिसला आणि "या मुलाचे रक्षण कर" असा आदेशच अरूणाचलेश्वराने दिला. आपल्याला घडलेले दृष्टांत फोल नसतात हे पक्के माहित असलेल्या स्वामींनी त्या बालयोग्याचा शोध आरंभला. अरूणाचलाचा कानाकोपरा धुंडाळून देखील तो बालयोगी काही सापडेना. तेव्हा अरूणाचलेश्वरासमोर बैठक मारत स्वामींनी संकल्प सोडला की आता जोवर त्या बालयोग्याचा शोध लागत नाही तोवर अन्न किंवा पाण्याचे देखील सेवन करणार नाही. त्याला हुडकण्यासाठी आकाशपाताळ एक करेन. मनाच्या त्या उद्विग्न अवस्थेत अचानक स्वामींच्या लक्षात आले की आपण पाताळलिंगम या निर्जन स्थानी तर शोध घेतलेलाच नाही.

ते तडक पाताळलिंगम गुफेत येऊन पोचले. तिथे पाहतात तर काय आश्चर्य! अस्थिपंजर झालेला एक कोव़ळ्या वयातला मुलगा तिथे समाधिस्थ बसलेला त्यांना दिसला. देहाचे भान नसल्याने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी क्षते पडलेली होती, पिसवांसारख्या परजीवी कीटकांनी केलेल्या जखमा चिघळलेल्या होत्या. स्वामींच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. त्या अस्थिपंजर देहाला कडेवर घेत त्याचा पुत्रवत सांभाळ करायचे त्यांनी मनोमन ठरवले. रमण महर्षींच्या जीवनात शेषाद्रींचा प्रवेश झाला तो असा.

तिरूवन्नमलै गावाच्या पंचक्रोशीत शेषाद्री स्वामींची ख्याती एक विक्षिप्त अवलिया अशा स्वरूपाची होती. शेषाद्री स्वामींना संताप आला तर त्यांच्या पुढ्यात असलेल्या माणसाची खैर नसे. त्यांनी उच्चारलेले शब्द हमखास खरे होत असत. त्यामुळे गावात त्यांच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. अध्यात्मात रूचि असलेल्या कित्येकांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता, तर काहींच्या लेखी ते फक्त एक विक्षिप्त व्यक्ती होते. शेषाद्रींचे कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत. वानगीदाखल सांगायचे तर शेषाद्री स्वामी गावातून जात असताना समोरून एक गावकरी आणि एक रेडा येत होता. स्वामींनी त्या माणसाला विचारले, हे काय आहे? तो माणूस बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, "महाराज, हा तर रेडा आहे". यावर स्वामी म्हणाले, "अरे रेड्या, ते ब्रह्म आहे!" स्वामींचे कोड्यात टाकणारे बोलणे लोकांना अगम्य वाटत असे.

गावकर्‍यांचा लेखी अडाणी आणि विक्षिप्त असलेल्या शेषाद्री स्वामींना आयुर्वेदाचे तसेच वनौषधींचे सखोल ज्ञान होते. याच ज्ञानाच्या जोरावर अस्थिपंजर झालेल्या बाल रमण महर्षींवर उपचार करायला त्यांनी सुरूवात केली. स्वतःचे शून्य उत्पन्न असलेल्या आणि भिक्षेवर निर्वाह करत असलेल्या स्वामींवर परस्वाधीन असलेल्या बालयोग्याची जबाबदारी आलेली होती. त्याचे पालन पोषण कसे करायचे हा प्रश्नच होता. समाधीस्थ असलेला तो कुमार जिवंत आहे का हे पाहण्यासाठी गावातली टवाळ मुले त्याला त्रास देत असत. क्वचित प्रसंगी दगड किंवा वीट देखील फेकून मारत असत. शेषाद्रींनी आपला रूद्रावतार दाखवल्यावरच हा प्रकार बंद झाला. शेषाद्रींनी त्या कालखंडात तळहातावरच्या फोडाप्रमाणे महर्षींची काळजी घेतली.

समाधीस्थ असलेल्या देहाच्या अन्नपाण्याच्या गरजा अत्यंत मर्यादित असतात. शेषाद्रींना हे माहित होते. अरूणाचलाला रोज पंचामृताचा अभिषेक होत असे. महादेवाच्या पिंडीच्या मागच्या बाजूस असलेल्या एका पन्हाळीतून हे पंचामृत खाली पडत असे. हे पंचामृतच आपण तयार केलेल्या द्रोणात गोळा करून  दिवसातून दोन तीन वेळा तेच समाधीस्थ असलेल्या बालकाला ते भरवत असत. देहधारणेसाठी ते पुरेसे ठरत असे. स्वामींनी केलेले उपचार आणि दैवी कृपा यांच्या जोरावर महर्षी या अवस्थेतून कालांतराने बाहेर आले. निर्विकल्प समाधीच्या पलीकडे असलेल्या 'सहज समाधी' अवस्थेत त्यांचे ईश्वरी कार्यही सुरू झाले.

महर्षींच्या अध्यात्मिक अधिकाराची जाणीव असल्याने शेषाद्री स्वामींनी कधीही त्यांचे गुरूपद घेण्याचा प्रयत्न केला नाही. वयाने मोठे असल्याने ते महर्षींचा उल्लेख माझा लहान भाऊ असाच करत असत. रमणाश्रमात आलेल्या यात्रेकरूंनी, खास करून मद्रास सारख्या शहरी भागातून आलेल्या उच्चशिक्षीत लोकांनी ध्यानधारणा करणे किंवा महर्षींकडून शंकानिरसन करून घेणे सोडून आश्रमाचे व्यवस्थापन किंवा सामाजीक, राजकीय विषयावर टीकाटिप्पणी सुरू केली की शेषाद्री स्वामी अस्वस्थ होत असत. स्पष्टवक्ते असल्याने ते अशा लोकांची कानउघाडणी करत असत. एका उच्च्पदस्थ आणि गर्भश्रीमंत व्यक्तीला ते म्हणाले होते, 'हे पहा, हा माझा भाऊ रमण. याला हजार रूपये पगार आहे. मला शंभर रूपये पगार आहे. इतक्या दूरवर आला आहात तर भलत्याच गोष्टीत लक्ष न घालता एक रूपयाची तरी कमाई कराल. की जसे आलात तसेच खंक अवस्थेत परत जाणार आहात?"

रमण महर्षींची आई उतार वयात अरूणाचलाच्या आश्रयाला आल्यानंतर "मी शेषाद्री स्वामी. मी संन्यासी आहे. या आश्रमात मात्र रमण नावाचा एक प्रापंचिक राहतो" अशी रमण महर्षींची फिरकी घ्यायला ते कमी करत नसत. महर्षींबरोबर सलगीच्या नात्याने आणि अनौपचारिकपणे बोलण्याइतका अधिकार विरळ्याच व्यक्तींचा होता. शेषाद्री स्वामी त्यापैकीच एक होते. महर्षीही नेहेमी स्मितहास्य करून स्वामींच्या हजरजबाबीपणाला आणि विनोदबुद्धीला दात देत असत. रमणाश्रमाला लागूनच शेषाद्री स्वामींचा मठ आणि त्यांची समाधी आहे. रमणाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली, तर शेषाद्री स्वामींच्या समाधीचे दर्शन न चुकता घ्या असे नम्रपणे सुचवून तसेच रमण महर्षी, शेषाद्री स्वामीं आणि सद्गुरू श्री गुरव सरांना वंदन करून लेखाची सांगता करतो.

Monday, 27 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया

या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे आठ टप्पे असलेला अष्टांगयोग तसा सर्वज्ञातच आहे. या पैकी कित्येक टप्प्यांचा इतर साधनपद्धतींमधेही अंतर्भाव होत असला, तरी हठयोग आणि प्राणायामामुळे राजयोगाला त्याची वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींंच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. शारिरीक आरोग्य प्राप्ती किंवा देहशुद्धीवर फाजील भर देत असलेल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्यासाठी ते आपल्या अनुयायांना कधीच प्रोत्साहन देत नसत. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षी सांगत असत की इतर पद्धतींनी मनःसंयम साधता येणे ज्यांना अवघड वाटते, अशा साधकांसाठी प्राणायामाची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते. मात्र एकंदर पाहता प्राणायाम ही साधनेच्या अगदी प्रारंभिक टप्प्यातली, मर्यादित उपयुक्तता असलेली तसेच अनिवार्य नसलेली साधनपद्धती आहे असेच महर्षींचे मत होते.
(नैतिकता, ध्यान तसेच समाधीबद्दलची महर्षींची मते पारंपारिक राजयोग्यांपेक्षा वेगळी होती, त्यांचा उहापोह या प्रकरणात केलेला नाही.)
राजयोगाव्यतिरिक्त कुंडलिनी योग ही आणखी एक साधनपद्धती प्रसिद्ध आहे. शरीरात असलेल्या वेगवेगळ्या चक्रांवर ध्यान करून कुंडलिनी शक्तीला चेतवण्याचा प्रयत्न करणे हा कुंडलिनी योगाच्या साधकांचा मार्ग आहे. मूलाधार चक्रापासून सुरूवात करत मणक्यात असलेल्या सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीला उर्ध्वगामी करत मस्तकात स्थित असलेल्या सहस्त्रार चक्रापर्यंत नेणे हे साधकाचे ईप्सित असते. कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रापर्यंत पोचली की साधकाला आत्मसाक्षात्कार घडतो अशी कुंडलिनी योगाची धारणा आहे. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.
(टीपः हृदय या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे उल्लेख केलेले चक्र हा शारिरीक अवयव नाही. शारिरीक अवयव डाव्या बाजूला असतो. हृदयचक्र हा एक चैतन्य स्त्रोत आहे. महर्षी या चक्राविषयी अगदी सुलभ असे स्पष्टीकरण देत असत. कुठल्याही व्यक्तीला आपण अंतःकरणापासून अभिव्यक्त होतो आहोत असे दर्शवायचे असेल, किंवा एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणात खोलवर परिणाम करून गेलेली आहे असे दर्शवायचे असेल, तर नकळत तिचा हात छातीच्या उजव्या बाजूकडे जातो. एखादी गोष्ट छातीठोकपणे सांगतो असे म्हणताना आपली मूठ छातीवर उजव्या बाजूलाच आपटली जाते. आत्मतत्व जरी स्थानबद्ध किंवा कालबद्ध नसले, तरी त्या तत्वाचे प्रत्येक व्यक्तीला जन्मजात जाणवत असलेले किंवा सहजस्फूर्तिने कळणारे अधिष्ठान हृदयचक्रच आहे. असो.)
कुंडलिनी योग अनावश्यक तसेच संभाव्यतः धोकादायक असल्याने आपल्या अनुयायांना या मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश महर्षी कधीच देत नसत. आत्मविचाराने तसेच भक्ती आणि समर्पणभावाने कुंडलिनी शक्ती साधकाच्या नकळत अंतिम टप्प्यापर्यंत पोचत असल्याने त्या दृष्टीने अन्य साधनपद्धतींचा अवलंब करणे अनावश्यक आहे या मतावर महर्षी ठाम होते.
कर्मयोग ही आणखी एक साधनपद्धती हिंदू जनमानसात प्रचलित आहे. निस्वार्थ भावनेने गरजूंची सेवा करून तसेच कर्मफलावर आपला अधिकार नाही हे माहित असल्याने पूर्वनिर्धारित फलाकांक्षेचा अट्टाहास न धरता (फळाची अपेक्षाच न धरता नव्हे!) आपल्याच चित्तशुद्धीसाठी परोपकार करून आपली अध्यात्मिक उन्नती साधणे असे या योगाचे स्वरूप आहे. भगवद्वीतेत देखील या योगाची महती सांगितलेली आहे. महर्षी मात्र शक्यतो आपल्या भक्तांना या मार्गाचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. सत्कृत्ये करू पाहणारा 'मी' तसेच माझ्या मदतीची गरज असलेले असहाय्य 'इतरेजन' निरंतर अस्तित्वात आहेत या गृहीतकावर हा मार्ग आधारलेला असल्याने तथाकथित 'मी' बलवान होण्याची तसेच साधक द्वैतभावात कायमचा अडकून पडण्याची शक्यता या मार्गाचा अवलंब करत असताना बळावते. ज्ञान, भक्ती किंवा राजयोग या तिन्हीपैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी एखादा साधक असमर्थ आहे असे दिसले, तर महर्षी त्याला/ तिला चित्तशुद्धी साधण्यासाठी कर्मयोगाची उपासना करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. एखाद्या व्यक्तीचा पिंड ज्ञानमार्ग किंवा भक्ती/ समर्पणभावासाठी अनुकूल नाही, तसेच वृद्धत्व किंवा शारिरिक दुर्बलतेमुळे राजयोगाचा अवलंब करण्यासाठी देखील ती सक्षम नाही असे महर्षींच्या ध्यानात आले, तर अशा एखाद्या विरळ्या साधकासाठीच त्यांनी कर्मयोग राखून ठेवलेला होता. 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने कर्ममार्गाचा अवलंब करताना चित्तशुद्धी होत जाते. त्या योगे हळूहळू अहंता आणि वासना रहित निर्भेळ आनंदाचा अनुभव मिळायला सुरूवात होते. असे घडले की साधक आपोआप आत्मविचार किंवा भक्ती/ समर्पणासाठी पात्र होत जातो.
कर्मयोग यथास्थितपणे साधायचा असेल तर 'मी' इतरेजनांवर उपकार करतो आहे अशी भावना लेशमात्रही न ठेवता आपण करत असलेल्या सत्कृत्यांचे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेले अवांछित परिणाम तसेच सत्कृत्यांमधून होणारी अपेक्षित/ अनपेक्षित फलप्राप्ती याविषयी तटस्थ राहून कर्ममार्गाचे आचरण करावे लागते असे महर्षी ठामपणे सांगत असत. 'मी कर्ता आहे' ही भावना हळूहळू लोप पावल्याने उपरनिर्दिष्ट दोन्ही गोष्टी साध्य होतील हे महर्षींना मान्य असले तरी एकंदर पाहता कर्मयोग या विचारसरणीला ते मनःपूर्वक पाठिंबा देत नसत असेच दिसून येते.
प्रश्नः योग या शब्दाचा अर्थ होतो 'जोडले जाणे'. मला नेहेमी प्रश्न पडतो की काय जोडले जाते आणि ते कशाशी जोडले जाते?
रमण महर्षी: अगदी बरोबर. योगात आधी विभक्तपणा असणे आणि नंतर एखादी गोष्ट (उदा. जीव) आधी पृथकतेने नांदत असलेल्या अन्य गोष्टीशी संलग्न होणे (उदा. शिव) या धारणेचा अंतर्भाव असतो. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तो असा की साधकाने नेमक्या कोणत्या दोन विभक्त गोष्टींचा 'योग' साधण्यासाठी साधना करावी? तुम्ही साधक आहात आणि कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीशी तुम्हाला संलग्न व्हायचे आहे; हे गृहीतक मानून तुम्ही पुढे जात असाल तर तुमच्यापेक्षा वेगळी, विभक्त आणि पृथकतेने नांदणारी अशी एखादी गोष्ट अस्तित्वात असायला हवी. तुमचे स्वरूप मात्र तुमच्या अगदी निकट असते आणि तुम्हाला सतत त्याची सजग नसली तरी कळात नकळत जाणीवही असते. त्याचा अंतर्यामी शोध घ्या आणि त्यात विलीन होऊन जा. तुमचे स्वरूपच अनंताला व्यापून टाकणारे आहे अशी प्रचिती तुम्हाला येईल, मग विभक्त असण्याची जाणीव असेलच कुणाला? त्यामुळे योग साधण्याचा प्रश्नच उरणार नाही.
प्रश्नः प्राणायामाचे तीन टप्पे असतात - श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वास रोखून धरणे. श्वासाचे या प्रकारे नियमन कसे करावे?
रमण महर्षी: देहतादात्म्याचा पूर्णपणे त्याग करणे हेच खरे श्वास बाहेर सोडणे (रेचक), "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधत अंतर्यामी लीन होऊन जाणे हेच खरे श्वास घेणे (पूरक) तसेच 'तत्वमसि' भावाने आपल्या सच्चिदानंद स्वरूपात स्थिर होऊन जाणे हेच श्वास रोधून धरणे (कुंभक) आहे. हाच खरा प्राणायाम आहे.
प्रश्नः शक्ती जागृत करण्यासाठी योगमार्गाने प्रयत्न करत असलेल्या साधकांमधेच कुंडलिनी शक्तीची जागृती घडून येते, की (नवविधा) भक्ती आणि प्रेमाच्या मार्गाचा अवलंब करत असलेल्या साधकांना देखील ते साध्य करता येते?
रमण महर्षी: कुंडलिनी शक्ती कोणाकडे नसते? तिचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर तिलाच 'अखंडाकार वृत्ती' किंवा 'अहं स्फुरणा' असे म्हणतात. तुम्ही कुठल्याही मार्गाचा अवलंब केला तरी कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबा सतत तुमच्या सोबत असते. फरक असेलच तर तो तुम्ही तिला कुठले नाव देता यात असतो.
प्रश्न: ज्ञानी व्यक्ती फक्त तिच्याच मार्गाचे अनुसरण करत असलेल्या साधकांना मदत करू शकते की योगासारख्या अन्य मार्गांचा अवलंब करत असलेल्या साधकांनाही ती मदत करू शकते?
रमण महर्षी: 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या न्यायाने अध्यात्मिक साधकांनी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचे ठरवले तरी ज्ञानसिद्ध व्यक्ती सगळ्यांनाच मदत करू शकते. या बाबतीत शंकेला जागाच नाही! एक दाखला दिल्याने हे स्पष्ट होईल. समजा एखादा पर्वत आहे. त्या पर्वताच्या शिखरावर चढाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानी ज्या मार्गाने शिखरावर पोचला त्याच मार्गाने लोकांनी यावे असे तो सांगेल, तर काहींना ते रूचेल. काही जणांना ते अवघड वाटेल तर काहींना ते मुळीच रूचणार नाही. ज्ञानी स्वतः ज्या मार्गाने गेला त्या आणि त्याच एकमेव मार्गाने मार्गक्रमण करायचा आग्रह ज्यांना तो मार्ग रूचत नाही अशा साधकांपाशी धरला, तर त्यांना पर्वतारोहण करणे अशक्यप्राय होऊन जाईल. साहजिकच नानाविध मार्गांनी मार्गक्रमण करत असलेल्या साधकांना, मग तो मार्ग कुठलाही असो, ज्ञानी मात्र नक्की मदत करू शकतो. त्याचे कारण असे की अर्धा रस्ता पार करून आलेल्या वाटसरूंना इतर मार्गातल्या गुणदोषांची आणि खाचखळग्यांची इत्यंभूत माहिती नसली, तरी शिखरावर आसनस्थ झालेल्या ज्ञान्याच्या नजरेच्या टप्प्यात चहूबाजूंनी मार्गस्थ झालेले साधक सहजगत्या येत राहतात. त्यामुळे वाटेत फसगत होऊ नये या दृष्टीने चकवे चुकवण्यासाठी किंवा दुखापत होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी यथायोग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ज्ञानी व्यक्तीमधे असते. पर्वताचे शिखर किंवा सगळ्या साधकांचे ध्येयदेखील 'एकच' तर असते!
प्रश्नः भगवान नेहेमी कुठल्या आसनात बसलेले असतात?
रमण महर्षी: कुठल्या आसनात? (स्मितहास्य करून) हृदयात स्थित असणे या आसनात. ज्या आसनात चित्तवृत्ती प्रफुल्लित राहिल आणि जे सुखावह वाटेल असेच माझे आसन आहे. यालाच सुखासन असे म्हणतात. हृदयस्थ आणि सहजसिद्ध असलेले हे आसन शांतीस्वरूप आहे. ते मन सतत प्रसन्न ठेवते. (मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण). या आसनात स्थित झालेल्या व्यक्तीला अन्य कुठल्याही आसनाची गरज पडत नाही.
प्रश्नः अर्जुनाला युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त केलेले असल्याने भगवद्वीतेत कर्मयोगावर भर दिलेला दिसतो. सतत कर्तव्यतत्पर राहून तसेच्ग कित्येक आव्हाने परतवून लावत अत्यंत अवघड गोष्टी साध्य करून श्रीकृष्णाने स्वत:च कर्मयोगाचा एक जिवंत आदर्श सगळ्यांपुढे उभा केलेला दिसतो.
रमण महर्षी: भगवंताच्या उपदेशाची सुरूवातच देह हे तुमचे खरे स्वरूप नाही आणि त्यामुळेच कुठल्याही कर्माचे कर्तृत्व तुमच्याकडे येत नाही असे सांगून होते हे अवश्य लक्षात घ्यायला हवे.
प्रश्नः या उपदेशाचा अर्थ काय होतो?
रमण महर्षी: याचा असा अर्थ होतो की मी कर्ता आहे हा भाव न ठेवताच प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे. अहंता शून्यवत असलेल्या अवस्थेतही कर्म सहजतेने घडतच राहते. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचे देहस्वरूपात प्राकट्य झालेले असते; आणि ती व्यक्ती स्वत:ला कर्ता मानत असो अथवा नसो तिच्या जीवनामागचा मूळ उद्देश प्रारब्धवशात साध्य करून घेतला जातो.
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ काय आहे? कर्मफलाचा त्याग करणे की कर्ताभावाचा त्याग करणे?
रमण महर्षी: कर्मयोगाचा खरा अर्थ असा आहे की हा योग साधत असताना साधक आपल्या हातून घडत असलेल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेत नाही. सगळी कृत्ये (त्याच्या स्वधर्मानुसार) आपोआप घडत जातात.
प्रश्नः कर्म करताना फलप्राप्तीविषयी उदासीन असणे असा त्याचा अर्थ होतो का?
रमण महर्षी: कर्म करत असताना कर्ताभाव जागृत असेल तरच कर्मफळाविषयीचा प्रश्न उपस्थित होतो. सगळे अध्यात्मिक ग्रंथ एकमुखाने सांगतात की मी कर्ता आहे या भावनेचाच तुम्ही समूळ त्याग करायला हवा.
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ 'कर्तृत्व बुद्धी रहित कर्म' असा होतो का?
रमण महर्षी: होय. अगदी बरोबर आहे.
प्रश्नः गीता शिकवते की साधकाने अथ ते इति सक्रिय आणि कर्तव्यतत्पर जीवन जगायला हवे.
रमण महर्षी: होय, बरोबर आहे. मात्र ते कर्म कर्तृत्वभावना रहित असेल तरच तो कर्मयोग ठरतो.
प्रश्नः मला कर्मयोग साधायचा आहे. मी इतरेजनांना मदत कशी करू शकेन?
रमण महर्षी: तुम्ही ज्यांना मदत करावी असे 'इतरेजन' कोण आहेत? मुळातच हा 'मी' कोण आहे जो इतरेजनांना मदत करणार आहे? आधी 'मी' कोण आहे या गोष्टीचा नीट उलगडा करून घ्या. मी खात्रीने सांगतो की त्याने बाकी सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल.
प्रश्नः दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर तसेच खूप मोठे बलिदान दिल्यानंतर स्वराज्य मिळाले तर स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तीला हर्ष वाटला किंवा ती बाब अभिमानास्पद वाटली तर ते (पारमार्थिक दृष्ट्या) योग्यच ठरणार नाही का.
रमण महर्षी: कुठलेही काम करत असताना त्या ओघात ईश्वरी शक्तीला स्वतं:ला समर्पित करता येणे साधकासाठी क्रमप्राप्त आहे. ईश्वरी सत्तेचा क्षणभरही विसर पडू न देता तिच्या सामर्थ्याची जाणीव साधकाने मनात सतत जपली पाहिजे. ही भूमिका असेल तर हर्षित होण्याचा प्रश्न येतोच कुठे? साधकाने तर त्याच्या हातून घडत असलेल्या कर्माच्या परिणामांविषयी देखील मुळीच क्षिती बाळगू नये. असे असेल तरच त्याच्या हातून घडलेले कर्म नि:संगपणे आणि निस्वार्थ भावनेने घडले आहे असे म्हणता येईल.
पुरवणी:
भगवान श्री रमण महर्षीं प्रामुख्याने आत्मविचार आणि भक्तीभावपूर्ण समर्पण या दोन गोष्टींवर भर देत असत. ते नेहेमी 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे सांगत असत. भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्टपणे दाखवून देणारे स्वामी स्वरूपानंद यांचे एक कवनः
वेदांती तो बोले सृष्टि मिथ्या ऐसे
भक्ता ती चि दिसे हरि-रूप
वेदांती ओळखे मिथ्या मायाभास
हरिचा विलास भक्त म्हणे
दोहींचा भावार्थ सारखा तत्वता
एक चि हरि-सत्ता सर्वा ठायी
भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त
जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे

- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

Sunday, 19 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांवर आधारित असलेल्या आश्रम व्यवस्थेतून जनमानसात एक समज रूढ होत गेला; की अध्यात्मिक साधक/ साधिका गांभिर्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणारे, विरक्त, खडतर आणि तप:पूत जीवनच व्यतित करावे लागेल. रमणाश्रमाला भेट देणारे अभ्यागत महर्षींना नेहेमी या अनुषंगाने प्रश्न विचारत असत. महर्षीं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आश्रम व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी ठामपणे नकारच देत असत.

आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्‍यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही.

अध्यात्मिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने मनाची प्रवृत्ती सर्वाधिक महत्वाची असून  स्थळ, काळ किंवा परिस्थिती या तुलनेने गौण गोष्टी आहेत असे महर्षी ठामपणे सांगत असत. नोकरी व्यवसायात किंवा स्थळ, काळ आणि परिस्थितीत बदल केल्याने आपली अध्यात्मिक प्रगती होईल असे कुणी सुचवले तर महर्षींना ते मान्य होत नसे. या बाबतीत किरकोळ बदल करण्यासाठी परवानगी देताना देखील ते सहजासहजी  राजी होत नसत. दैनंदिन आचरणाचा विचार केला तर आहाराविषयक सवयीत सुधारणा करणे या एकमेव बदलाला मात्र महर्षी नेहेमी अनुमोदन देत असत. आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा मनात उद्भवणार्‍या विचारांवर गुणात्मक तसेच संख्यात्मक परिणाम परिणाम होतो हा हिंदू धर्मात महत्वाचा मानला गेलेला सिद्धांत महर्षींना मान्य होता. (सात्विक अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होते. मन आणि बुद्धी सुसंवादी झाल्याने स्थैर्य, समाधान आणि आनंद अनुभवता येतो. राजस अन्नग्रहण केल्याने चंचलपणा वाढतो. मन अति सक्रिय झाल्याने तसेच मनाची सतत चलबिचल झाल्याने चित्ताचा क्षोभ होतो. तामसिक अन्नग्रहण केल्याने चित्ताचे मालिन्य, बेदरकारपणा तसेच अमानुष वृत्ती अशा दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळॅ सारासार विचार करण्याची तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते). कुठलीही अध्यात्मिक साधना करताना शाकाहारी अन्नाचे संयत प्रमाणात सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे असे महर्षी सुचवत असत.

प्रश्नः नोकरीचा राजीनामा द्यावा आणि सतत श्री भगवानांच्या सान्निध्यात रहावे अशी  प्रबळ ईच्छा मला नेहेमी होत असते.
रमण महर्षी: भगवान सतत तुमच्या सोबतच आहेत. ते तुमच्या अंतर्यामीच आहेत. खरे सांगायचे तर तुम्ही स्वत:च भगवान आहात. हा साक्षात्कार होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देण्याची किंवा घरदार सोडून पळून जाण्याची मुळीच गरज नाही. वैराग्य या संकल्पनेचा अर्थ घर सोडणे, प्रापंचिक नात्यांना तिलांजली देणे किंवा वरपांगी वस्त्रप्रावरणांमधे बदल करणे असा होत नाही. माया, ममत्व आणि वासनांचा त्याग केल्यानेच अंगी खरेखुरे वैराग्य बाणवता येते. जी ईश्वरी सत्ता सगळ्या जगाचा भार वाहते, तुम्ही स्वतःला तिच्या स्वाधीन केलेत, तर नोकरीचा राजीनामा देण्याची तुम्हाला गरजच वाटणार नाही. वासनांचा त्याग केलेली व्यक्ती खरोखरच विश्वात्मक देवाशी इतकी समरस होऊन जाते, की सगळ्या अस्तित्वाला आपल्या कवेत घेईल इतका तिच्या प्रेमाचा परिघ व्यापक होतो. देवाच्या निस्सीम भक्ताचे वर्णन करताना तो विरक्त, त्यागी किंवा साक्षीभावाने राहणारा आहे या सारख्या रूक्ष संकल्पना थिट्या पडतात. ज्याच्या/ जिच्या प्रेमभावनेचा आणि करूणेचा जगाला व्यापून दशांगुळे उरेल इतका विस्तार झालेला असतो तोच खरा ईश्वर भक्त ही संकल्पनाच अधिक संयुक्तिक आहे. अशी व्यक्ती प्रापंचिक नात्यांमधे गुंतून पडलेली नाही असे भासत असले; तरी वास्तविक पाहता जात, पंथ, धर्म, वंश या सारख्या सीमांना ओलांडून "जीवो ब्रह्मैव नापरः" या न्यायाने अशा व्यक्तीने फक्त मानव समाजच नव्हे तर सगळ्या पशुपक्ष्यांनाही आपले सगेसोयरे मानलेले असते. आपल्या घरादाराचा आणि वस्त्रप्रावरणांचा त्याग करून एखादी व्यक्ती जर खर्‍या अर्थाने संन्यस्त झालेली असेल, तर आपल्या प्रेमाचा आणि करूणेचा परिघ व्यापक झाल्यानेच ती संन्यस्त झालेली असते . प्रापंचिक नातेसंबंधांमधील ताणतणावांचा किंवा कर्मकटकटींचा उबग आल्याने नव्हे!  चित्ताची अशी उन्नत अवस्था साधलेल्या कित्येक भक्तांना आपल्या प्रापंचिक जीवनापासून पलायन करावे असे देखील वाटत नाही. असा भक्त वरपांगी प्रपंचातच रमलेला दिसला, तरी पिकलेले फळ झाडावरून अलगद खाली पडावे तशी त्याची प्रापंचिक वृत्ती मात्र अलगद गळून पडलेली असते. जोवर हे घडत नाही तोवर आपल्या प्रपंचाचा किंवा नोकरी व्यवसायाचा त्याग करणे ही एक प्रकारची आत्मवंचनाच ठरेल.

प्रश्नः आपले व्यावहारिक कर्तव्य पार पाडण्यात व्यग्र असताना समाधी अवस्थेचा आनंद लुटणे शक्य असते का?
रमण महर्षी: 'मी कर्म करतो' हा कर्ताभावच त्यात सगळ्यात मोठा अडथळा आहे. स्वत:ला प्रश्न विचारा, "कर्म कोण करतो आहे?" आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करा. इतकेच साध्य करता आले तरी तुमचे काम आपोआप आणि सुरळित सुरू राहूनही त्यातून कर्मबंध निर्माण होणार नाही. संकल्प आणि विकल्प या दोन्हीं गोष्टींना थारा देऊ नका, कारण संकल्पविकल्पात्मक प्रयत्नच कर्मबंध निर्माण होण्याचे मूळ कारण असतात. तुमच्या प्रारब्धात जे असेल ते घडत राहील. तुमच्या प्रारब्धात काम करणे नसेल, तर तुम्ही कितीही शोधाशोध केली तरी तुम्हाला काम मिळणार नाही. प्रारब्धवशात तुमच्याकडून एखादे काम व्हायचे असेल, तर तुम्ही ते टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तेच काम हाती घेण्यासाठी बाध्य केले जाईल. ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तुमच्या हातून करवून घेतले जातील. काय करावे आणि करू नये हे तुमच्या मर्जीने घडत नसल्याने तो भार ईश्वरावर सोडून तुम्ही स्वस्थचित्त राहिलात तर तुमच्या हातून कित्येक कृत्ये घडताना दिसली तरी तुमची सहज स्थिती (सहज समाधी) भंग होणार नाही.

प्रश्नः एखाद्याने निरंतर आपल्या स्वरूपाचे स्मरण ठेवणे साध्य केले, तर अशा व्यक्तीकडून घडलेले प्रत्येक कृत्य योग्यच असते का?
रमण महर्षी: खचितच तसे असते. मात्र अशा व्यक्तीला आपण केलेले कृत्य बरोबर आहे की चूक याची फिकीर नसते. अशा व्यक्तीने केलेले प्रत्येक कृत्य हे (तिच्या माध्यमातून) परमेश्वरानेच केलेले असते आणि त्यामुळे ते योग्यच असते.

प्रश्नः आत्मविचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता असते का?
रमण महर्षी: एकांत सगळीकडेच आहे. एकांत सतत तुमच्या सोबत असतो. मी उल्लेख करत असलेल्या एकांताचा शोध बाह्य जगतात न घेता तो अंतर्यामी घेण्याचे काम मात्र प्रत्येकाला स्वतःच करावे लागते. एकांत माणसाच्या मनातच दडलेला आहे. बाहेरच्या जगात कितीही कोलाहल सुरू असला तरी एखाद्याने चित्ताची प्रसन्नता भंग होऊ दिली नाही, तर अशी व्यक्ती एकांतातच असते. उलटपक्षी सर्वसंगपरित्याग करून जंगलात जाऊन बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या विचारांवर ताबा नसल्याने तिचे चित्त अस्थिर असेल, तर ती व्यक्ती एकांतात आहे असे म्हणता येत नाही. एकांत ही मनाचीच एक प्रवृत्ती आहे. विकार आणि वासनांनी लडबडलेली व्यक्ती कुठेही असली तरी तिला एकांत मिळवता येत नाही. अंगी वैराग्य बांणवलेला साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो कायम एकांतातच असतो.

प्रश्नः सतत या ना त्या कामात गुंतवून ठेवत असलेली प्रापंचिक कर्तव्ये निभावून नेत असतानाच आम्हाला नैष्कर्म्य स्थिती आणि मानसिक शांती कशी मिळवता येईल?
रमण महर्षी: (पारमार्थिक) शहाणपण मिळवलेली व्यक्ती काम करते आहे असे फक्त इतरांना दिसत असते, त्या व्यक्तीला मात्र तशी जाणीव नसते. असे असल्याने इतरेजनांना ज्ञानी व्यक्ती कधी कष्टाचे डोंगर उपसताना किंवा कधी अवघड गोष्टी साध्य करताना दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती काहीच करत नसते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारे कार्यकलाप तिच्या नैष्कर्म्य स्थिती किंवा मन:शांतीमधे अडसर निर्माण करू शकत नाहीत. ज्ञान्याला हे माहित असते की कर्ता करविता तो नसून त्याच्या निव्वळ उपस्थितीत सगळे कार्य घडून येते आहे, तो मात्र सदैव पूर्णपणे निर्लेप आणि निश्चळ अवस्थेतच आहे. अवतीभोवती घडत असलेल्या घडामोडींबद्दलची ज्ञान्याची भूमिका किंवा आंतरिक स्थिती मौन आणि साक्षीभावाचीच असते.

प्रश्नः पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेल्या साधकांना वृत्ती अंतर्मुख करणे अधिक कष्टप्रद असते का?
रमण महर्षी: होय, तसे आहे खरे.  पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेली व्यक्ती रजोगुणी असते. अशा व्यक्तीचा स्वभाव बहुधा बहिर्मुखी असतो. आपण आपल्या स्वरूपाचे सतत स्मरण ठेवले, अंतर्यामी शांत राहिलो, तर मग बाहेरच्या जगात आपण हवे तितके कार्यरत राहू शकतो. रंगमंचावर स्त्री पात्र साकार करत असलेला अभिनेता आपण पुरूष आहोत हे विसरून जातो का? तद्वतच जगाच्या या रंगमंचावर आपल्याला स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार आपापली भूमिका वठवावी लागते. आपापल्या भूमिका वठवत असताना आपली मूळ ओळख विसरून त्या भूमिकांशी तादात्म्य न पावणे हाच अध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग आहे.

प्रश्नः  पारमार्थिक प्रगती साधण्यातील चालढकल दूर करण्यात इतरेजनांना आपल्याला मदत कशी करता येईल ?
रमण महर्षी: तुम्ही स्वत: हे साध्य केलेले आहे का? तुमच्या सगळा प्रश्नांना आणि उर्जेला स्वरूपबोधाकडे वळवा. तुमच्या अंतर्यामी शक्ती जागृत झाली, तर तिचा परिणाम तुम्ही म्हणता त्या इतरेजनांवर आपोआप होतो.

प्रश्नः आपण ब्रह्मचर्य पालनाला मान्यता देता का?
रमण महर्षी: खरा ब्रह्मचारी तोच असतो ज्याची ब्राह्मी स्थिती कधीच भंग होत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत विकार आणि वासनांचा पगडा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्नः योगी अरविंदांच्या आश्रमात विवाहीत जोडप्यांना आश्रमात वास्तव्य करायचे असेल तर ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असा कडक नियम आहे.
रमण महर्षी: त्याचा काय उपयोग आहे? ज्या वासना मनात जागृत आहेत, त्यांचे लोकांना सक्तीने दमन करायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?

प्रश्नः मी क्षणिक वासनांना बळी पडून बरीच पापकर्मे केली आहेत.
रमण महर्षी: आपण असे गृहीत धरू या की हे खरे आहे. तुम्ही जर सतत मनातल्या मनात त्याच त्या गोष्टींची उजळणी करत बसणे थांबवले, तर त्यांचे उपद्रव मूल्य आपोआप शून्य होऊन जाईल. आत्मस्वरूपामधे कुठल्याही पापकर्माची जाणीव नसते. लक्षात घ्या की वासनांचा त्याग हा आतून करावा लागतो. आपल्या वर्तनात वरपांगी बदल करण्याने फारसा लाभ होत नाही.

प्रश्नः आहाराविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: अन्नाचा मनावर परिणाम होतो. कुठल्याही प्रकारची योगसाधना करायची असेल तर शाकाहाराचा स्वीकार करणे अतिशय हितकारक आहे. सात्विक शाकाहारी अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होण्यात आणि मन स्थिर होण्यात मदत होते.

प्रश्नः आहारात मांसाहाराचा समावेश करणारी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी होऊ शकते का?
रमण महर्षी: होय, ते अशक्य नाही. तुम्ही स्वतः मात्र हळूहळू मांसाहाराचा त्याग करत सात्विक शाकाहारी अन्नग्रहण करण्याची सवय करून घ्या. या बाबतीत मला एक महत्वाची बाब अवश्य नमूद करायची आहे, ती अशी की एकदा ज्ञानप्राप्ती झाली की मग तुम्ही काय खाता याने फारसा फरक पडत नाही. ज्ञानाग्निचा वणवा इतका प्रदिप्त असतो की तुम्ही त्यात कुठलेही इंधन घातले तरी त्याने तिळमात्रही फरक पडत नाही.

प्रश्नः (साधकांनी) मद्यपान आणि मांसाशनाचा पूर्णपणे त्याग करण्याची शिफारस आपण करता का?
रमण महर्षी: साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करणेच साधकांच्या हिताचे आहे. गतानुगतिकपणे काही सवयी आपल्या अंगी अगदी हाडीमाशी मुरलेल्या असतात. जिभेचे चोचले पुरवण्याची चटक लागल्यानेच त्या सवयी सोडताना त्रास होतो, त्यांची आपल्या देहाला खरोखरची आवश्यकता असल्याने नव्हे!

प्रश्नः ढोबळमानाने पाहता अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम काय आहेत?
रमण महर्षी: संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.

नको निराहार नको सेवू फार
सदा मिताहार असो द्यावा
नको अति झोप नको जागरण
असावे प्रमाण निद्रेमाजी
नको बोलू फार नको धरू मौन
करावे भाषण परिमित
संयमी जीवन बाणता सहज
स्वामी म्हणे तुज योग-सिद्धी

- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

Friday, 10 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण

या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. शिष्याने सातत्याने त्या मंत्राचा जप करण्याकडे लक्ष दिले, तर सद्गुरूंची शक्ती अशा प्रकारे कार्यरत होते; जेणेकरून शिष्याला आत्मसाक्षात्काराचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रगती करताना ती सातत्याने मदत करत राहते. रमण महर्षींना या मार्गाची वैधता मान्य असली तरी त्यांनी स्वत: औपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. महर्षींनी दीक्षा देताना मंत्रोपदेश केल्याचेही दिसून येत नाही. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल की नामस्मरणाचा उल्लेख मात्र महर्षी अत्यंत आदरपूर्वक करत असत. भक्ती आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारलेल्या साधकांसाठी नामस्मरण हे अत्यंत उपकारक असे साधन आहे असे आग्रही प्रतिपादन महर्षी करत असत.

समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो असे प्रतिपादन महर्षी करत असत. व्यक्तिगत 'मी' चे तसेच इंद्रियगोचर बाह्य जगताविषयीचे भान हरपून त्या ऐवजी ईश्वरी शक्तीचे अनुसंधान घडत रहावे या दृष्टीने जप आणि नामस्मरणाचे महत्व अनन्यसाधारणच आहे.

सुरूवातीच्या काळात नामस्मरणाचे स्वरूप ध्यानस्थ होण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक चालवलेला अभ्यास असे असते. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. महर्षींचे असे मत होते की परिणामकारक पद्धतीने नामस्मरण करायचे असेल तर आपल्या दैवताला मनोभावे आणि आंतरिक तळमळीने साद घालणे तसेच अनन्य भावाने त्या दैवताच्या पायी शरणागत होणे अनिवार्य आहे. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.

नामस्मरणाच्या प्रगत अवस्थांबद्दल बोलत असताना महर्षींनी वर्णन केलेल्या संकल्पनांमधे गूढरम्यतेचे वलय स्पष्टपणे दिसून येत असे. ईश्वराचे नाम आणि साधकाचे आत्मस्वरूप एकच गोष्ट आहेत असे महर्षी सांगत असत; तसेच त्या पुढे जात आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर साधकाच्या हृदयात (अंतर्यामी) साधकाचे इष्टदैवतच स्वत:चा जप करत राहते आणि साधकाला कुठलेही सायास पडत नाहीत असेही महर्षी सांगत असत (उदा. राम हमारा जप करे, हम बैठे आराम - संत कबीर दासजी). जपाचे साधन 'स्व' विषयीच्या जागृतीत (स्वसंवेद्यता) विलीन होईल तेव्हाच ही स्थिती प्रात होते असा निर्वाळा महर्षी देत असत. नामस्मरण ते स्वसंवेज्ञता असे अवस्थांतर घडणे किती आवश्यक आहे हे सांगताना चौदाव्या शतकातला कार्यकाल असलेल्या महाराष्ट्रातल्या संत नामदेवांच्या एका वचनाचा ते आदराने उल्लेख करत असत. त्या वचनाचा असा अर्थ होतो - "'मी' च्या सत्य स्वरूपाची ओळख पटली तरच नामाच्या सर्वव्यापकतेचा बोध होणे संभवते. जोवर 'मी' विषयीचा यथार्थ बोध होत नाही, तोवर नामाच्या सर्वव्यापी सत्तेची अनुभूती यावी हे संभवतच नाही". संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल.

प्रश्नः लोक (निर्गुण निराकार) देवाला नानाविध नावे देतात आणि असे सांगतात की अमुक एक नाम अत्यंत पवित्र आहे. ते असे म्हणतात की नामाची पुनरूक्ती केल्याने साधकाला दैवी वरदान मिळून त्याची अध्यात्मिक प्रगती होते. हे खरे कसे असू शकेल?
रमण महर्षी: यात शंका घेण्याजोगे काय आहे? तुमचेही एक नाव आहे, ज्याला तुम्ही प्रतिसाद देता. मात्र हे अवश्य लक्षात घ्या की जन्माला येताना हे नाव तुमच्या देहावर लिहीलेले नव्हते. तुमच्या देहाने आजवर कुणालाही असे सांगितलेले नाही की अमुक तमुक हे माझे नाव आहे. तरीही तुमचे नामकरण झालेले आहे. त्या नावाशी तुमची ओळख जोडली गेलेली असल्याने तुम्ही त्याला प्रतिसाद देखील देता आहात. याचाच अर्थ असा होतो की त्या नावाचे असे काही ना काही महत्व खचितच आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुमचे नाव हा निव्वळ कल्पनाविलास आहे असे म्हणता येणार नाही. तद्वतच देवाच्या नावात सामर्थ्य आहे आणि नामस्मरणही परिणामकारक आहे. नामाची पुनरूक्ती केल्याने नाम ज्या गोष्टीचे (इष्टदैवत) महात्म्य दर्शवते तिचे स्मरण साधले जाते. त्यामुळे अध्यात्मिक लाभ होतो हे वेगळे सांगायला नको.

प्रश्नः (अल्पशिक्षीत असल्याने) मला अध्यात्मशास्त्राची फारशी माहिती नाही. आत्मविचाराची साधनपद्धती मला खूप कठिण वाटते. स्त्री असल्याने आणि त्यातून सात मुलांची आई असल्याने माझ्यावर घरकामाचे मोठे ओझे आहे. प्रपंचातच सगळा वेळ जात असल्याने मला ध्यानधारणेसाठी उसंत मिळत नाही. माझी भगवानांना विनंती आहे की त्यांनी मला साधी सुलभ अशी एखादी साधना सुचवावी.
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार घडावा या साठी कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे किंवा शास्त्रवचनांचे ज्ञान असण्याची गरज नाही. आपले रूप न्याहाळण्यासाठी आपल्याला फक्त एक आरसा पुरेसा असतो, तसेच आत्मसाक्षात्काराचे देखील आहे. विद्वानांना देखील शेवटी जन्मभर गोळा केलेल्या सगळ्या पुस्तकी ज्ञानाचे गाठोडे ते 'अनात्मस्वरूप' आहे हा बोध झाल्यावर अडगळीत टाकून द्यावे लागते. प्रापंचिक कामे करण्याने किंवा मुलाबाळांची काळजी वाहण्याने अध्यात्मिक प्रगतीत विघ्नच यावे असा कुठलाही नियम नाही. "मी कोण आहे" ही साधना शिकवत असताना मी सल्ला देतो त्याप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही साधना न करता फक्त (जाणीवेच्या उगमस्थानाकडे जमेल तेव्हा जमेल तितके अवधान देत) 'मी आहे' 'मी आहे' असे सतत पुटपुटत राहिलात तरी ते पुरेसे आहे. तेलाची अखंड धार पडावी तसे सातत्याने हे स्मरण करत राहिलात तर तुम्ही आपोआप साक्षात्कारी स्थितीपर्यंत पोचाल. प्रपंचातले कुठलेही काम हातावेगळे करत असताना, अगदी उठता बसता प्रत्येक क्षणी हे स्मरण सतत होत राहिले पाहिजे. 'मी आहे' ही जाणीव (अहंस्फुरणा किंवा शुद्ध चैतन्य) हेच देवाचे खरे नाव आहे. सगळ्या मंत्रांपैकी हा प्रथम क्रमांकाचा आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. प्रणवाची महती देखील या मंत्रापुढे दुय्यम स्वरूपाची आहे.

प्रश्नः वाचेने स्पष्ट उच्चार करत (प्रणवाचा किंवा एखाद्या मंत्राचा) जप केल्याने काहीच लाभ मिळत नाही का?
रमण महर्षी: स्पष्ट उच्चार करत केलेल्या जपाने काहीच लाभ होणार नाही असे कोण म्हणेल? असा जप खात्रीपूर्वक चित्तशुद्धी करण्याच्या कामी येईल. सातत्याने जप साधना करत राहिल्यास तो प्रयत्न एका प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोचतो आणि कमी अधिक काळाने का होईना साधकाला योग्य मार्गावर आणून सोडतो. अशी पक्की खात्री बाळगा की भले असो की बुरे, तुम्ही जे काही करता ते वाया कधीच जात नाही. मात्र प्रत्येक साधकाचा पिंड तसेच तो परिपक्वतेच्या कुठल्या अवस्थेत आहे हे लक्षात घेत त्याला कर्म, अकर्म इत्यादिंचे भेद तसेच तो करत असलेल्या साधनपद्धतीमधले गुण आणि दोष सद्गुरूंना त्याला स्पष्ट शब्दात सांगावे लागतात.

प्रश्नः कुठल्याही व्यक्तीने सहजच जाता येता एखादा पवित्र मंत्र निवडला आणि त्याचा जप सुरू केला तर त्याचा काही फायदा होतो का?
रमण महर्षी: नाही. एक तर त्या व्यक्तीची तशी पात्रता असायला हवी आणि तिला सुपात्र सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा मिळायला हवी.

राजा आणि प्रधानाच्या एका गोष्टीमधून हा मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एक राजा अचानक आधी न कळवता त्याच्या प्रधानाच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेला. तिथे गेल्यावर त्याला असे सांगण्यात आले की प्रधान जप करण्यात व्यग्र असल्याने राजाला थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. थोड्या वेळाने प्रधानाची भेट झाल्यावर राजाने कुतुहलाने प्रधानाला विचारले की तो नेमक्या कुठल्या मंत्राचा जप करत होता. प्रधानाने उत्तर दिले, की तो सगळ्यात पवित्र अशा गायत्री मंत्राचा जप करत होता. ते ऐकून गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी अशी राजाने प्रधानाला गळ घातली. प्रधानाने मात्र विनम्रपणे नकार देत असे सुचवले की मंत्र दीक्षा देण्याची पात्रता प्रधानाच्या अंगी नव्हती. राजाने ते मान्य केले. तो विचार मनात सतत घोळत राहिल्याने राजाने एका विद्वान व्यक्तीकडून गायत्री मंत्राचे उच्चारण शिकून घेतले. प्रधानासोबतच्या पुढच्या भेटीतच राजाने गायत्री मंत्राचे पठण करून दाखवत प्रधानाला विचारले की एखादी चूक होत असेल तर प्रधानाने ती नि:संकोचपणे दाखवून द्यावी. प्रधानाने उत्तर दिले की मंत्रोच्चारण तर अगदी बिनचूक आहे, मात्र राजाने आपल्या मनाने मंत्र जप आरंभणे उचित नाही. राजाला ते पटले नाही. त्याने खोदून खोदून विचारले तरीही प्रधानाने उत्तर देताना टाळाटाळ केली.

उतावीळ झालेल्या राजाने उत्तर मिळायलाच हवे असा दबाव टाकल्यावर प्रधानाने एक युक्ती केली. त्याने जवळ उभ्या असलेल्या शिपायाला आज्ञा दिली, की शिपायाने राजाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपाई जागचा हलला नाही. शिपायाचे ते वर्तन पाहून प्रधान पुनःपुन्हा अधिकाधिक जोराने तीच आज्ञा देत राहिला, मात्र शिपायाने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा प्रकार असह्य झाल्याने राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या भरात राजाने शिपायाला आज्ञा दिली की प्रधानाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपायाने तत्क्षणी प्रधानाला जेरबंद केले.

प्रधान जोरजोरात हसायला लागला. त्याने राजाला विचारले की तुम्हाला हवे ते स्पष्टीकरण मिळाले का? राजा बुचकळ्यात पडला. त्याने विचारले की प्रधांनजींना नेमके काय सांगायचे आहे. प्रधानाने उत्तर दिले, "आज्ञा तंतोतंत तीच होती आणि आज्ञेचे पालन करणारी व्यक्तीदेखील तीच होती. मात्र आज्ञा देत असलेल्या व्यक्तीच्या अधिकारात फरक होता. हे राजन, मी आज्ञा दिली, तेव्हा ती पूर्णपणे निष्फळ ठरली. मात्र तीच आज्ञा आपण दिलीत, तेव्हा तत्क्षणी तिचे पालन केले गेले. मंत्रदीक्षेच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो."

पुरवणी:
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींविषयीचे विवेचन आहे. भगवद्गीता १०.२५ या श्लोकात 'यज्ञानां जपयज्ञोSस्मि' - सर्व प्रकारच्या यज्ञांमधे जपयज्ञ ही माझी विभूती आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

नाथपंथी ध्यानयोग (लेखक:- प. पू. श्री. दादा आंबेकर - नाशिकचे नाथपंथी गुरूदेव श्री गजानन महाराज यांचे शिष्य, प्रकाशकः सोहम प्रकाशन, सातारा) या पुस्तकात सोहम साधनेतील मंत्रजप तसेच नामस्मरणाची महती सांगणारी तसेच सविस्तर माहिती देणारी पाच प्रकरणे आहेत. जिज्ञासूंसाठी हा सगळा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. विस्तारभयास्तव पुस्तकातला नाममहात्म्याविषयीचा संतजनांनी मोजक्याच शब्दात दिलेला अभिप्राय नमूद करून लेखाची सांगता करतो.

सद्गुरूंना साक्षात्कार झाल्यावर ते ब्रह्मरूप होतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या नामात अगाध शक्ती असते. त्यांना संकल्पशक्तीने शिष्याला जे सामर्थ्य द्यायचे असते ते देता येण्यासाठी आधार किंवा वाहक या स्वरूपात ते नामाचा उपयोग करतात. अशा नामाला 'सबीज' नाम असे म्हणतात (उदा. जपे हरिनाम बीज। तोचि वर्णामाजी द्विज॥ तुका म्हणे वर्णधर्म। अवघे आहे सम ब्रह्म ॥ - संत तुकाराम)

नामेचि सिद्धि, नामेची सिद्धी|
व्यभिचार बुद्धि, न पावता ||
- संत तुकाराम

अठरा पुराणांच्या पोटी |
नामावीण नाही गोष्टी ||
- संत नामदेव

सार सार सार, विठोबा, नाम तुझे सार|
म्हणोनि शूळपाणि जपताहे निरंतर ||
- संत ज्ञानदेव

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

या प्रकरणात ध्यान आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक असणारी एकाग्रता या दोन गोष्टींविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षींचे असे मत होते, की जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी  'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते.

योगाविषयी महर्षींचे मत थोडक्यात असे सांगता येईल - नानाविध विभ्रमांच मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.

द्वैताचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या ध्यान किंवा उपासनापद्धतीकडे कल असलेल्या आणि आत्मविचाराकडे ओढा नसलेल्या साधकांची श्रद्धा डळमळू नये, त्यांचा बुद्धिभेद होऊ नये या दृष्टीने रमण महर्षी अशा साधकांना त्यांनी निवडलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत. ते साधकांना आश्वस्त करत असत की त्यांनी निवडलेला मार्ग देखील त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत घेउन जाईल. दिशाहीन असण्यापेक्षा कुठलीही ध्यान/ उपासना पद्धती स्वीकारणे श्रेयस्कर असते, कारण ती शेवटी आत्मविचारापर्यंतच पोचते असे महर्षींचे ठाम मत होते.

प्रश्नः वैषयिक सुखांपेक्षा ध्यानात अधिक सुख मिळते. असे असूनही मन ध्यानाकडे आकृष्ट न होता विषयांकडेच ओढले जाते. असे का घडते?
रमण महर्षी: सुखसंवेदना आणि वेदना या मनाच्याच दोन अवस्था आहेत. आपला मूळ स्वभाव मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे. देह आणि मनाशी तादात्म्य साधल्याने तेच आपले खरे स्वरूप आहे असा भ्रम झाल्याने आपल्याला मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. ही हरवलेली ओळखच सगळ्या हालअपेष्टांना जन्म देते. स्वतःचीच ओळख हरवलेल्या या परिस्थितीत ती परत मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.  मनाची ही प्रवृत्ती खूप पुरातन असते. कित्येक जन्म लोटले तरी विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या माणसाने हातात धरलेल्या पुस्तकाची पाने एक एक करून उलटावी तशी ती मागील पानावरून पुढे सुरू राहते. काळ लोटेल तशी ही प्रवृत्ती अधिकाधिक खोलवर रूजत जाते आणि मजबूत होत जाते. मूळ स्वरूपाने स्पष्टपणे प्रकट व्हावे, त्याची प्रचिती यावी या दृष्टीने मनाच्या या प्रवृत्तीचा येनकेनप्रकारेण अंत करावा लागतो.

प्रश्नः भगवान, मी जेव्हा जेव्हा ध्यान करतो तेव्हा मला मस्तकात आगीचे लोळ उठल्यासारखे वाटते. तिकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने तसेच ध्यान करत राहिले, तर माझ्या सगळ्या शरीराची लाहीलाही होते. यावर काय उपाय आहे?
रमण महर्षी: मेंदूचा वापर करून एकाग्रता साधली तर जळजळ होण्याची अनुभूती येते आणि पुढे असह्य डोकेदुखी मागे लागते. अंतःकरणापासून (उपास्य देवतेशी) साधलेली एकतानताच शीतलता प्रदान करणारी आणि उत्साहवर्धक असते. गात्रे शिथील केलीत तर तुमच्या ध्यानात सहजता येईल. सौम्यपणे तसेच कुठलाही तणाव न घेता सतत घुसखोरी करणारे विचारतरंग हळुवारपणे दूर सारत मनाला स्थिर करत रहा. तुम्ही लवकरच त्यात यशस्वी व्हाल.

प्रश्नः ध्यान करत असताना झोप लागू नये या साठी मी काय करायला हवे?
रमण महर्षी: तुम्ही झोप येऊ नहे असा प्रयत्न करत असाल तर ध्यान साधताना तुम्ही बौद्धिक विचार करत आहात असा त्याचा अर्थ होतो. ध्यान करताना बौद्धिक विचार करणे थांबवता येणे महत्वाचे आहे. ध्यान करत असताना तुम्ही नकळत निद्रादेवीच्या आधीन झालात तर तुमचे ध्यान निद्रावस्थेत असताना तसेच जागे होत असतानाही सुरूच राहील. तरीही, अखंड सुरू राहिलेला तो एक प्रकारचा विचारच असल्याने जागृत आणि सजग अवस्थेत विचाराचा गोंगाट मागे पडून अंतिम सहजस्थिती प्राप्त करता यावी या दृष्टीने शेवटी अशा योगनिद्रेपासूनही मुक्ती मिळवावी लागते. निद्रा आणि जागृती ही निव्वळ तुमच्या विचारांच्या गोंगाटापासून मुक्त असलेल्या स्वरूपाच्या शुभ्र पडद्यावर उमटणारी चित्रे आहेत. तुम्ही दखल घेतली नाहीत तरी ती तशीच ये जा करत राहतील.

प्रश्नः मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला भावते आणि तुम्ही अन्य गोष्टींपेक्षा तिला सहजतेने प्राधान्य देऊ शकाल.

प्रश्नः शिव, विष्णु आणि गायत्री हे तितकेच प्रभावी आहेत असे म्हणतात. मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: कुणीही एक ज्यावर तुमचे सर्वाधिक प्रेम आहे. या सगळ्यांचा प्रभाव समतुल्यच आहे. मात्र एकाच इष्टदैवताशी एकनिष्ठ रहाणे तुमच्या हिताचे ठरेल.

पुरवणी:
ध्यान कसे करावे तसेच ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधावी या दृष्टीने भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील ६.१० ते ६.३२ हे श्लोक तसेच या श्लोकांवरचे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेले विस्तृत भाष्य अत्यंत मोलाचे आहे. हे भाष्य शब्दशः न घेता त्यातील भावार्थ समजावून घेणे देखील पुरेसे ठरते. भगवद्गीता तसेच ज्ञानेश्वरी आंतरजालावर सहज उपलब्ध असल्याने तसेच ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय यूट्यूबवर श्री. राजेंद्र वैशंपायान यांच्या स्वरात असलेल्या ऑडिओ बुकच्या स्वरूपात सहजगत्या उपलब्ध असल्याने त्याचा इथे समावेश केलेला नाही. 

Tuesday, 24 March 2020

विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य

या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती. महर्षींचा 'मौन उपदेश' त्यांच्या देहातून सतत उत्सर्जित होत असलेल्या एका अत्यंत प्रभावशाली अध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपात दिला जात असे. या मौन दीक्षेचे सामर्थ्य इतके अलोट होते, की महर्षी तिला आपल्या उपदेशाचा सर्वोच्च प्रभावशाली आणि सगळ्यात थेट असा मार्ग मानत असत. मनःसंयम कसा साध्य करावा या विषयी शाब्दिक उपदेशाचा भडिमार न करता ते अगदी सहजगत्या अत्यंत निबीड मौनस्वरूपात असलेल्या एका शक्तीचे उत्सर्जन करत असत. या शक्तीच्या प्रभावामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कित्येक साधकांना, अगदी मुक्या प्राण्यांना देखील मनःशांतीची थेट अनुभूती मिळत असे. या शक्तीशी एकतानता साधायला शिकलेल्या कित्येक साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. काही उन्नत अवस्थेतल्या आणि परिपक्व साधकांमधे ही प्रचिती प्रगाढ आणि स्थिर होत गेल्याने त्यांना थेट 'पहावे आपणासी आपण' अशी अनुभूती येत आत्मलाभही घडत असे.
भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहेच. महर्षी नेहेमी दक्षिणामूर्तिंचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करत असत. दीक्षा या विषय निघाला की त्यांच्या संभाषणात दक्षिणामूर्तिंविषयी उल्लेख हमखास येत असत.
आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत. ते नि:संदिग्धपणे असे प्रतिपादन करत असत की आत्मानुभूतीचा थेट अनुभव घेण्यासाठीचा सत्संग हा एक अत्यंत सहज आणि सोपा असा जणू राजमार्गच आहे. पारंपारिक दृष्ट्या आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे असा सत्संगाचा अर्थ घेतला गेलेला असला तरी रमण महर्षी मात्र सत्संगाची व्याख्या खूपच विस्तृत अर्थाने घेत असत असे स्पष्टपणे दिसून येते. महर्षी सांगत असत की मन सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या ठायी जडून राहणे हा सत्संगाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, त्यामुळे महर्षी अशी खात्री देत असत की देहधारी सद्गुरूंच्या किंवा एखाद्या बाह्य प्रतिकाच्या सान्निध्यात असल्यानेच सत्संग घडतो असे नव्हे; तर स्थळ, काळ आणि वेळ यांची तमा न बाळगता मनोभावे कुठेही आणि कधीही सद्गुरूंचे स्मरण केलेत, तर तुम्ही सत्संगच साधत असता अशी खात्री बाळगा.
प्रश्नः (वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून अरूणाचल पर्वतावर वास्तव्य केलेल्या रमण महर्षींनी शेवटचा श्वास तिथेच घेतला. अत्यंत साधे आणि संयत जीवन जगत ते तिथेच राहिले.) भगवान देशोदेशींचा प्रवास करून प्रवचने देत व्यापक अर्थाने मानव समाजाला सत्याचा उपदेश का करत नाहीत?
रमण महर्षी: मी तसे करत नाही असे आपल्याला का बरे वाटते आहे? व्यासपीठावर उभे ठाकणे आणि उपस्थितांवर प्रवचनबाजीचा भडिमार करणे अशा पद्धतीने ही शिकवण देता येईला का? खरा उपदेश मौन राहूनच देता येतो, कारण त्यात ज्ञानाचे साधे सोपे असे मनोगत थेटपणे अंत:करणापर्यंत पोचवले जाते. एखाद्या व्यक्तीने चांगली तासभर प्रवचनबाजी ऐकली, आणि तिच्या जीवनाच्या प्रवाहाची दिशा बदलेल असा कुठलाही प्रभाव न पडताच ती तेथून निघून गेली, तर या प्रकाराला आपण काय म्हणाल? उलटपक्षी एखाद्या व्यक्तीने चार मोजकेच क्षण एखाद्या पवित्र सत्पुरूषाच्या उपस्थितीत सत्संगात घालवले, आणि तिच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल होऊन ती तिथून मार्गस्थ झाली ... या दोन्हीत तुलना केली असता अधिक श्रेयस्कर काय आहे? ज्याचा कुठलाच प्रभाव पडत नाही असा पांडित्यपूर्ण उपदेश जोरजोरात करावा की मौन बाळगत आंतरिक शक्तीच्या सामर्थ्याला योग्य दिशेने मार्गस्थ करत रहावे?
तुम्ही हे अवश्य लक्षात घ्या, की वाणीचा उगम कसा होतो? सुरूवात नेहेमी अमूर्त अशा ज्ञानापासून होते. त्यातून अहंभाव निर्माण होतो, अहंभाव स्थूल स्वरूपातल्या विचारांना जन्म देतो आणि हे विचारच शब्दरूपात वाचेद्वारे प्रकट होतात. त्यामुळे उच्चारला गेलेला शब्द हा नेहेमीच उगमस्थानी असलेल्या अमूर्त ज्ञानाचा पणतू असतो. शब्दांचा देखील काही प्रमाणात का असेना प्रभाव पडताना दिसतो. तेव्हा आता तुम्ही स्वतःच या गोष्टीचा विचार करा की मौनातून दिला गेलेला उपदेश हा शाब्दिक उपदेशाच्या तुलनेत किती पटींनी प्रभावशाली असेल!
प्रश्नः मौन इतके सामर्थ्यवान कसे असू शकेल?
रमण महर्षी: आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून अध्यात्मिक प्रभाव असलेल्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात, त्यामुळे सत्प्रवृत्त असलेले लोक अशा व्यक्तीकडे आपोआप आकृष्ट होतात. तरीही बाह्यतः मात्र अशी व्यक्ती एखाद्या गुफेत पूर्णपणे मौन अवस्थेत बसलेली दिसू शकते. 'अध्यात्मिक सत्य' या विषयीची प्रवचने आपण हवी तितकी ऐकू शकतो, पण ती ऐकूनही मूळ विषयाला गवसणी घालण्याचा दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. उलट आपल्या वैचारिक गोंधळात मात्र भर पडते आहे असे लक्षात आल्यावर आपण हात हलवत परत जातो. या उलट आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्याने अशा व्यक्तीने एखादा शब्द देखील उच्चारला नाही तरी मूळ विषयाचे आकलन कित्येक पटीने चांगले होते. आत्मज्ञानी व्यक्तीला कधीच बाहेर पडून लोकानुनय करावा लागत नाही. गरज असेल तेव्हा इतर सत्पात्र व्यक्तींच्या माध्यमातून तिला आवश्यक ते कार्य करवून घेता येते.
गुरू शिष्याला जी शांतता प्रदान करतात, तिच्या योगे आत्मज्ञानाच्या प्रकाशात सारे काही लख्ख उजळून निघते. माया समूळ बेचिराख होऊन शेवटी विशुद्ध ज्ञानच शिल्लक उरते. आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंची आणि सत्पात्र शिष्याची निव्वळ नजरानजर जरी झाली, तर मग तिथून पुढे बापुडवाण्या शब्दांचे काही कामच उरत नाही.
प्रश्न: भगवान दीक्षा प्रदान करतात का?
रमण महर्षी: मौन ही सर्वोत्तम आणि सगळ्यात सामर्थ्यवान दीक्षा आहे. तीच श्री दक्षिणामूर्ति देत असत. स्पर्श, दृष्टी इत्यादि प्रकारांनी दिलेली दीक्षा तुलनेने खालच्या पातळीवरची असते. मौन दीक्षेने साधकांच्या अंतःकरणात आमूलाग्र बदल घडून येतो.
शिष्यगण जेव्हा दीक्षेसाठी प्रार्थना करत, तेव्हा श्री दक्षिणामूर्ति मौन बाळगत असत. दीक्षा देण्याचा हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. त्यात इतर सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. इतर दीक्षा पद्धतींमधे दाता आणि याचक असे नाते असणे अनिवार्य असते. आधी दात्याने काही द्यावे लागते आणि मग त्याचा याचकाकडून स्वीकार केला जावा लागतो. देणारा आणि घेणारा असे दोघे अस्तित्वात असले तरच एकाने दुसर्‍याकडे कृपादृष्टी वळवणे, किंवा एकाने दुसर्‍याला स्पर्श करणे संभवते, नाही का? मौन दीक्षाच सर्वार्थाने परिपूर्ण असते; कृपादृष्टी, स्पर्श, उपदेश अशा सगळ्या गोष्टींचा तिच्यात समावेश होतोच. मौन दीक्षा साधकाला सर्वार्थाने निर्मळ करते आणि तो आपल्या (सच्चिदानंद) स्वरूपात स्थिर होतो.
प्रश्नः स्वामी विवेकानंद म्हणतात की अध्यात्मिक गुरू खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिकतेचे शिष्याकडे हस्तांतरण करू शकतात.
रमण महर्षी: अध्यात्म ही अशी एखादी वस्तू आहे का जी हस्तांतरित करता यावी? हस्तांतरणाचा खरा अन्वयार्थ असा असू शकतो की शिष्यातल्या अज्ञानाचा निरास करणे. त्याच्या मूळ स्वरूपावर असलेले आवरण दूर करणे. हे कार्य सद्गुरू करतात. मात्र या हस्तांतरणाचा अर्थ असा मात्र खचितच होत नाही की शिष्य ही एक वेगळीच व्यक्ती होती, आणि मग तिचे रूपांतरण होत ती कुणी वेगळीच अलौकिक व्यक्ती झाली.
प्रश्नः (आपण जिचा उल्लेख करता ती) नि:शब्द शक्ती आपले कार्य कसे करते?
रमण महर्षी: भाषा ही निव्वळ एका व्यक्तीचे विचार इतर व्यक्तींपर्यंत पोचवण्याचे संवादाचे माध्यम आहे. मनात विचार उद्भवतात तेव्हाच ती कामी येते. 'मी आहे' हा विचार सर्वात आधी प्रकटतो आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकीची विचारशृंखला जन्माला येते. त्यामुळे 'मी आहे' हा विचारच सगळ्या संवादांमागचे मूळ कारण असतो. बौद्धिक विचार न करता एखादी व्यक्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूपात स्थिर राहते तेव्हा तिचे इतरेजनांविषयीचे आकलन विश्वव्यापी शांततेच्या माध्यमातून व्हायला सुरूवात होते.
मौनाला सतत काही सांगायचे असते, काही अभिव्यक्त करायचे असते. निरंतर प्रवाही असलेल्या मौनाच्या संततधारेत बोलण्याने व्यत्यय येतो. मी या क्षणी उच्चारत असलेले शब्द देखील मौन संवादातला अडसर बनत आहेत. एक उदाहरण देतो - एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह खेळत असतो. या प्रवाहात अडथळा निर्माण केला, तर तो पंख्याचा स्वरूपात फिरायला लागतो किंवा दिव्याच्या स्वरूपात प्रकाशमान होतो. तारेत मात्र तो निरंतर विद्युत उर्जेच्या शुद्ध स्वरूपातच गतिमान असतो. तद्वतच मौन हा भाषेचा सतत वाहता असलेला प्रवाह असतो, तो शब्दांनी अवरूद्ध होतो.
कित्येक वर्षे सतत संवाद साधून आणि वितंडवाद घालूनही जे आकळत नाही, सतत हुलकावण्या देत राहते, तेच (अध्यात्मिक सत्य किंवा स्वरूप) मौन अवस्थेत किंवा अंतर्बाह्य मौन असलेल्या सत्पुरूषाच्या पुढ्यात उभे राहिल्यावर क्षणार्धात उमगून जाते. दक्षिणामूर्ति आणि चार सनत्कुमार हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मौन ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च सामर्थ्य असलेली भाषा आहे.
पुरवणी:
संजीवनी गाथेत प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी आंतरिक मौनाचे वर्णन असे केले आहे:
कैचा भक्त कैचा देव |
हरिरूप झाले सर्व ||
देव-भक्ता पडे मिठी |
अंतर्बाह्य जगजेठी ||
सर्वा ठायी सर्वा घटी|
हरि नांदे पाठी पोटी||
एक झाले मी-तू पण |
स्वामी म्हणे भले मौन ||
रमण महर्षींनी मुक्तकंठाने गौरवलेला सत्संग साधायचा असेल, तर साधकाची भावदशा कशी असावी याचे वर्णन स्वामीजी असे करतातः
चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती हि खिन्न होऊ नये
अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये
संसारी रहावे अलिप्त उदास, मोहे माया-पाश जोडू नये
स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये
-- प. पू. स्वामी स्वरूपानंद (संजीवनी गाथा)

Friday, 6 March 2020

विभाग ३ - सद्गुरू - प्रकरण ८ - गुरुतत्व

या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). ते असा निर्वाळा देत असत की वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्वुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते.
आपल्याकडे गुरूपद नाही आणि आपले कुणीही शिष्य असा महर्षींचा दृष्टीकोन असला तरी शिष्यवर्गाच्या दृष्टीने मात्र ते करूणेचा आणि कृपेचा अथांग सागरच होते. एखादा शिष्य छोट्या आकाराचे भांडे घेऊन जाईल, तर एखाद्यात सगळ्या सागरालाच रिचवण्याची क्षमता असेल. हे लक्षात घेता ज्याची जितकी क्षमता आहे तितके कृपादान त्याच्या पदरी पडेल असेच म्हणावे लागेल. सागराने कृपणता दाखवली अशी तक्रार करणे हा खरे तर एक प्रकारचा नादानपणाच नाही का?
चित्ताचा क्षोभ तात्पुरता का होईना निवळण्यासाठी संतांच्या सहवासात राहणे हा एक हमखास परिणामकारक ठरणारा उपाय आहे. समाधी साधनात संत निष्णात झालेले असतात, नव्हे तीच त्यांची विनासायास आणि अखंड टिकून राहणारी सहजस्थिती झालेली असते. अशा सत्पुरूषांविषयी जिव्हाळा वाटणे आणि त्यांच्या सान्निध्यात राहणे ज्यांना आवडायला लागते, असे शिष्यदेखील शनै: शनै: त्यांच्या समाधीस्थ जगण्याची सवय अंगी बाणवायला लागतात.
महर्षी नेहेमी असे सांगत असत की गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.
रमण महर्षींच्या उपदेशातले एक मूलभूत तत्व असे आहे की आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. (रमण महर्षींसारख्या दुर्मिळ उदाहरणांमधे गुरू मनुष्य देहधारी नसतात. शिवस्वरूप मानला गेलेला अरूणाचल पर्वत महर्षींना गुरूस्थानी होता). रमण महर्षी नेहेमी असे निदर्शनास आणून देत असत की आत्मलाभ व्हावा अशी आत्यंतिक तळमळ ज्याच्या ठायी नाही अशा शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवण्याचे सामर्थ्य कुठल्याही सद्गुरूंपाशी नसते. एखाद्या साधकाने/ साधिकेने गांभिर्याने आणि आंतरिक तळमळीने आत्मशोध सुरू केला, की गुरुकृपेचा आणि गुरूंच्या सामर्थ्याचा ओघ आपोआप त्याच्या/ तिच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र साधकाने/ साधिकेने कुठलाही प्रयत्न केला नाही, तर सद्गुरू देखील असहाय्य ठरतात.
प्रश्नः गुरूकृपा कशी असते? गुरूकृपेने आत्मसाक्षात्कर कसा घडून येतो?
रमण महर्षी: गुरू आणि आत्मस्वरूप एकच असते. आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात समाधान न वाटल्याने एखाद्याचे मन उद्विग्न होते. अशी व्यक्ती आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची करूणा भाकायला लागते. मनोभावे केलेल्या प्रार्थनेत असलेल्या अंगभूत सामर्थ्यामुळे अशा व्यक्तीची हळूहळू चित्तशुद्धी व्हायला लागते. ओघानेच पुढच्या टप्प्यावर अशा साधकाची प्रार्थना ईश्वरी साक्षात्काराच्या तळमळीत परिणत होते. आपल्या ऐहिक वासनातृप्तीकरता न राहता अशा भक्ताची प्रार्थना अहेतुकपणे आणि फक्त ईश्वरी कृपा संपादन करण्यासाठी होत जाते. हे साध्य झाले की ईश्वरी कृपा हळूहळू प्रकट व्हायला लागते. ईश्वरच मानवी देहाच्या स्वरूपात अशा शिष्याच्या संपर्कात येतो. आपल्या सहवासात त्याची चित्तशुद्धी घडवून आणतो आणि अंती त्याला आपल्या सत्यस्वरूपापर्यंत घेऊन जातो. भक्ताचे मन सामर्थ्यवान होते आणि त्याची अंतर्मुख होण्याची क्षमता वाढायला लागते. अंतर्यामी असलेले गुरूतत्व अशा वेळी मनाला त्याच्या उगमाकडे खेचून घेते आणि मन शांतवावे या साठी मदत करते. हीच गुरूकृपेची महती आहे. खरे तर ईश्वर, गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद मुळातच नसतो.
प्रश्नः (साधकाने) सद्गुरूंचा शोध कसा घ्यावा?
रमण महर्षी: अनादि अनंत असलेला परमेश्वरच त्याच्यावर प्रीती जडलेल्या भक्ताविषयी करूणा वाटल्याने कृपावंत होत (गुरूस्वरूपात) भक्ताची प्रगल्भता लक्षात घेत त्यानुसार भक्तासमोर प्रकट होतो. आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत अशी भक्ताची धारणा असल्याने दोन देहधारी व्यक्तींमधल्या इतर नातेसंबंधांप्रमाणेच गुरू शिष्य या नात्याची त्याला अपेक्षा असते. पण मूर्तिमंत ईश्वर किंवा आत्मस्वरूपच असलेले सद्गुरू 'आतून' काम करायला लागतात. ते शिष्याला त्याने अवलंबलेल्या मार्गातल्या चुकांची जाणीव करून देतात. त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात, तसेच त्याला अंतर्यामी स्वरूप साक्षात्कार होईपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत.
प्रश्नः खरे सद्गुरू कोणत्या गुणांवरून ओळखता येतात?
रमण महर्षी: अविचल असणारी आत्मनिष्ठा, 'जीव हेच ब्रह्म' आहे या दृष्टीने सगळ्या भूतमात्रांकडे पाहणे (सर्वत्र समबुद्धयः) तसेच स्थळ, काळ आणि परिस्थिती कशीही असली तरी त्यामुळे न ढळणारे धैर्य आणि स्थितप्रज्ञता.
प्रश्नः नानाविध मार्गांचा उपदेश करणारे कित्येक अध्यात्मिक गुरू या जगात आहेत. एखाद्याने आपले सद्गुरू कोण हे कसे ठरवावे?
रमण महर्षी: तुमच्या जेव्हा लक्षात येते की अमुक एक सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना आपल्याला विनासायास मनःशांती मिळते तेव्हा त्या सद्गुरूंचा स्वीकार करा.
प्रश्नः ते काय उपदेश करतात हे देखील लक्षात घ्यायला नको का?
रमण महर्षी: (ज्याला आत्मज्ञानाव्यतिरिक्त काहीही नको आहे अशा) एखाद्या प्रबळ मुमुक्षा असलेल्या सच्च्या साधकाला तुम्ही अमुक करा आणि तमुक करा असे सांगतात ते खरे सद्गुरूच नव्हेत. असा साधक आधीच आपल्या क्रियाकलापांमुळे पिडीत आणि व्यथित झालेला असल्याने त्याला मन:शांती आणि विश्रांत अवस्थेची नितांत गरज असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर त्याला नैष्कर्म्य स्थितीची ओढ असते. तो आधीच करत असलेल्या ढीगभर कर्मकटकटींमधे भर घालत किंवा त्यात बदल करून त्या ऐवजी काही पर्यायी क्रियाकलाप करायला त्याने उद्युक्त व्हावे असे जर सद्गुरू सांगतील, तर अशाने त्या साधकाला काय फायदा होणार आहे?
(कर्ता भावाने केलेले) कर्म ही निर्मितीची प्रक्रिया असते. ती आपल्या अंतरी असलेल्या मूळच्या निर्भेळ आनंदाचा विनाश करणारीच ठरते. त्यामुळे क्रियाकलापांची वकिली करणारा मार्गदर्शक हा सद्गुरू नसून तो आत्मघाताला प्रवृत्त करणारा गुन्हेगारच ठरतो. अशा परिस्थितीत उत्पत्तीचे कारण असलेले ब्रह्मदेव किंवा साक्षात यमराजच वेषांतर करून सद्गुरूंच्या रूपात तुम्हाला चकवा देत आहेत असेच म्हणावे लागेल. असे तथाकथित सद्वुरू साधकाला मुक्त तर करूच शकणार नाहीत, उलट (त्यांच्या उपदेशाचे पालन केल्याने) साधकाच्या गळ्याभोवतीचा कर्मबंधाचा फास आणखी आवळला जाईल.
प्रश्नः मी माझे सद्गुरू कसे शोधू?
रमण महर्षी: उत्कटपणे ध्यान साधना करा (सद्गुरूकृपेची घटना आपोआप घडेल, सद्गुरूंची ओळख आतून पटेल).
प्रश्नः सद्गुरूकृपा झाल्याची चिन्हे किंव लक्षणे काय असतात?
रमण महर्षी: गुरूकृपेबद्दल तर्क किंवा बौद्धिक विचार करता यावा किंवा शब्दात व्यक्त करता यावी अशी ती बाबच नाही. ती विचारांच्या आणि शब्दांच्या पल्याडची गोष्ट आहे.
प्रश्नः तसे असेल, तर गुरूकृपेने शिष्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख होते किंवा आत्मलाभ घडून येतो असे का म्हणतात?
रमण महर्षी: एखाद्या मदोन्मत्त गजराजाच्या स्वप्नात सिंह यावा आणि त्याने दचकून जागे व्हावे असा तो प्रकार आहे. स्वप्नात का होईना आपल्या नजरेसमोर सिंह उभा ठाकल्यावर हत्ती एकदम सावध होतो आणि त्याला जाग येते, तसेच सद्गुरूंचा अत्यंत सामर्थ्यशाली कृपाकटाक्ष पडल्यावर अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या आणि गाढ झोपी गेलेल्या शिष्याला जाग येते आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन घडल्याने त्याला खरे ज्ञान प्राप्त होते.
प्रश्नः जे. कृष्णमूर्ति असे म्हणतात की कुठल्याही गुरूंची आवश्यकता नसते.
रमण महर्षी: हा निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारावर काढला? आत्मसाक्षात्कारानंतर जर कुणी असे म्हणत असेल तर ते कदाचित योग्य ठरेल, पण त्या आधी खचितच नाही.
प्रश्नः योगी अरविंद आणि इतर काही जण असे म्हणतात की तुम्हाला कधीच कुणी गुरू नव्हते.
रमण महर्षी: तुम्ही गुरू कुणाला म्हणता या गोष्टीवर तुम्ही काढलेले निष्कर्ष अवलंबून असतात. गुरू देहधारीच असावेत याची गरज नसते. सद्गुरू दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते, ज्यात पृथ्वी, जल इ. पंचमहाभूतांचाही समावेश होता. या न्यायाने या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांना गुरूस्थानी होती.
गुरू असण्याची नितांत आवश्यकता असते. उपनिषदे म्हणतात, की इंद्रियगोचर भवसागरातून आणि बौद्धिक विचारांच्या जंगलातून एखाद्याला फक्त गुरूच बाहेर काढू शकतात. त्या मुळे गुरू तर आवश्यकच आहेत.
प्रश्नः मला असे म्हणायचे आहे की महर्षींना देहधारी गुरू कधीच नव्हते.
रमण महर्षी: अन्य वेळी माझे देहधारी गुरू असतीलही. (या जन्मीचे म्हणाल तर) मी अरूणाचलाच्या स्तुतीपर कवने रचलेली नाहीत का? गुरू, ईश्वर आणि आत्मा एकच तर आहेत. प्रत्येक साधकची गरज लक्षात घेत ईश्वर मनुष्य स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात प्रकट होत मनोभावे प्रार्थना करणार्‍या भक्ताला आत्मलाभ होण्यासाठी मदत करतच असतो.
प्रश्नः एका सद्गुरूंशी एकनिष्ठ असताना तुम्ही अन्य गुरूंचा आदर करू शकता का?
रमण महर्षी: गुरू एकच आहेत. ते निव्वळ देहधारी नसून चैतन्यस्वरूप आहेत. तुमच्यातले दोष दूर होत नाहीत तोवर त्यांच्या सामर्थ्याच्या आधाराची आवश्यकता असतेच असते.
प्रश्नः काही थोर विभूतींना गुरू नसूनही ज्ञानप्राप्ती कशी झाली?
रमण महर्षी: काही अत्यंत विरळ्याच आणि अतिशय परिपक्व अशा साधकांच्या समोर ईश्वर निराकार असलेल्या ज्ञानप्रकाशाच्या स्वरूपात लकाकतो आणि तत्क्षणी ते त्यांच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान करून घेतात.
प्रश्नः मी आपल्या चरणी कायमचा लीन झालेलो आहे. आम्ही ज्याचे अनुकरण करावे असा काही उपदेश भगवान आम्हाला देतील काय? अन्यथा इथून ६०० मैलांवर वास्तव्य करावे लागत असताना आपली मदत आम्हाला कशी मिळू शकेल?
रमण महर्षी: खरे सद्गुरू अंतर्यामी आहेत (ज्यांचे तुमच्या अस्तिस्त्वाशी तादात्म्य आहे).
प्रश्नः हे समजण्यासाठी देखील मला सद्गुरूंची गरज आहे.
रमण महर्षी: ते अंतर्यामी उपस्थित आहेतच.
प्रश्नः मला समोर दिसतील असे गुरू हवे आहेत.
रमण महर्षी: समोर दिसणारे गुरूच तुम्हाला हे सांगत आहेत की गुरू अंतर्यामी देखील उपस्थित आहेत.
प्रश्नः एखाद्या शिष्याला कालांतराने लक्षात आले की आपले गुरू पुरेसे पात्र किंवा सक्षम नाहीत, तर त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवलेल्या शिष्याची पुढची गती कशी असेल?
रमण महर्षी: ती प्रत्येक शिष्याच्या गुणवत्तेप्रमाणे वेगवेगळी असते.
प्रश्नः एखाद्याला एकापेक्षा अधिक अध्यात्मिक गुरू असावेत का?
रमण महर्षी: गुरू कोण आहेत? शेवटी ते तुमचे आत्मस्वरूपच तर आहेत. साधकाच्या मनाचा अध्यात्मिक विकास होत असताना मधे ज्या अवस्था येतात त्या प्रमाणे बाह्य गुरू या स्वरूपात आत्माच तर प्रकट होत असतो. असे म्हणतात की सगळ्या साधकांना वंदनीय आणि अत्यंत प्रिय असलेल्या प्राचीन काळातल्या दत्तगुरूंना तर चोवीसपेक्षाही अधिक गुरू होते. आपण एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकतो तेव्हा तो आपल्याला गुरूस्थानीच असतो. दत्तगुरूंचेच उदाहरण घेतले तर सहज लक्षात येईल की गुरूतत्व निर्जीव वस्तुंमधेदेखील असू शकते, कारण गुरू आणि आत्मतत्व यात एकात्मताच असते.
प्रश्नः एखाद्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर तेच पुरेसे ठरून तो जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटेल अशा जीवनमुक्त अवस्थेप्रत पोचू शकतो, की आत्मसाक्षात्कार घडावा या साठी ईश्वरी कृपेचीच गरज असते?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वरी कृपा देखील आवश्यक असते, नव्हे ईश्वरी कृपाच आत्मसाक्षात्कार घडवू शकते. पण अशी कृपा सच्चे भक्त किंवा श्रेष्ठ योगीजनांनाच प्राप्त होते. मुक्तीकडे घेऊन जात असलेल्या मार्गावर चालत असताना ज्याने अथकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, केवळ अशा उच्च कोटीच्या साधकांनाच ईश्वरी कृपा प्राप्त होते.
पुरवणी:
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेत श्री दत्त संप्रदाय आणि श्री नाथ संप्रदायाचे मोलाचे योगदान आहे. सद्गुरूंचे तसेच गुरूदीक्षेचे अनन्यसाधारण महत्व असल्याने या संप्रदायांना गुरू संप्रदाय असे देखील संबोधले जाते. निवृत्तीनाथांसारख्या थोर सद्गुरूंविषयीचे आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या
'अमृताते ही पैजा जिंके' असा सार्थ गौरव प्राप्त केलेल्या शब्दवैभवाचा ओघ असा काही दुथडी भरून वाहतो, की त्याला तोडच नाही! गुरूकृपेची महती वर्णन करताना प्रतिपाद्य विषय बाजूला पडतो, पण गुरूकृपा हा विषयच असा आहे की भरभरून बोलल्याविना राहवत नाही असे कबूल करत आपल्या हातून वारंवार बोलल्या जात असलेल्या 'अवांतराबद्दल' माऊलींनी सद्गुरूंची आणि श्रोत्यांची माफी देखील मागितलेली आहे! माऊलींनी लिहीलेले 'अवांतर' हा मराठी साहित्यातले एक अनमोल लेणे ठरला आहे.
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या गुरूपरंपरेचे महात्म्य सांगत असताना सद्गुरू चरणांची उपासना केल्याने आपले जीवन कृतार्थ झाले आहे असा नि:संदिग्ध शब्दात निर्वाळा दिलेला आहे. त्यानेच या लेखाची सांगता करतो:
आदिनाथ सिद्ध । आदिगुरु थोर । त्यासी नमस्कार । भक्तिभावे ।।
तयाचे पासून । शिवशक्ति बीज । लाधले सहज । मत्स्येंद्राते ।।
मत्स्येंद्राने दिले । गोरक्षालागोन । गोरक्षे गहिनी । धन्य केला ।।
गहिनीनाथे बोध । केला निवृत्तीसी । निवृत्ती उपदेशी । ज्ञानदेवा ।।
ज्ञानदेव शिष्य । देव चुडामणि । पुढे झाले मुनी । गुंडाख्यादि ।।
रामचंद्र महा । देव रामचंद्र । प्रसिद्ध मुनींद्र । विश्वनाथ ।।
योगसार ऐसे । परंपरा प्राप्त । सद्गुरु गणनाथ । देई मज ।।
स्वामी म्हणे झाले । कृतार्थ जीवन । सद्गुरु चरण । उपासिता ।।

Friday, 28 February 2020

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ७ - भक्ती आणि समर्पण

भक्ती आणि समर्पणभावविषयक भगवान श्री रमण महर्षींचा उपदेशाचा आपण या प्रकरणात गोषवारा घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांचा प्रस्तावनेतील सारांश असा आहे:
जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. परंपरेने समर्पणाच्या मार्गाची सांगड नेहेमी उपास्य आणि उपासक अशा द्वैतभावावर आधारलेल्या भक्तीभाव आणि उपासनापद्धतींशी घातलेली दिसते. श्री रमण महर्षींंच्या दृष्टीने पाहताना मात्र अशा उपासनापद्धतींना नेहेमीच दुय्यम स्थान दिलेले दिसते. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते.
शरणागती हे ईप्सित साध्य होण्यासाठी श्री रमण महर्षी दोन वेगवेगळ्या साधनापद्धतींची शिफारस करत असत:
१. 'मी आहे' या अहंस्फुरणेशी आपण ईश्वरापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत अशा भ्रमात असलेला तथाकथित 'मी' नाहीसा होईपर्यंत सतत अनुसंधान राखणे
२. आपल्या आयुष्याविषयीचे सारे उत्तरदायित्व ईश्वरचरणी किंवा निजस्वरूपाच्या ठायी पूर्णपणे समर्पित करणे. आत्मसमर्पण परिणामकारक ठरावे या साठी साधकाला स्वत:चे संकल्प विकल्प आणि वासना नसणे तसेच ईश्वरी सत्तेपासून वेगळे असलेले संकल्प पूर्तीस नेण्याची क्षमता बाळगणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व अस्तित्वात असल्याचा भ्रम पूर्णपणे नाहीसा होणे अनिवार्य असते.
वरील पैकी पहिली पद्धत भक्तीचा मुखवटा धारण केलेला 'आत्मविचार'च आहे हे स्पष्टपणे दिसून येते. रमण महर्षी नेहेमी आत्मविचार आणि समर्पणभाव यांची तुलना करताना एक तर असे सांगत की एकाच प्रक्रियेला दिलेली ही दोन वेगवेगळी नावे आहेत, किंवा आत्मसाक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याचे फक्त हे दोनच परिणामकारक मार्ग आहेत. रमण महर्षींनी त्यांच्या भक्तांना भक्तीमार्गी उपासना करण्यापासून कधीच परावृत्त केले नाही, मात्र ते सातत्याने असे निदर्शनास आणून देत असत की ईश्वराबरोबरचे कुठलेही नाते (अंश, भक्त, उपासक, दास, सखी इत्यादि) हे काल्पनिक आहे कारण वास्तवात फक्त ईश्वरच अस्तित्वात आहे. महर्षी सांगत असत की आपल्या खरोखरच्या स्वरूपात स्थित राहणे, आपण आणि ईश्वर यातले द्वैतात्मक नाते संपुष्टात येईल इतके त्या चैतन्याशी तदाकार होऊन किंवा समरस होऊन जाणे हीच खरी भक्ती आहे.
रमण महर्षी स्वतः प्रांजळपणे हे मान्य करत असत की या दोन्ही पद्धतींनी अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत. या पैकी बहुतांशी साधनपद्धतींमधे ईश्वर (इष्टदैवत) किंवा सद्गुरूंशी सतत नामस्मरण करत अनुसंधान राखणे किंवा त्यांचे सगुण रूप आठवून मानसपूजेच्या स्वरूपात त्यांचे ध्यान करण्याचा अंतर्भाव असे. महर्षी भक्तांना असा निर्वाळा देत असत की नियमीतपणे प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत होऊन कुठलेही साधन केले तरी त्या योगे टिपकागदाने एखादे द्रव्य टिपून घ्यावे तसे साधकाचे मन विनासायास उपास्यदेवतेत विलीन व्हायला लागेल. हे एकदा साध्य झाले की अनन्य भावाने शरणागत होण्यापर्यंतचा प्रवास सुकर होऊन जाईल.
पुरवणी: स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अमृतधारेतील एक वेचा -
मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरिच तत्वता क्षणात हाता येते सहज-समाधि |
सहज-समाधी संतत साधी न लगे साधन अन्य, सुटुनी आधि-व्याधि-उपाधि होते जीवन धन्य |
'मी' 'मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण? असे 'काय' मी 'मन', 'बुद्धी' वा 'प्राण' पहा निरखोन
प्रश्नः अनन्य शरणागती कशी असते?
रमण महर्षी: एखादी व्यक्ती अनन्य भावाने शरणागत झाली तर मग ज्याने शंका उपस्थित कराव्या किंवा ज्याच्या बाबतीत काळजी करावी असे मागे कुणीच उरत नाही. एक तर 'मी आहे' या सगळ्या विचारांच्या मूळ उगमस्थानाला पकडून ठेवणे किंवा कुठलीशी अट न ठेवता ईश्वरी शक्तीला सर्वभावे शरण जाण्याने विचारांचा पगडा नष्ट होत जातो. आत्मसाक्षात्कार घडावा हे फक्त या दोन मार्गांनीच घडू शकते.
प्रश्नः अनन्य किंवा संपूर्ण शरणागती मधे साधकाला मुक्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची देखील वासना शिल्लक न राहणे अनिवार्य आहे का?
रमण महर्षी: अनन्य शरणागतीमधे तुमची स्वत:ची अशी कुठली वासना असू नये हे अनिवार्यच आहे. परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्यातच संतुष्ट असणे क्रमप्राप्त आहे. या संतुष्ट असण्याचा किंवा समाधानी वृत्तीचा दुसरा पैलू हा आहे की साधकावरचा व्यक्तिगत वासनांचा पगडा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.
प्रश्नः मला शरणागती सोपी वाटते. मला त्या मार्गाचा स्वीकार करायचा आहे.
रमणं महर्षी: तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला त्या 'एकात' स्वतःला विसर्जित करावे लागेल. तुम्ही जेव्हा 'तूच (ईश्वर) सर्व काही आहेस' आणि 'फक्त तुझाच (ईश्वराचा) आदेश पाळला जाईल' ('दाय विल बी डन') अशी स्थिती प्राप्त कराल तेव्हाच शरणागती पूर्णत्वाला जाते. ही स्थिती ज्ञानापेक्षा वेगळी नसते.
'सोहम' ची सुरूवात द्वैतातून होते तर शरणागती अद्वैतावर आधारलेली आहे. पण सत्य हेच आहे की अंततः जो 'तत्वमसि' बोध उरतो त्यात द्वैत आणि अद्वैत दोन्ही अस्ताला गेलेले असतात. शरणागती वरपांगी सोपी वाटते, कारण लोक तिचा असा अर्थ लावतात की फक्त एकदा 'मी शरणागत आहे' असे शब्द उच्चारले आणि आपला सारा भार देवावर टाकून मोकळे झाले की मग आपल्याला हवी तशी मनमानी करता येईल. वस्तुस्थिती मात्र या पेक्षा वेगळीच आहे, ती अशी की तुम्ही शरणागती पत्करली की मग तुम्हाला व्यक्तिगत आवड नावड असू शकत नाही. तुमचे संकल्प विकल्प पूर्णपणे लयाला जागात आणि त्यांची जागा ईश्वरेच्छा (ईश्वरी आदेश) घेते. या मार्गाने अहंतेचा अंत घडवता आला तर त्या योगे साधकला जी आंतरिक स्थिती प्राप्त होते तीअध्यात्मिक ज्ञानप्राप्तीपेक्षा कणमात्रही वेगळी नसते. याचाच मतितार्थ असा, की तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी शेवटी तुम्हाला ज्ञानाकडे किंवा या एकात्मभावाकडेच येणे भाग पडते.
प्रश्नः कृपाप्रसादाने साधकाला अशी क्षमता लवकर प्राप्त करण्यात मदत मिळते का?
रमण महर्षी: तुम्ही ते देवावर (सद्गुरूंवर किंवा ईष्टदेवतेवर) सोडा. तुम्ही सर्वभावे कुठल्याही अटी न घालता शरण जा. पुढील दोनपैकी एक गोष्ट करावीच लागेल - एक तर आपली क्षमता मर्यादित आहे आणि आपल्याला ईश्वरी कृपेची गरज आहे हे मनोमन मान्य करून शरणागत व्हा, किंवा सगळ्या पाप, ताप आणि दैन्यामागच्या मूळ कारणाचा छ्डा लावत त्याच्या उगमस्थानाकडे जा आणि आपल्या सच्चिदानंद निजस्वरूपात लीन होऊन जा. या पैकी कुठल्याही मार्गाने गेलात तर तुमची दुर्दशा कायमची संपून जाईल. खात्री बाळगा की शरणागत झालेल्या भक्ताचा भार वाहणे ईश्वराने सोडून द्यावे असे कधीच घडू शकत नाही.
प्रश्नः आम्ही प्रापंचिक बुद्धी असलेली सामान्य माणसे असल्याने या ना त्या कारणाने आम्ही व्यथित होत राहतो, आणि या दु:खद परिस्थितीवर कशी मात करावी हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही देवाची कितीही करूणा भाकली तरी त्या योगे आमच्या समस्यांचे समाधान प्राप्त होत नाही. अशा वेळी आम्ही काय करावे?
रमण महर्षी: ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा.
प्रश्नः आम्ही शरण जातो, तरीही आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही.
रमण महर्षी: मी समजू शकतो. पण तुम्ही जर खरोखर शरणागत झालेले असाल तर 'ईश्वरेच्छा बलियसी' अशा दृढभावनेने तुम्हाला जगता आले पाहिजे आणि तुम्हाला आनंददायी किंवा सोयीच्या वाटत नाहीत अशा गोष्टींबद्दलचा तुमचा तक्रारीचा सूर निवळला पाहिजे. तुम्ही वरवर पाहता त्या पेक्षा सगळ्या गोष्टी आणि घटना वेगळेच वळण घेत आहेत असे देखील कित्येक वेळा कालांतराने का होईना तुमच्या ध्यानात येईल. दु:खार्त भावनाच कित्येक वेळा इष्टापत्ती ठरते कारण तीच ईश्वरभक्ती दृढ होण्यात परिणत होते.
प्रश्नः शरणागती ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
रमण महर्षी: मान्य आहे. सुरूवातीलाच संपूर्ण शरणागत होणे अशक्य आहे, मात्र अंशतः का होईना शरणागत होणे हे खचितच आपल्या आवाक्यातले आहे. कालांतराने भक्तीभावच संपूर्ण शरणागतीकडे घेऊन जातो. असे पहा की शरणागती अशक्यप्राय आहे असे हेकेखोरपणे गृहीत धरून चालले, तर मग आपल्याकडे उपाय तरी काय उरतो? अशाने मनःशांतीदेखील कायमची दुरावते. फक्त समर्पणानेच ती प्राप्त करता येते. लक्षात घ्या की तुम्ही आपल्याच सामर्थ्याने मनःशांती प्राप्त करण्यात नेहेमीच असहाय्य ठरत आलेले आहात.
प्रश्नः सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे दर्शन कसे घेता येईल?
रमंण महर्षी: ईश्वराचे दर्शन घेणे आणि ईश्वर होऊन जाणे एकच आहे. ईश्वर एकांशाने अस्तित्वात आहे. ईश्वरापेक्षा वेगळे असे इथे काहीच नाही जे त्याने व्यापून टाकावे.
प्रश्नः माझा ओढा भक्तीमार्गाकडे आहे. हा ओढा आणखी वाढत रहावा असे मला वाटते. त्या पुढे साक्षात्कार किंवा मुक्ती माझ्या खिजगणतीतही नाहीत. माझा भक्तीभाव दृढ व्हावा असा आशिर्वाद द्या.
रमण महर्षी: अत्यंत उत्कट असा भक्तीभाव असेल, तर तुमची ईच्छा असो वा नसो, साक्षात्कार म्हणा किंवा मुक्ती म्हणा, ती तुमच्यावर अक्षरशः लादली जाते. तुमचा भाव इतका दृढ आणि उत्कट करा, की त्या भक्तीसागरात तुमचे मन विरघळून जावे. मन कापरासारखे असते. एकदा कापूर जळून गेला, की मागे कुठलेच अवशेष उरत नाहीत. मनाचा दृढनिश्चय झाला आणि ते मागे कणमात्रही अवशेष न ठेवता निजानंदी विलीन झाले, तर त्यालाच तर आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.
प्रश्नः अध्यात्मिक साधकाने सतत ईश्वराच्या स्तुतीपर गीत गायन करण्यात तल्लीन होत जगात वावरण्याने याच जन्मात त्याला आपले ईप्सित साध्य करता येईल का? साधकाने स्थैर्य लाभण्यासाठी एकाच ठिकाणी वास्तव्य करणे आवश्यक आहे का?
रमण महर्षी: जेव्हाजेव्हा मन विचलीत व्हायला लागेल, तेव्हा नित्याचे व्यवहार पार पाडत असतानाच अंतर्यामी मात्र मनाला एकाच गोष्टीवर केंद्रित ठेवण्याचा अभ्यास करणे खचितच चांगले आहे. मनाला इतस्ततः भटकायला मोकळे सोडून निव्वळ जडदेहाला हट्टाग्रहाने एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?
प्रश्नः अहेतुक भक्ती करणे सामान्य जनांना शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. अमुक एक गोष्ट मिळावी या हेतूने केलेली भक्ती ही ईश्वर भक्ती नसून ती प्राप्य वस्तूचीच भक्ती ठरते. शिवस्वरूप होण्याची अभिप्सा ज्याच्या मनी आहे अशा साधकासाठी ईश्वरी उपासना करताना त्या योगे आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे अशा प्रकारच्या वासनेला पूरक असा एकही विचार तरंग मनात उमटू नये यासाठी पूर्वाभ्यास करणे अनिवार्य आहे.
[एका आगंतुकाने त्याचा प्रश्न लिहून आणलेली चिठ्ठी रमण महर्षींना दिली]
प्रश्नः असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे आणि अनन्यभावाने आपल्याला ईश्वराचाच काय तो आश्रय आहे असा निश्चय केला आणि ईश्वराव्यतिरिक्त अन्य कुठलाही विचार देखील मनात उमटू दिला नाही, तर अशा व्यक्तीचे सारे मनोरथ (ईश्वरकृपेने) पूर्ण होतात. याचा अर्थ असा होतो का, की एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसून रहावे, सदासर्वकाळ फक्त ईश्वरी चिंतन करावे, अन्य विचारांचा त्याग करावा - ज्यात देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न, जल इत्यादिंच्या विचारांचा देखील त्याग करायला हवा का? याचाच अर्थ असा देखील होतो का, की साधक आजारी पडला तर त्याने औषध किंवा उपचार यांचा विचार न करता आपले निरामय असणे किंवा रोगग्रस्त असणे हे देखील पूर्णपणे प्रारब्धावर किंवा ईश्वरावर सोडून द्यावे? मी भगवद्गीता अध्याय २ श्लोक ७१ च्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे. थोडक्यात बोलायचे झाले तर सारे काही ईश्वरावर सोडून द्यावे, की आपण देखील थोडेफार प्रयत्न करावे? भगवानांनी कृपा करून शरणागतीविषयीच्या या शंकेचे निरसन करावे.
संदर्भः भगवद्गीत २.७१ - निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधी, निरहंकारी निर्मम नर तो परम शांती संपादी (स्वामी स्वरूपानंद कृत भावार्थ गीता)
रमण महर्षी: [चिठ्ठी वाचून झाल्यावर महर्षींनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच संबोधित केले]
अनन्य शरणागतीचा अर्थ कुठल्याही विचाराने लिप्त न होणे असा होतो या बद्दल शंकाच नाही. पण याचा अर्थ देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न किंवा जल याबद्दलच्या विचारांचा देखील अव्हेर करावा असा होतो का? खचितच नाही. तुम्ही असे विचारता आहात, "ईश्वरी कृपेने न मागताच मला जर काही मिळाले, तर तेच अन्न मी ग्रहण करावे का? की त्या साठी थोडे प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे?" ठीक आहे. आता क्षणभर असे गृहीत धरू या की आपल्यासाठी आवश्यक ते अन्न आपोआप पुढ्यात येते आहे. पण तसे घडले, तरी त्याचा घास कुणी घ्यायचा? आता त्या पुढे एक पाऊल जात असे समजा की अगदी कुणीतरी तुम्हाला घास भरवला, तो गिळण्यासाठीचे सायास तरी तुम्हीच करणार आहात ना? तो प्रयत्नच ठरत नाही का? तुम्ही पुढे असे विचारता, "मी आजारी पडतो तर औषध घ्यावे की आपल्या प्रकृतीची सारी काळजी देवावर सोडून तसेच निमूटपणे बसून रहावे?" शंकराचार्यांनी साधना पंचकम मधे लिहीले आहे, की क्षुधा नामक आजार झाला तर भिक्षेत मिळालेल्या अन्नाचे औषधवत ग्रहण करावे. पण यातही संन्यासाने भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी बाहेर पडण्याचे तरी किमान प्रयत्न करणे गृहीतच धरलेले आहे. जर सगळ्यानीच असे ठरवले की आम्ही डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहू आणि पुढ्यात येईल तेच अन्न ग्रहण करू, तर जगाचे रहाटगाडगे सुरू राहील तरी कसे? त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते विहित कर्म जसे आपले (मानव समाजाचे) पूर्वज पार पाडत आलेले आहेत तसेच काळानुसार बदलत्या स्वरूपात जे आपल्या पुढे कर्तब्य या स्वरूपात आले आहे, ते प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडायलाच हवे. फक्त ते पार पाडताना 'मी कर्म करतो आहे' या विचारापासून मात्र साधकाने मुक्त असायला हवे. 'मी अमुक एक गोष्ट आपल्या सामर्थ्याने करतो आहे' अशी भावना मनात येणे हेच बंधन आहे. त्यामुळेच कर्तेपणाच्या भावनेच्या आधीन होऊ नये अशी एखादी साधनपद्धती शोधणे आणि तिचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
आजारी पडल्यावर औषध घ्यावे का किंवा भूक लागली असता अन्नग्रहण करावे का या सारख्या शंका उपस्थित करण्यापेक्षा कर्ताभाव लोपावा या साठी साधना करणेच श्रेयस्कर आहे. अशा शंका उपस्थित कराल तर त्यांना अंत नसतो. कारण उच्छवासानंतर श्वास घ्यावा का, वेदना झाल्यावर कण्हावे का या सारख्या शंका देखील तुम्हाला पडू शकतात. तुम्ही ईश्वर म्हणा किंवा कर्मगती म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, कुणी एक अनामिक शक्ती प्रत्येक व्यक्तीची जडणघडण लक्षात घेत या जगातल्या सगळ्या कार्यकलापांचे सूत्रसंचालन करत राहील. या दिव्य शक्तीवर सारी जबाबदारी सोपवली, तर सगळ्या गोष्टी स्वयंचलित यंत्राप्रमाणे सुरळित सुरू राहतील.
आपण रोज जमीनीवरून चालतो. तसे करत असताना प्रत्येक पावलावर आपण आता कुठला पाय आधी उचलावा, तो खाली कधी टेकवावा असा विचार करत बसतो का? चालणे आपोआप होते, नाही का? तीच गोष्ट श्वास घेण्याबद्दलही खरी आहे. आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. या जीवनाचीही तीच कथा आहे. आपली मर्जी आहे म्हणून आपण एखादी गोष्ट सोडू शकतो का, किंवा मन मानेल तसे वागू शकतो का? निसर्गतःच अशा कित्येक गोष्टी अव्याहतपणे सुरू असतात ज्यांच्याविषयी आपल्याला सजग असे भानही नसते. ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे याचा अर्थ असा आहे नानाविध मन:कल्पनांनी विचलीत न होता मन ईश्वराच्या स्मरणात स्थिर करणे. हा निदीध्यास दृढ होत गेला की विचारांचा पगडा आपोआप कमी होत जातो. मन, वाचा आणि देहाद्वारे केले गेलेले प्रत्येक कर्म जर ईश्वरी अनुसंधानात मिसळून गेले, तर आपल्या जीवनाचा सारा भार ईश्वरावर आपोआप पडतो. अशा भक्तांच्या योगक्षेमाची चिंताही ईश्वरच वाहतो.